श्री गणेशाय नम: । तू चराचर व्यापणार । सर्वतोपरी सहाय्य करणार । लेकरांवर कृपा करणार ॥ १ ॥ तूच खरे व्यापणार । पसारा तुझे घर ठरणार । तुझ्या घरात आम्ही रहाणार । पाहुणे नसून लेकुरे होणार ॥ २ ॥ घरातल्या प्रमुखाने नियम करावे । बाकिच्यांनी पाळावे । त्याच्या आज्ञेत रहावे । गुण्यागोविंदाने रहावे ॥ ३ ॥ ऐसा भाव जेथे असतो । संतुष्टपणा तेथे नांदतो । गणामहाराज जाणतो । तेणे आज्ञा मागतो ॥ ४ ॥ आज्ञा शिरसावंद्य होणार । त्यातच हित मानणार । तुझ्यावर भरवसा ठेवणार । तुझ्या वचनात गुंतणार ॥ ५ ॥ ऐसे आज्ञा पालन व्हावे । जेणे नामजप चालू रहावे । विविध अनुभव यावे । मार्गदर्शक ठरावे ॥ ६ ॥ मी आनंद कशात मानतो । तू हे सर्व जाणतो । का पुन्हा पुन्हा विनवण्या करवतो ? । माझा घसा सुकतो ॥ ७ ॥ तू धावून यावे । लेखन कार्या सहाय्य व्हावे । ऐसे लिहिले जावे । भक्तांच्या हृदयावर ठसावे ॥ ८ ॥ गणामहाराज करतो प्रार्थना । जैसे दर्शन दिलेस बाळकृष्णा । तैसाच अनुभव भक्तगणा । कर तू संतुष्ट सर्वांना ॥ ९ ॥ जैसे जवळ केले भास्करास । तैसे सर्व लेकरांस । उणीव तुला वाटल्यास । आणावे निदर्शनास ॥ १० ॥ हा अध्याय अकरावा । सर्वांस बोधपर व्हावा । आधार त्यांस वाटावा । तेणे आधार घ्यावा ॥ ११ ॥ जेथे जैसे मिळणार । तेथे मन धाव घेणार । गुरूजवळ शिष्य येणार । ज्ञानाची भूक भागवणार ॥ १२ ॥ तू कृपाळू कृपावंता । वर्णन होते अनेक ग्रंथा । तुज जवळ आले असता । तूच ठरव आता ॥ १३ ॥ तुझ्याच जवळ येणार । तुझा आधार घेणार । भक्तांसाठी धावणार । जरी दुसरा लाथाडणार ॥ १४ ॥ रामदासे बाळकृष्णा पटवले । वेगळे नको पाहू सांगितले । जरी देहाने दोघे वेगळे । तेणे समर्थ चरण धरले ॥ १५ ॥ बाळकृष्णे समर्थांस । आग्रह केला रहाण्यास । म्हणे यावे बाळापुरास । आनंद होईल आम्हांस ॥ १६ ॥ समर्थे आमंत्रण स्विकारले । बाळापुरला गेले । मनोकामनेस पूर्ण केले । भक्त आनंदित झाले ॥ १७ ॥ भक्तांचा होता सुकाळ । मुख्य बाळकृष्ण नि सुकलाल । अंतरंगी तळमळ । समर्थे जाणली सकळ ॥ १८ ॥ बरोबर होता भास्कर । बाळाभाऊ नि पितांबर । गणु जगदेव बरोबर । सारे सेवेत तत्पर ॥ १९ ॥ एक दिवस उजाडला । वेगळाच तो ठरला । एक कुत्रा पिसाळलेला । जोराने भुंकू लागला ॥ २० ॥ सैरावैरा पळू लागला । जो तो त्यास घाबरला । परी भास्कर पुढे आला । कुत्र्यास हटकू लागला ॥ २१ ॥ प्रारब्ध भोग आडवा आला । भास्कर न जाणता झाला । कुत्रा त्यास चावला । भास्कर विव्हळू लागला ॥ २२ ॥ संचित प्रारब्ध क्रियमाण । न सुटणार जीवा लागून । कधीही भोगल्यावाचून । कैसा भास्कर सुटेल त्यातून ? ॥ २३ ॥ भास्कराभोवती जमले । सहाय्य करू लागले । त्याने सर्वांस बजावले । समर्थच तारतील भले ॥ २४ ॥ माझा वैद्य गजानन । त्याचा उपाय रामबाण । त्याचे कृपेवाचून । न बरा होणार ह्यातून ॥ २५ ॥ समर्थांपाशी आणले । त्यांस निवेदन केले । एक कुत्रे पिसाळलेले । भास्करास चावले ॥ २६ ॥ समर्थे सर्व जाणले । गायीचे द्वाडपण आडवे आले । दूध पिण्यास मन ललचावले । जेणे गायीस जवळ केले ॥ २७ ॥ पदोपदी विनवले । शांत करण्यास सांगितले । गायीचे रहाणे मठातले । दुध दुभत्याचे विचार मनात आले ॥ २८ ॥ समर्थ भास्करास वदले । गायीचे द्वाडपण नडले । कुत्र्याच्या रूपात चावले । प्रारब्ध भोग कुणा न टळले ॥ २९ ॥ जो चुकवतो ह्या जन्मात । भोगतो पुढिल जन्मात । प्रारब्ध भोग भोगण्यात । भोग कमी होतात ॥ ३० ॥ तुझी ईच्छा असल्यास । गळ घालतो सच्चिदानंदास । भास्कर म्हणाला समर्थांस । नका वाढवू आयुष्यास ॥ ३१ ॥ मी मूढ अज्ञानी । आपण सर्व ज्ञानी । येईल जे जे आपल्या मनी । येऊ द्या आचरणी ॥ ३२ ॥ आपणास दुखणे झाल्यावर । आठवतो वैद्य डॉक्टर । तो जे म्हणणार । तेच इलाज होणार ॥ ३३ ॥ दुःख सहन करावे लागणार । डॉक्टर सांगेल तेच होते । भास्करास माहित होते । तेच बोलके होत होते ॥ ३४ ॥ येथे वैद्य गजानन । त्यावर भरवसा ठेवून । वागण्यात हित जाण । हेच सांगे त्याचे मन ॥ ३५ ॥ समर्थ बाळाभाऊस वदले । भास्करास कुत्रे चावले । एका दृष्टीने बरे झाले । पुनर्जन्माचे क्लेश टळले ॥ ३६ ॥ आयुष्य दोन महिने उरले । बाळाभाऊस पटले । समर्थ फुंकर मारते झाले । त्याचे विव्हळणे थांबले ॥ ३७ ॥ सर्वजण शेगावास आले । गावकर्‍यांस वृत्त कळले । भास्करास पहाण्या आले । खबरबात पुसू लागले ॥ ३८ ॥ त्याने गावकर्‍यांस सांगितले । आता दोन महिने उरले । आमचे सारे संपले । समर्थ ऐसे वदले ॥ ३९ ॥ एक ईच्छा मनास । सांगू लागला गावकर्‍यांस । जैसे ज्ञानेश्वर स्मारक आळंदीस । तुकारामाचे देहूस ॥ ४० ॥ तैसे बांधा शेगावास । समर्थांच्या स्मारकास । विसरू नका गजाननास । आमच्या प. पू. गुरूस ॥ ४१ ॥ हा बोल कुणी न पाळेल । माझा जीव अडकेल । स्मारक बांधण्याचे वचन देता । आत्म्यास शांती लाभेल ॥ ४२ ॥ मरते समयी ईच्छा राहिल्यास । कावळा शिवत नाही पिंडास । माहित होते भास्करास । जेणे सांगितले सर्वांस ॥ ४३ ॥ मरते समयी जीव कशातही अडकतो । जो ज्या चिंतनात रहातो । त्यात जीव अडकतो । कावळा पिंडास न शिवतो ॥ ४४ ॥ त्याचा जीव नव्हता संसारात । जैसा सामान्यांचा प्रपंचात । त्याचा जीव समर्थांत । कळून आले त्याच्या बोलण्यात ॥ ४५ ॥ मायबापांच्याही नशीबात । क्वचित योग असतात । त्यांच्या मरणोत्तर । सुपुत्र स्मारक बांधतात ॥ ४६ ॥ येथे भास्कर नि समर्थ । शिष्य आणि गुरू ह्यांच्यात । प्रेम अतोनात । तेणे उद्गार निघतात ॥ ४७ ॥ धन्य ती जगावेगळी । जगात आदर्श ठरली । त्याची ईच्छा मान्य केली । गावकर्‍यांस महती कळली ॥ ४८ ॥ समर्थ मंदिर जे शेगावात । गुरूभक्ती आदर्श त्यात । नुसती न मूर्ती गाभार्‍यात । मायेचा ओलावा आहे त्यात ॥ ४९ ॥ गुरूसेवा ऐशी करावी । जी आदर्श ठरावी । अंतःकरणाची ओढ असावी । वरकरणी नसावी ॥ ५० ॥ पुढे समर्थ त्र्यंबकेश्वरी गेले । शिवरात्रीस सर्व पोहोचले । कुशावर्तास स्नान केले । गहनीनाथ निवृत्तीनाथ दर्शन घेतले ॥ ५१ ॥ शंकराचे दर्शन घेतले । काळ्या राममंदिरी गेले । गोपाळदासास भेटले । जे धुनी लावुनी बसलेले ॥ ५२ ॥ तेथील मंदिरासमोर । होता पिंपळाचा पार । बैसला भक्त परिवार । होता त्यांच्या समोर ॥ ५३ ॥ गोपाळदास वदे भक्तांस । नारळ फुलहारांस । द्यावे गजाननास । वंदन करावे त्यास ॥ ५४ ॥ सांकेतिक बोलणे झाले । सारे आनंदित झाले । भक्त सर्व जाणते झाले । समर्थांचे अधिकार कळले ॥ ५५ ॥ तीर्थस्थानाच्या महत्वामुळे । येथे येणे भाग पडले । महात्म्य सर्वांस पटवले । तीर्थस्थान लाभले ॥ ५६ ॥ तुम्हीच माझे त्र्यंबकेश्वर । ऐसे एकदा बोलला भास्कर । समर्थ म्हणती त्यावर । त्र्यंबकेश्वर ते त्र्यंबकेश्वर ॥ ५७ ॥ भास्करास पटले । जेणे त्याचे येणे झाले । खर्‍या अर्थी गुरू ठरले । सर्वांचे भाग्य उदयाला आले ॥ ५८ ॥ महाराजांचे भक्त ऐसे होते । अतोनात प्रेम होते । त्यांच्या शब्दावर जगत होते । तेणे घरी नेत होते ॥ ५९ ॥ असाच झ्यामसिंग आडगावचा । हट्ट धरला घरी नेण्याचा । शुद्ध हेतू त्याच्या मनाचा । समर्थे जाणला साचा ॥ ६० ॥ येथे सांगावेसे वाटते । ऐसे असावे गुरू शिष्य नाते । शिष्याने स्वतःहून बोलावण्याते । गुरूने जावे तेथे ॥ ६१ ॥ गुरूला उत्स्फूर्त न्यावे । जाहिरातीस स्थान नसावे । मनोभावे पूजन करावे । गुरूचे थोतांड नसावे ॥ ६२ ॥ समर्थे मन जाणले । घरी जाणे कबूल केले । आडगावात सर्व जमले । अनेक चमत्कार झाले ॥ ६३ ॥ एके दिवशी भर दुपारी । भास्करास बडवू लागली स्वारी । एरव्ही दया झरा अंतरी । शुष्क दिसला येथे भारी ॥ ६४ ॥ त्यास फुफाट्यात लोळवले । बाळाभाऊस न पाहवले । समर्थांस विचारले । बाबा ! ह्याने काय केले ? ॥ ६५ ॥ बाबा ! पुरे, पुरे आता । नका मारू आता । मेलेल्याला काय मारता ? । तो पंथास टेकला आता ॥ ६६ ॥ समर्थ वदले त्यास । तुला छत्रीने बडवण्यास । प्रवृत्त केले आम्हांस । भक्ती खुपत होती त्यास ॥ ६७ ॥ बाळाभाऊचे हृदय द्रवले । भास्करास सोडवले । शत्रुभाव न जागे झाले । मित्रत्वच जागे झाले ॥ ६८ ॥ धन्य तो बाळाभाऊ नि भास्कर । दोघांचे प्रेम एकमेकांवर । जेणे बाळाभाऊस विसर । फुटला दयेचा पाझर ॥ ६९ ॥ जन्मवेळ नि मरणवेळ । चाले पूर्वसंचित खेळ । दोन्हींचा बसण्या मेळ । कर्मच आधार ठरेल ॥ ७० ॥ भास्कराचे पूर्वसंचित । होते चांगले निश्चित । तेणे गुरू सान्निध्यात । होता अखेरच्या श्वासात ॥ ७१ ॥ चैत्र वद्य पंचमी आली । समर्थे वेळ जाणली । वैकुंठनाथाची पाऊले ओळखली । भास्करास नेण्यास आली ॥ ७२ ॥ समर्थे पुढचे जाणले । भास्करास आज्ञापिले । भास्करे वंदन केले । शिरसावंद्य मानले ॥ ७३ ॥ पूर्वाभिमुख तो बसला । पद्मासन घालता झाला । गुरूबोल स्मरता झाला । एकचित्त होता झाला ॥ ७४ ॥ वृत्ती अंतर्मुख झाली । तळमळ शांत झाली । वृत्ती शांत झाली । एकातच स्थिरावली ॥ ७५ ॥ भक्तांनी बुक्का लावला कपाळास । हार घातला गळ्यात । गदगदत्या अंतःकरणास । भरून आले त्यास ॥ ७६ ॥ महाराज समोर बसलेले । गानभजन सुरू झाले । वातावरण दुमदुमले । नयनी अश्रू दाटले ॥ ७७ ॥ पुढचे कळत होते । बोलवत नव्हते । जे सर्वांचे असते । तेच आता घडणार होते ॥ ७८ ॥ थोडे वेगळे होते । पुण्याईशी नाते होते । गुरू कृपाशिष होते । सार्‍यांनाच जाणवत होते ॥ ७९ ॥ महाराजांनी जाणले । मध्यान्हास “हर हर महादेव” म्हणाले । वैकुंठनाथ समोर आले । भास्कराचे जाणे झाले ॥ ८० ॥ सर्व भक्त हळहळले । ढसाढसा रडले । हयातीचे प्रसंग आठवले । कुणी न त्यास अडवले ॥ ८१ ॥ माझा भक्त गेला । उ‌द्गार निघाला । नयनातुन अश्रू टपकला । श्रद्धांजली भाव व्यक्त झाला ॥ ८२ ॥ समर्थे भक्तांस आज्ञा केली । समाधीची तयारी केली । एक मैलावरी द्वारकेश्वराजवळी । समाधीची तयारी झाली ॥ ८३ ॥ एक भक्त वैकुंठास गेला । आत्मा देहातून गेला । देह येथेच शिल्लक राहिला । क्रियाकर्म मागता झाला ॥ ८४ ॥ मरणोत्तरही क्रियाकर्म होई । तिलांजली दिली जाई । भावसुमने अर्पण होई । सर्व शास्त्रानुसार श्रद्धेने केले जाई ॥ ८५ ॥ आत्मा जरी न देहात । आत्म्याच्या अनुसंधानात । सर्व विधी क्रिया होतात । श्रद्धेवर सर्व चालतात ॥ ८६ ॥ अनुभवाने शास्त्रार्थ पटतो । काहीतरी आधार असतो । पिढ्या नि पिढ्या चालतो । कालमानाप्रमाणे जो तो वागतो ॥ ८७ ॥ भास्कराच्या समाधी बाबतीत । पहाते झाले चमत्कृतीत । ऐसे न घडले येथ । जो तो ऐसे म्हणत ॥ ८८ ॥ चिंचेचे झाड तेथे । समाधीजवळ होते । त्याच्याच सावलीच्या सहाय्याते । अन्नदान होत होते ॥ ८९ ॥ तेथल्या कावळ्यांस । खुपत होते मनास । भास्कर गेला वैकुंठास । हेच कारण असावे मनास ॥ ९० ॥ कावळा पिंडास शिवण्याचे । महत्व न आता त्याचे । तेथल्या अन्नदानाचे । लक्ष वेधले कावळ्यांचे ॥ ९१ ॥ कुणासही न स्वस्थ । जराही न बसू देईनात । व्यत्यय त्यांच्या भोजनात । आणत होते क्षणाक्षणात ॥ ९२ ॥ ते सर्व जाणते कावळे । रोजच्या सवयीने उक्त झालेले । सर्वांस त्रास देते झाले । जे न लोकांस खपले ॥ ९३ ॥ तीरकामठे काढले । कावळ्यांवर धरले । समर्थे दृष्य बघितले । ऐसे करण्यास अडविले ॥ ९४ ॥ समर्थ वदले कावळ्यांना । येऊ नका येथे पुन्हा । नका सतावू कुणा । पुन्हा न यावे स्थाना ॥ ९५ ॥ भास्कर वैकुंठी गेला । तुमचा मान न उरला । जेणे तुम्हा द्वेष झाला । नका आचरू मत्सराला ॥ ९६ ॥ कावळ्यांस सार कळले । गावकर्‍यांस न कळले । ते समर्थांस हसले । त्यांनी वेड्यात काढले ॥ ९७ ॥ खरा वेडा कोण असतो । प्रसंग येता कळतो । आधी शहाणा वेडा ठरतो । परी वेडाच शहाणा ठरतो ॥ ९८ ॥ गावकरी वेडे ठरले । समर्थ वाणीने प्रभावी ठरले । कावळे येणे बंद झाले । समर्थ शहाणे ठरले ॥ ९९ ॥ एकदा शेगावात । दुष्काळ पडला गावात । संपन्नता जी गावात । हळू हळू आली संपुष्टात ॥ १०० ॥ दुष्काळात कामे निघतात । त्यावर काही पोट भरतात । अधिकारी त्यावर चरतात । दया माया विसरतात ॥ १०१ ॥ अधिकार्‍यांची हुकुमत चालते । वरून दडपण येते । चक्र सुरळीत चालू होते । सर्वत्र सारखेच असते ॥ १०२ ॥ वरतुन हुकुम सुटतात । कागदी नाटके होतात । हाताखालचे शेळी होतात । वाघाचे भक्ष बनतात ॥ १०३ ॥ जीव असे पावेतो देहात । गरीब माणसे राबतात । सर्व उपाध्या पत्करतात । एक खळगा भरतात ॥ १०४ ॥ एक विहीर खोदण्यास । मजूर लावले त्यास । पडेल त्या कामास । पत्करावे लागे त्यास ॥ १०५ ॥ दोन पुरूष खोल खणले । काळे दगड दिसू लागले । पहारीचे न उपयोग झाले । खोल खणता न आले ॥ १०६ ॥ चारही बाजूस भोके पाडली । सर्व पहारीने केली । सुरुंगाची मदत घेतली । फोडण्यास सुरूवात झाली ॥ १०७ ॥ चारही बाजूस भोके पाडली । दारू आत ठासून भरली । सुरुंगाची मदत घेतली । एक एक दोरी सरकवली ॥ १०८ ॥ एरंड पुंगळ्या पेटवल्या । दोर्‍यांसवे सोडल्या । मध्येच अडकून बसल्या । पुढे जाईना काही केल्या ॥ १०९ ॥ पुंगळी खाली जाईना । दारूस विस्तव लागेना । पाणी सुरुंग सोडेना । काय करावे सुचेना ॥ ११० ॥ एक मिस्त्री बोलला । त्या गणू जवर्‍याला । जा उतर विहिरीला । थोडे ढकल पुंगळीला ॥ १११ ॥ त्या पुंगळ्या सरकवण्यास । कुणी न धजे त्यास । जेणे मिस्त्रीने गणूस । दरडावून सांगितले त्यास ॥ ११२ ॥ जणू मृत्यूने गणूस । सांगितले विहिरीत उतरण्यास । काळाच्या दटावण्यास । काही न बोले त्यास ॥ ११३ ॥ मृत्यूची चाहूल ओळखली । पटकन उडी घेतली । पुंगळी आत सरकवली । वर येण्याची धडपड केली ॥ ११४ ॥ तोच प्रचंड धडाके झाले । सारे भयभीत झाले । म्हणती गणूचे प्राण गेले । काही न शिल्लक राहिले ॥ ११५ ॥ इकडे गणू एका कपारीत । दडून बसला त्यात । होता धावा करत । होता समर्थां आळवत ॥ ११६ ॥ कपारीत ऐसा बसला होता । काहिही न ईजा होता । गुरू झाला सहाय्य करता । तोच ठरला त्राता । ११७ ॥ समर्थांचा धावा केला । तोच त्यास फळास आला । काळाला घालवता झाला । मृत्यूमुखातुन बाहेर आला ॥ ११८ ॥ कालावधीने तो ओरडला । कुणीतरी आवाज ऐकला । चेष्टेचा खेळ वाटला । परी कानोसा घेतला ॥ ११९ ॥ आश्चर्याचा धक्का बसला । गणूचाच आवाज ऐकला । बाहेर काढण्याचा प्रयत्न केला । गणू त्यातून सुटला ॥ १२० ॥ गणू होता भयभीत । काहितरी पुटपुटत । काहिच नव्हते त्यास कळत । जे जे सर्व होता पहात ॥ १२१ ॥ जो तो होता पुसत । काय केले कपारीस ? । प्रश्र्न त्या अतोनात । शेवटी आला भानात ॥ १२२ ॥ गणूचे चित्त महाराजमय झालेले । त्याला महाराजच दिसले । दुसरे काही न दिसले । म्हणे त्यांनीच मला वाचवले ॥ १२३ ॥ सर्वांना त्याने विनविले । मठाकडे न्या झाले । गणू समवेत काही निघाले । समर्थांचे दर्शन घेतले ॥ १२४ ॥ तो महाराजांस बिलगला । घट्ट धरू लागला । कंठ दाटून आला । हृदयीचा भाव बोलका केला ॥ १२५ ॥ चरणावर डोके ठेवले । चरण घट्ट धरले । महाराज त्यास वदले । गण्या, कपारीत किती धोंडे उडवले ? ॥ १२६ ॥ महाराज म्हणाले त्यास । एकदा तू वाचलास । पुन्हा न करावे साहसास । भिऊ नकोस दटावण्यास ॥ १२७ ॥ महाराजांनी वाचवले गणूस । तैसेच रक्षितात भक्तांस । केवढी काळजी समर्थांस । तैसाच विश्वास भक्तांस ॥ १२८ ॥ गणामहाराज सांगे भक्तांस । जो ठेवतो गुरूवर विश्वास । पाळतो त्यांच्या शब्दास । तो उद्धरतो हमखास ॥ १२९ ॥ भक्तीत स्पर्धा नसावी । गुरूवर श्रद्धा ठेवावी । संचित भोगण्या तयारी ठेवावी । नामात प्रारब्ध सुसह्य होई ॥ १३० ॥ आचरू नये द्वेष मत्सरास । तोच घात करणार । जैसे कर्म आचरणार । तैसेच फळ मिळणार ॥ १३१ ॥ विसरू नका गुरूला । आळवावे त्याला । धावून यावे हाकेला । ऐशा मारावे हाकेला ॥ १३२ ॥ जैसा गुरू लाभला भास्करास । गणू जवर्‍यास । तैसाच लाभो सर्व भक्तगणांस । येथेच अकरावा अध्याय पूर्णत्वास ॥ १३३ ॥ ॥ शुभं भवतु ॥ ॥ श्री गणपती सरस्वतीर्पणमस्तु ॥ ॥ इति श्रीगुरूगजाननलीला ग्रंथस्य एकादशोऽध्यायः संपूर्णः ॥

Aliquam sed mauris

Sed lorem ipsum dolor sit amet et nullam consequat feugiat consequat magna adipiscing tempus etiam dolore veroeros. eget dapibus mauris. Cras aliquet, nisl ut viverra sollicitudin, ligula erat egestas velit, vitae tincidunt odio.

Contact

Address
B2/201 Ashvamegh 3, Akota Munj Mahuda Rd. • Vadodara, GJ 390 020 • INDIA
Email
info@ganamaharaj.org