श्री गणेशाय नम: । हे ईशा परमेश्वरा । मनीच्या व्यथा ऐक जरा । तूच सहाय्यभूत होतोस खरा ॥ १ ॥ तू ऐशा भक्ताचे ऐकतो । जो तुझाच होऊन रहातो । तूच प्रसंगी तारतो । त्याला आनंदी ठेवतो ॥ २ ॥ हे गणामहाराजा कळले । जेणे तुझ्यात चित्त गुंतले । सरस्वतीने मज बसविले । सुविचार सुमने धुंद केले ॥ ३ ॥ गणामहाराज गुरफटलेला व्यवहारी । प्रपंचात जीव भारी । तैसाच मूळ व्यापारी । बेजारे करतो नोकरी ॥ ४ ॥ गुरूमंत्राच्या श्रद्धेवरी । गुरूस्मरण अष्टौप्रहरी । मनी नाना विचार लहरी । चित्ता अस्वस्थ करी ॥ ५ ॥ कैसे होईल ग्रंथ लेखन । दशावतारा तुझे स्मरण । कर तू माझे रक्षण । वर्षाव कर कृपा पर्जन्य ॥ ६ ॥ जेणे मन प्रफुल्लित होईल । गुंतेल ते ग्रंथ लेखनात । नको सभोवतालात । तेणे अपयश पदरात ॥ ७ ॥ अध्याय लिहितो दहावा । पूजने गुरू प्रसन्न व्हावा । ऐसा वर्ताव करावा । सदैव आशिर्वाद मिळावा ॥ ८ ॥ ज्याला आपण गुरू मानतो । तो पूजता ईश्वर संतोषतो । मनोकामना पूर्ण करतो । भक्ता सदा तोषतो ॥ ९ ॥ ऐसाच अमरावतीचा भक्त । आत्माराम भिकाजी म्हणतात । सदा गुरू सेवा भावात । दिसत होता कृतीत ॥ १० ॥ महाराज आले त्याच्या घरी । गुरू पूजा झाली घरी । पूजा ज्या घरची स्विकारी । भाग्योदय सत्वरी ॥ ११ ॥ बरेच भक्त पूजेच्या वेळी । आनंद लुटू लागली । बघू लागली गुरू माऊली । जी नामात तल्लीन झालेली ॥ १२ ॥ बाळाभाऊ भाचा । होता आत्मारामाचा । पहाता झाला पूजेचा । थाट गुरूपूजनाचा ॥ १३ ॥ कधीचे त्याच्या मनात असलेले । आज उफाळून आले । गुरूचरण त्याने धरले । कृपाशिष मागितले ॥ १४ ॥ ऐसा आशिर्वाद दिला । शिष्य होऊन राहिला । नोकरी पार विसरला । नोकरीस रामराम ठोकला ॥ १५ ॥ नाही पर्वा नोकरीची । संसार बायको मुलांची । ईच्छा कधीची मनाची । आज पूर्ण झाली साची ॥ १६ ॥ गणेश श्रीकृष्ण खापर्डे । वकीलीत नामांकित बडे । अमरावतीत प्रस्थ बडे । वकीलीत रूपयांचे ढीग पडे ॥ १७ ॥ होते धार्मिक स्वभावाचे । पूजा अर्चा करायचे । सज्जन सद्गृहस्थाचे । आचार होते त्यांचे ॥ १८ ॥ ईच्छा त्यांच्या मनाला । गुरू माऊली यावी घराला । समर्थांनी जाणले त्याला । गेले त्यांच्या घराला ॥ १९ ॥ दादासाहेब खापर्ड्यांनी । पूजन केले अत्यादरानी । संतोषावे समर्थांनी । हीच ईच्छा मनोमनी ॥ २० ॥ गणेश अप्पा लिंगायत वाणी । होता पूजेच्या स्थानी । चंद्रभागा अर्धांगिनी । होती समवेत त्या स्थानी ॥ २१ ॥ पती पत्नींनी नमस्कार । केला समर्थांस साचार । पूजेचा मनातला विचार । समर्थे जाणला साचार ॥ २२ ॥ चंद्रभागा बोलली पतीला । समर्था न्यावे सदनाला । करावा पूजेचा सोहळा । करावे विनंतीला ॥ २३ ॥ पती म्हणे पत्नीला । वेड लागले तुजला । खापर्डे गृहस्थ बडा भला । तेणे पूजा सोहळा । झाला त्याचे घराला ॥ २४ ॥ साधू न्यावया घरास । वशीला लागतो त्यास । जर असता नशीबास । गुरू येतो घरास ॥ २५ ॥ चंद्रभागा म्हणे पतीस । ऐकावे मनोदेवतेस । साधू येईल घरास । वाटते माझ्या मनास ॥ २६ ॥ गणेश अप्पा बोलेना । त्याची हिंमत होईना । नाना विचार मना । कैसे सांगावे जना ? ॥ २७ ॥ समर्थे ओळखला विचार । धरला त्याचा कर । म्हणे दाखव तुझे घर । करीन पूजेचा स्विकार ॥ २८ ॥ गणेश अप्पांची पूजा स्विकारली । पती पत्नी धन्य झाली । मनोवांच्छा फळास आली । जी मनी होती वसली ॥ २९ ॥ प्रत्येक पूजेच्या वेळेस । बाळाभाऊ हजर त्यास । ओळखले शाश्वतास । बसला त्याचा विश्वास ॥ ३० ॥ बाळाभाऊ भारावून गेला । समर्थांस पाहू लागला । भक्तीचा मनोनिर्धार केला । नोकरीतून राजीनामा दिला ॥ ३१ ॥ गणेश अप्पा नि चंद्रभागेस । काही न सुचे मनास । गुरू सेवेचा सदा ध्यास । हाच विचार मनास ॥ ३२ ॥ दोघे झाली समर्थ भक्त । संसारातून विरक्त । ओळखले शाश्वत । रमले शाश्वतात ॥ ३३ ॥ पुढे महाराज निघाले । शेगावास प्रयाण केले । कुणाच्या घरी न गेले । मोट्यांच्या मंदिरी बसले ॥ ३४ ॥ मंदीराच्या पूर्वेस । जागा पडली ओस । तीच समर्थांस उचित । बसले त्या जागेस ॥ ३५ ॥ कृष्णाजीच्या घरास । न भुलले वैभवास । जायचे कुणाच्याही घरास । येईल त्यांच्या मनास ॥ ३६ ॥ कळले वर्तमान कृष्णाजीला । मनोमनी दुःखी झाला । महाराजांकडे येता झाला । महाराजांस विनवू लागला ॥ ३७ ॥ श्री गुरू ! काय केले उणे ? । ऐसे झाले वागणे । माझा मळा सोडणे । हे उचित नसे ॥ ३८ ॥ चुकीची माफी असावी । कृपादृष्टी असावी । ही जागा न पसंत करावी । विनंती माझी ऐकावी ॥ ३९ ॥ देशमुखाजवळची जागा । वैरभावाची जागा । दुसरी मागावी जागा । म्हणाल ती देऊ जागा ॥ ४० ॥ नाही तोटा जागेस । रहावे माझ्या घरास । समर्थ आठवती बंकटास । म्हणती निरोप धाडा त्यास ॥ ४१ ॥ आश्चर्य ऐसे झाले । बंकटाचे येणे झाले । कृष्णाजीस म्हणाले । काढ विचार मनातले ॥ ४२ ॥ पहाते झाले बंकटाकडे । हाच सोडवेल कोडे । जे झाले बंकटाकडे । तेच आज येथे घडे ॥ ४३ ॥ बंकट मूळचा हुशार भारी । एक चतुर व्यवहारी । तसाच तो व्यापारी । काय बोलणार त्यावरी ? ॥ ४४ ॥ बंकट बोलता झाला । सोडले माझ्या घराला । तोच प्रसंग येथे आला । न स्थिर कुणाच्या घराला ॥ ४५ ॥ समर्थां न दुखवावे । त्यातच हित मानावे । जे जे त्यांच्या मनी यावे । तसे त्यांना वागू द्यावे ॥ ४६ ॥ गुरू कधी न दुखवावा । गुरू सदा तोषवावा । बोल प्रमाण मानावा । आपला हट्ट सोडावा ॥ ४७ ॥ बोलले जाते अंतरंगातले । न दुसरे भलते बोले । कृष्णाजीसही पटले । समर्थ त्यावर हसले ॥ ४८ ॥ सखाराम आसोलकरांनी । दिली जागा मनापासुनी । परिश्रम केले सावजींनी । मठाच्या बांधकामा झणी ॥ ४९ ॥ महाराज एकदा भक्तांसमवेत । बैसले होते मठात । स्वारी होती रंगात । चिलीमीच्या मस्तीत ॥ ५० ॥ एका वेगळ्याच तंद्रीत । एका वेगळ्याच आनंदात । चिलिम होती मुखात । गण गण मंत्र मनात ॥ ५१ ॥ काळजी घेत होता भास्कर । चिलिम देत होता सत्वर । काळजी घेण्यात तत्पर । न भास्करासारखा होणार ॥ ५२ ॥ छंद होता चिलिमीचा । व्यसन न म्हणण्याचा । अहर्निष जप चाले ज्याचा । दुसरे काय बोलणार वाचा ? ॥ ५३ ॥ काया वाचा मनाने रंगला । सदा भक्तांसाठी खपला । ईश्वरेच्छा पूर्ण करायला । जणू तो अवतरला ॥ ५४ ॥ भास्कर बाळाभाऊ पितांबर । रामचंद्र गुरव परिवार । गणेश अप्पा नि इतर । सेवेत होते तत्पर ॥ ५५ ॥ भक्तीत जेव्हा स्पर्धा होते । तीच बाधक ठरते । ऐसे जेथे दिसते । चढाओढ तेथे होते ॥ ५६ ॥ तैसेच येथे झाले । भास्करास ऐसे वाटले । बाळाभाऊने दंभ आचरले । पेढे बर्फीस जवळ केले ॥ ५७ ॥ सेवेचे ढोंग आचरले । प्रपंचास लाथाडले । काही तरी आडवे आले । तेणे नोकरीस सोडले ॥ ५८ ॥ हा न येथे टिकावा । गुरूने हेतू ओळखावा । बाळाभाऊस घालवावा । स्पर्धेचा खेळ संपवावा ॥ ५९ ॥ गुरूने जाणले सकळ । भास्कराची तळमळ । आज्ञा झाली तत्काळ । बोलावले बाळाभाऊस जवळ ॥ ६० ॥ फाडफाड मारतात । बाळाभाऊच्या थोबाडीत । राहू नको तू मठात । सवकला पेढे बर्फीत ॥ ६१ ॥ बाळाभाऊस कळेना । काय केला आपण गुन्हा ? । केल्या विनवण्या नाना । ऐसे का हो आज मना ? ॥ ६२ ॥ समर्थ खूप संतापले । छत्रीने झोडपू लागले । मोडण्या इतुके झोडपले । काही कुणा न कळले ॥ ६३ ॥ काठीनेही मारल्यावर । लाथा बुक्क्यांचा मार । झाला त्याच्या पाठीवर । संतोषला भास्कर ॥ ६४ ॥ वाटले आता भास्करास । बाळाभाऊ न येईल मठास । जैसा प्रसंग विठोबास । तैसा बाळाभाऊस ॥ ६५ ॥ बाळाभाऊ जाईल कायमचा । मोकळा मार्ग सेवेचा । नष्ट भाव स्पर्धेचा । काटा निघेल कायमचा ॥ ६६ ॥ स्पर्धा सतावे भारी । नाना कळा अंतरी । त्या कृतीत उतरी । भक्तीला ती अंतरी ॥ ६७ ॥ भक्तीत जाते तड । स्पर्धा मुळातच जड । घेता तिचा कड । भक्तीला न मिळे सवड ॥ ६८ ॥ रहाट गाडगे ऐसेच चाले । भास्करास न सोडले । परी गुरूकृपे कोडे उलगडले । दुकर सुकर झाले ॥ ६९ ॥ भास्करास पहावेना । विनवण्या महाराजांना । झाला व्यथीत मना । म्हणे मोठा केला गुन्हा ॥ ७० ॥ बाळाभाऊस सोडवले । महाराज थांबले । बाळाभाऊस पाहिले । वळाचे नावनिशाण न दिसले ॥ ७१ ॥ कळला बाळाभाऊचा अधिकार । गुरूनिष्ठेचा भक्तीचा अधिकार । समजला भास्कर । म्हणे चूक न ऐशी घडणार ॥ ७२ ॥ तैसाच वागला भविष्यात । न आड कुणाच्या भक्तीत । राहू दिले गुरूसेवेत । जो जैशा सेवाभावात ॥ ७३ ॥ आप्तेष्ट पीडा तापदायक । गुरूचा मार न बाधक । जो खरा असतो सेवक । अन्यथा विपरीतच ॥ ७४ ॥ हवे हवेसे पावेतो । वस्तुंवर प्रेम जडते । मन वीटता नकोशी होते । महत्व कमी होते ॥ ७५ ॥ नाही वस्तुंचे । केवळ निर्जीवाचे । परी होते सजीवांचे । पशू पक्षी प्राण्यांचे ॥ ७६ ॥ जनावरांस मन असते । प्रेम मालकावर असते । ईमानीपणे जगणे होते । पूर्वसंचितानुसार होते ॥ ७७ ॥ जीवनात महत्व पूर्वसंचिताला । जेणे प्रारब्ध वाट्याला । सुकलालच्या गायीला । प्रारब्ध होते नशिबाला ॥ ७८ ॥ सुकलाल आगरवाला । रहाणार बाळापुरला । शेतीवाडीने संपन्न भला । गायी गुरांचा गोतावळा ॥ ७९ ॥ धन धान्य होते वाट्याला । वैभव होते नशिबाला । परी एक गाय नशिबाला । आडदांडपणा देहाला ॥ ८० ॥ गायीच्या देहरूपात । तेणे गाय म्हणण्यात । हिंस्त्रपणा आचरण्यात । सैरावैरा पळण्यात ॥ ८१ ॥ चुकून गाय सुट्टी रहाता । घेई शिंगावर पहाता पहाता । वाटेल त्या दुकानात शिरता । तेथले भयभीत चित्ता ॥ ८२ ॥ वाटेल तेथे तोंड खुपसावे । धनधान्य नासाडावे । आखल्यास्तव वागावे । जे गायीस न शोभावे ॥ ८३ ॥ गुंडास्तव वागावे । लोकांना धाकात ठेवावे । जिकडे तिकडे तीने जावे । थैमान घालावे ॥ ८४ ॥ लोक त्रासास कंटाळले । सुकलालचे मित्र शत्रू झाले । वैमनस्य वाढले । ताप असह्य झाले ॥ ८५ ॥ तो झाला चिंताक्रांत । घरचे झाले सर्व त्रस्त । घर विपत्तीग्रस्त । आनंदी वातावरण लुप्त ॥ ८६ ॥ ईश्वर स्वतःचे महत्व टिकवतो । प्रसंग निमित्त ठरतो । तेणे सत्संग करवतो । जनास मार्ग दावतो ॥ ८७ ॥ कर्ता करविता विधाता । तोच बनेल त्राता । प्रारब्ध भोग वाट्यास येता । सुसह्य करे जगत त्राता ॥ ८८ ॥ गावकर्‍यांनी सुचवावे । ते ते त्याने करावे । निराशेस पत्करावे । काही न चालावे ॥ ८९ ॥ गावकरी झाले वदता । गायीस विकावे आता । क्लेश टाळावे आता । जगू द्यावे स्वस्थ चित्ता ॥ ९० ॥ गायीस नेले विकण्या । कुणी विकत घेईना । क्लेश काही टळेना । प्रश्र्न पडे सर्वांना ॥ ९१ ॥ कवडी मोल वस्तू होता । वस्तू निकामी होता । मोबदल्याचे न महत्व देता । मोफत दिली जाते तत्वता ॥ ९२ ॥ कुणी न घेई गायीस । घाबरे तिच्या आडदांडपणास । मित्र परिवार वदे सुकलालास । विकावी खाटकास ॥ ९३ ॥ सुकलालास पटेना । गायीस खाटका देण्या । जरी होता आडदांडपणा । परी हिम्मत होईना ॥ ९४ ॥ पूर्व संस्कार व्हायचे जागृत । नाना विचार येई मनात । नको पापाच्या जाळ्यात । कधी न सुटका त्यात ॥ ९५ ॥ लोकांवर प्रारब्ध सोपवले । गायीस मारणे नक्की केले । पठाणास सर्व सोपवले । सुटकेचे निश्वास टाकले ॥ ९६ ॥ पठाणाने काय केले । बंदुकीचे नेम धरले । नेम त्याचे चुकले । काळाने न साथ दिले ॥ ९७ ॥ गायीस जणू हे कळले । पठाणास भोसकले । पठाणाचे प्राण तडफडले । पठाणास पंचत्व आले ॥ ९८ ॥ भलताच प्रसंग ओढवला । पठाण फुकटचा मेला । सर्वांस प्रश्र्न पडला । काय करावे गायीला ? ॥ ९९ ॥ गावकरी न बसती स्वस्थ । एकच विचार करी त्रस्त । जो तो गायीच्या सुटकेत । नाना तर्‍हे प्रयत्नात ॥ १०० ॥ एकच विचार सतावे सर्वांना । प्रवृत्ती करवे नाना । प्रारब्धापुढे चालेना । कुणास काही सुचेना ॥ १०१ ॥ काही काळ लोटता । गावकरी झाले ठरवता । गायीस शेगावी न्यावी आता । अर्पण करावी गुरूनाथा ॥ १०२ ॥ अर्पण करावी गजाननास । पुण्य येईल उदयास । टाळू गायीच्या पीडेस । योग्य विचार वाटे मनास ॥ १०३ ॥ पुण्याई नव्हती सुकलालाची । नव्हती गावकर्‍यांची । पुण्याई होती गायीची । एका मुक्या जनावराची ॥ १०४ ॥ गायीला बांधण्यात आले । बांधुन गाड्यात ठेवले । गायीस ऐसे बांधले । एकही अवयव न शिल्लक ठेवले ॥ १०५ ॥ कष्टांची परिसीमा झाली । सत्वपरिक्षेस उतरली । पराधीन असलेली । पराधीनतेस कंटाळलेली ॥ १०६ ॥ जाताना मृत्यूलोकातून । जावे लागते यातना सोसून । सारे प्रारब्धावर अवलंबून । सुटका न होणे त्यातून ॥ १०७ ॥ एकातून दुसर्‍यात जाण्यास । नाना त्रास होती जीवास । योनीतून सुटका होण्यास । सोसावे लागते जीवास ॥ १०८ ॥ गायीची पुण्याई उदयास । संपवता पापकर्मास । माहित नव्हते गावकर्‍यांस । जेणे आले शेगावास ॥ १०९ ॥ मंडळी शेगावी आली । गायीस मठात आणली । गुरूमाऊलीस हाक मारली । गुरू माऊली उभी राहिली ॥ ११० ॥ समर्थांनी पाहिले गायीला । बंदिस्त मुक्या जनावराला । समर्थे प्रश्र्न केला । का हो बांधले गोमातेला ? ॥ १११ ॥ गावकरी समर्थांस वदले । उगाच न हीस बांधले । गायीने थैमान घातले । सारे गाव डोक्यावर घेतले ॥ ११२ ॥ समर्थ हसले अज्ञानाला । वदते झाले तत्क्षणाला । “अहो सोडा आता गायीला । ती न मारणार कुणाला” ॥ ११३ ॥ गायीस सोडण्यात आले । तत्क्षणी तिने चरण धरले । समर्थे स्पर्श केले । स्पर्शातून तिला समजले ॥ ११४ ॥ कुणास त्रास देऊ नये । आडदांडपणा करू नये । सारे आपलेच समजावे । जीवन उपयुक्त ठरावे ॥ ११५ ॥ गायीस सारे समजले । तिने मानेने होकार दिले । तिला पश्चाताप झाले । तिच्या कृतीत दिसले ॥ ११६ ॥ पूर्वजन्माचे संबंध । होते त्यांचे ऋणानुबंध । हाच होत होता बोध । समजला गावकरी वृंद ॥ ११७ ॥ गावकर्‍यांस आश्चर्य वाटले । त्यांना अज्ञान कळले । समर्थांचे सामर्थ्य कळले । महाराजांचे चरण धरले ॥ ११८ ॥ गाय तेथेच राहिली । वृत्ती तिची बदलली । सर्वांकडे पाहू लागली । आसवे नयनातून ओघळली ॥ ११९ ॥ सारी मंडळी व्यथित झाली । पश्चातापे बोलू कागली । उगाच हिची दैना केली । गोमातेस त्रस्त केली ॥ १२० ॥ समर्थांची माफी मागितली । गावकर्‍यांनी वाट धरली । तिचीच संतती नांदू लागली । धन्य ती जीवनी ठरली ॥ १२१ ॥ सुकलालच्या नव्हते नशीबात । ते होते गायीच्या नशीबात । सुकलाल परतला गावात । गाय राहिली शेगावात ॥ १२२ ॥ अन्न उदक असतो जेथे । तो पावेतोच तेथे । ते संपता जाणे होते । दुसरीकडे जाणे होते ॥ १२३ ॥ पूर्वसंचिताच्या खेळाला । महत्व पूर्वसंचिताला । पूर्वसंचिते भाग्य उदयाला । अनुभव आला लक्ष्मणाला ॥ १२४ ॥ कारंज्याच्या लक्ष्मणास । पोटदुखीने घेरले त्यास । नाना औषधे उपचारास । परी न आराम पडे त्यास ॥ १२५ ॥ उपाय निरुपाय ठरले । शेगावी जाणे नक्की केले । पती पत्नी शेगावी आले । समर्थांचे चरण धरले ॥ १२६ ॥ तिने पदर पसरला । व्यथा सर्व सांगितल्या । औषधोपचार निकामा ठरला । आलो तीर्थ मागायला ॥ १२७ ॥ समर्थ आंबा खात होते । परी लक्ष व्यथेकडे होते । दुःख सारे जाणत होते । बोलणे तिचे ऐकत होते ॥ १२८ ॥ आळवल्याने समर्थ प्रसन्न झाले । उष्ट्या आंब्यास फेकले । लक्ष्मणाकडे टक लाऊन बघितले । गुरूकृतीचे गूढ न कळले ॥ १२९ ॥ पती पत्नीस अचंबा वाटला । भक्त वदले तिला । जावे आता कारंज्याला । आंबा खाऊ घाल पतीला ॥ १३० ॥ दोघे गेले कारंज्याला । वृत्तांत सारा सांगितला । मुर्खात काढले तिला । म्हणे रोग बळावणार त्याला ॥ १३१ ॥ पडू नको भानगडीत । न होणार तो व्याधीमुक्त । आंबा करेल व्याधीग्रस्त । भर पडेल दुखण्यात ॥ १३२ ॥ श्रद्धेचे महत्व दोघांना । स्मरण केले समर्थांना । उष्टा आंबा खाताना । कैसे पटणार गावकर्‍यांना ? ॥ १३३ ॥ लक्ष्मणाने आंबा खाल्ला । प्रकृतीत आराम पडला । समर्थांचा अधिकार कळला । जेणे रोग निवारला ॥ १३४ ॥ काहि काळ लोटला । महाराज गेले कारंज्याला । भास्कर बाळाभाऊ सहाय्याला । होते तत्पर गुरूसेवेला ॥ १३५ ॥ लक्ष्मणाने आमंत्रण केले । समर्थे ते स्विकारले । पूजेचे प्रयोजन झाले । आदरातिथ्य झाले ॥ १३६ ॥ लक्ष्मणाने सोहळा केला । परी मनातला भाव वेगळा । दांभिकपणा ओळखला । समर्थांस न तो खपला ॥ १३७ ॥ लक्ष्मण वदे महाराजांस । गुरूचरण लाभले घरास । तेणे भाग्य उदयास । आशिर्वाद असावे लेकरांस ॥ १३८ ॥ जे जे ह्या घरचे । सर्वच आहे तुमचे । सर्वच तुमच्या कृपेचे । माझे काय ह्या घरचे ? ॥ १३९ ॥ समर्थांस फिरवले घरभर । संतोषला तो क्षणभर । धन धान्य कोठार । आता नक्की भरणार ॥ १४० ॥ सर्व दाखवले गजाननाला । परी न कोठाराला । काय कळणार गजाननाला । ऐसे वाटले मनाला ॥ १४१ ॥ समर्थे पहाता कोठाराला । रिकामे करावे लागेल त्याला । लपवू लागला वैभवाला । राग आला गजाननाला ॥ १४२ ॥ समर्थ वदले त्याला । सांभाळावे कोठाराला । नको कोठार आम्हाला । हे न येणार कामाला ॥ १४३ ॥ लक्ष्मणाचे नशीब आड आले । गजानन तेथून निघाले । सहा महिने लोटते झाले । कोठार सर्व रिकामे झाले ॥ १४४ ॥ दांभिकपणाचा परिणाम । वैभवास ठोकला रामराम । हाती आलेले वैकुंठधाम । झाले स्मशानधाम ॥ १४५ ॥ गुरू नाही करणार । कधी रिकामे कोठार । नाही त्याचेवर जगणार । नको भलता मनी विचार ॥ १४६ ॥ जो गुरू वर श्रद्धा ठेवणार । त्याचे कोठार भरणार । देवाण घेवाण होणार । सर्व सुरळीत होणार ॥ १४७ ॥ गणामहाराज सांगे भक्तांस । प्रसंग पटवावे मनास । भोगावे पूर्वसंचितास । नको स्पर्धा भक्तीत ॥ १४८ ॥ गुरू स्मरणात आयुष्य घालवा । सत्संगतीत जीव रमवा । दंभाचार नसावा । नवस न बाकी ठेवावा ॥ १४९ ॥ ॥ शुभं भवतु ॥ ॥ श्री गणपती सरस्वतीर्पणमस्तु ॥ ॥ इति श्रीगुरूगजाननलीला ग्रंथस्य दशमोऽध्यायः संपूर्णः ॥

Aliquam sed mauris

Sed lorem ipsum dolor sit amet et nullam consequat feugiat consequat magna adipiscing tempus etiam dolore veroeros. eget dapibus mauris. Cras aliquet, nisl ut viverra sollicitudin, ligula erat egestas velit, vitae tincidunt odio.

Contact

Address
B2/201 Ashvamegh 3, Akota Munj Mahuda Rd. • Vadodara, GJ 390 020 • INDIA
Email
info@ganamaharaj.org