श्री गणेशाय नम: । हे अरूपा निराकार । भक्तांसाठी होतो साकार । जागे करतो वारंवार ॥ १ ॥ आम्ही निद्रेत असणार । तू जागृत करणार । तुला कोण विसरणार ? । विसरणारा निद्रेत रहाणार ॥ २ ॥ आनंदाचा ठसा मनावर । हेच जीव मागणार । जो जागृत असणार । तोच आनंदित रहाणार ॥ ३ । तूच आनंद देतोस आम्हांस । जो जे काही देतो दुसर्‍यास । कोण विसरणार त्यास ? । हे कळते गणामहाराजास ॥ ४ ॥ जेणे तुला आळवतो । तूच सदा प्रसन्न होतो । तू जे जे सांगतो । ते ते भक्तां सांगतो ॥ ५ ॥ माझी तुला एक आर्जव । भक्तांसाठी घ्यावी धाव । संतोषेल भक्तांचा जीव । आनंदेल माझा जीव ॥ ६ ॥ नुसते दृष्टीने बघण्यास । नको शिकवू आम्हांस । अंतर्मनाने जाणण्यास । शिकव तू आम्हांस ॥ ७ ॥ जे दृष्टी न बघणार । ते तू बघणार । हे मी जाणणार । कैसा तुला विसरणार ? ॥ ८ ॥ तू यावे ह्या स्थाना । माझी वृत्ती स्थीर करण्या । उपयुक्त ग्रंथ लेखना । हीच मनोमन प्रार्थना ॥ ९ ॥ जैसी मी भाकतो करूणा । माझा हेतू पूर्ण करण्या । तैसे भक्त समर्थांना । भाकत होते करूणा ॥ १० ॥ अकोल्याचा बच्चुलाल । संस्काराने सुशील । पावित्र्याची वाटचाल । गुरू पूजनाची तळमळ ॥ ११ ॥ बच्चुलाले केली विनवणी । समर्थ सद्गुरूंनी । यावे माझ्या सदनी । गुरूपूजन हेतू मनी ॥ १२ ॥ समर्थे हेतू जाणून । स्विकारले आमंत्रण । त्यांस होकार देऊन । दिला त्यास परतवून ॥ १३ ॥ महाराज गेले अकोल्याला । बच्चुलालच्या सदनाला । आनंद झाला मनाला । हेतू पूर्ण झाला ॥ १४ ॥ पूजाविधी सुरू झाले । समर्थांस उटणे लावले । उष्णोदक स्नान घातले । जरीचा पितांबर नेसवले ॥ १५ ॥ शालीचेही प्रयोजन केले । फुलहार गळ्यात घातले । केशरी चंदन भाळी लावले । नाना अलंकार घातले ॥ १६ ॥ दहा बोटात दहा अंगठ्या । रत्नजडीतास नव्हता तोटा । वामकरी पौचा घालता । शोभून दिसे सद्गुरूनाथा ॥ १७ ॥ अष्टगंध अर्गजा अत्तर । लावले होते बाहुंवर । गुलाबपाणी अंगावर । घमघमाट सुगंध फार ॥ १८ ॥ जिलबी राघवदास पेढे । प्रसादात पुढे ठेवले । तबकात ठेवले विडे । रंगावलीने शोभा वाढे ॥ १९ ॥ वैभवाचे प्रदर्शन केले । सारे विपरित झाले । महाराजांस न रुचले । भाव चेहेर्‍यावर उमटले ॥ २० ॥ ज्याला जे आवडते । ते त्यास देण्याते । त्याचे मन संतुष्ट होते । कृपाशिष मिळते ॥ २१ ॥ दागदागिने भिरकावले । कृतीतून बोलके झाले । बच्चुलाला जागृत केले । वैभवास न भुलले ॥ २२ ॥ योग्याचे अंतरंग जाणावे । फाजील प्रदर्शन नसावे । ऐसे त्यास अर्पण करावे । जेणे त्याने संतुष्ट व्हावे ॥ २३ ॥ प्रसंग विपरित घडला । अपेक्षाभंग झाला । बच्चुलालास पस्तावा झाला । चूक स्वतःची जाणता झाला ॥ २४ ॥ महाराज वदले त्यास । मला काय पोळ्याचा बैल समजतोस ? । नाना अलंकार घालतोस । माझी परिक्षा पाहतोस ? ॥ २५ ॥ मी न बैल पोळ्याचा । अथवा घोडा दसर्‍याचा । काही न उपयोग दागदागिन्यांचा । योगी भुकेला सेवेचा ॥ २६ ॥ बच्चुलाल नतमस्तक झाला । विनवणी करू लागला । चूक कळली मला । पुन्हा न होणार प्रसंगाला ॥ २७ ॥ गुरू मला माफ करा । माझ्यावर कृपा करा । शुद्ध भाव अंतरा । झिडकारू नका अलंकारा ॥ २८ ॥ राममंदिर बांधण्याची । ईच्छा माझ्या मनाची । आहे कित्येक दिवसांची । ती पूर्ण करा साची ॥ २९ ॥ भक्तीरसाने ओथंबलेले । बच्चुलालाचे हृदय जाणले । समर्थांचे हृदय द्रवले । त्यास आशिर्वाद दिले ॥ ३० ॥ त्याचे पुढचे संकट टळले । महाराज कृपावंत झाले । अकोल्याहुन निघाले । शेगावास परतले ॥ ३१ ॥ पितांबर न सोडे समर्थांस । जैसे तान्हुले मातेस । सदा तत्पर सेवेस । काही न उणीवेस ॥ ३२ ॥ सदा त्यांच्या सान्निध्यात । सदा त्यांच्या पुढ्यात । गुरू वेडा अंतरंगात । दिसत होते त्यांच्या कृतीत ॥ ३३ ॥ विचार प्रत्येक मातेचे । एकच असतात तिचे । सदा हित तान्हुल्याचे । हेच लक्ष्य मातेचे ॥ ३४ ॥ विचार करावे मातेने । मोठे व्हावे तान्हुल्याने । नुसते न कधी देहाने । परी परिपूर्ण ज्ञानाने ॥ ३५ ॥ काही कारणास्तव दूर लोटते । परी चित्त बाळातच असते । जवळ राहून जे मिळते । अधिक दूर गेल्याने मिळते ॥ ३६ ॥ अहो सामान्य माता जाणते । कैसे न कळे समर्थां ते ? । शिष्याचे हित पहाण्याते । गुरूंचे मन धडपडते ॥ ३७ ॥ समर्थ ज्ञानी असल्यामुळे । वेळप्रसंगी त्यांस कळे । त्यांच्या योगलीलेमुळे । समर्थपण प्रसंगी कळे ॥ ३८ ॥ वेळ प्रसंगी लाडक्यांस । दूर लोटावे लागे त्यांस । ज्ञानाच्या शिदोरीस । सोबत होते शिष्यांस ॥ ३९ ॥ जवळ असलेल्या शिदोरीस । मातेच्या संस्कारांस । भरलेल्या ज्ञान घड्यास । फार महत्व वेळप्रसंगास ॥ ४० ॥ जैसे मायलेकरांचे असते । तैसेच गुरूशिष्यांचे असते । वात्सल्यास फार महत्व असते । जग वात्सल्यावर टिकते ॥ ४१ ॥ ऐसेच गजानन पितांबराचे । नाते होते गुरूशिष्यांचे । एकमेकांच्या ओढीचे । अतोनात वात्सल्याचे ॥ ४२ ॥ एक दिवस ऐसे जाहले । पितांबराचे मन गुंतलेले । पूजा करण्यात रमलेले । त्यातच एकरूप झालेले ॥ ४३ ॥ जे जवळ असायचे । त्यावर संतुष्ट असायचे । ऐसे वागणे पितांबराचे । गजाननाच्या शिष्याचे ॥ ४४ ॥ समर्थ वदले पितांबरास । काय नेसतोस फाटक्या वस्त्रांस ? । जुन्या पुराण्या सोळ्यास । दुसरे नको तुला नेसण्यास ? ॥ ४५ ॥ पितांबरा ! हा घे दुपेटा । हो येथून चालता । राहू नकोस येथे आता । लावू नकोस बट्टा ॥ ४६ ॥ पितांबरास वाईट वाटले । त्याला अगदी भरून आले । एका डोळ्यात हसू आले । दुसर्‍या डोळ्यात आसू आले ॥ ४७ ॥ तो दुपेटा नेसला । देहाने मनाने फुलला । क्षणभर बघत राहिला । काहि न कळे त्याला ॥ ४८ ॥ काहिंना बघवेना । ते वदले त्या क्षणा । अरे ! समर्थे दुपेटा देताना । केली कान‌उघाडण्या ॥ ४९ ॥ ही न कृपादृष्टी । ही तुझी हकालपट्टी । समर्थ अंतरंग जाणती । तेणे घडली ऐशी कृती ॥ ५० ॥ योग्याचा अंतर्भाव योगी जाणतो । दुसरा न जाणतो । हा बोल खरा ठरतो । पितांबर त्याचे उदाहरण ठरतो ॥ ५१ ॥ समर्थे हाकलवले पितांबरास । चालला पुढील रस्त्यास । निघाला पुढील कार्यास । महाराजांचे नाव करायास ॥ ५२ ॥ पाऊल पुढे पडत होते । चित्त मागे गुरूंकडे होते । महाराजांत गुंतले होते । मनाचे विचार जात नव्हते ॥ ५३ ॥ शेगाव डोळ्यासमोरून । हलत नव्हते तेथून । देहाच्या क्रिया भिन्न । मनाच्या क्रिया भिन्न ॥ ५४ ॥ मुलगी जशी सासरी जाते । तैसे त्याचे झाले होते । गुरूचे घर माहेर होते । पुढची वाट सासर होते ॥ ५५ ॥ नशिबातला सासुरवास । जो असतो प्रत्येक मुलीस । तैसा वाटत होता त्यास । दिसत होता डोळ्यांस ॥ ५६ ॥ एक आनंद मावळत होता । दुसरा उषःकालात होता । संमिश्रभाव दाटला होता । हृदय बोलके करत होता ॥ ५७ ॥ नयनी आंसवे दाटलेली । पुढची वाट धरलेली । कधीही न पाहिलेली । अगदी नवीच असलेली ॥ ५८ ॥ श्री पासून सुरू करायचे । सर्वांचेच मन राखायचे । महाराजांशिवाय जगायचे । आईशिवाय जगायचे ॥ ५९ ॥ माऊली आठवण काढताच । नाही भेटणार आत्ताच । आठवणी काढायच्या नुसत्याच । ताज्या मानायच्या त्याच ॥ ६० ॥ अशी वाट चालायची । सवय नव्हती कधी त्याची । सुखदुःखाच्या वाटेची । आईशिवाय अनुभवायची ॥ ६१ ॥ पाऊले पुढे पडत होती । जणू टाकली जात होती । अंगात शक्ती नव्हती । बोलण्याची सोय नव्हती ॥ ६२ ॥ गतकालच्या आठवणी । त्यांची होत होती उजळणी । व्यत्यय न आणला कुणी । मागच्यास पुढे टाकूनी ॥ ६३ ॥ पहिले गेल्यावाचून । दुसरे न येणार आपणहून । हेच आले घडून । पितांबर न सुटला त्यातून ॥ ६४ ॥ मागील आठवणींचे पाढे । भराभर येती पुढे । पुढच्या जीवनाचे पाढे । घोकता घोकता जाई पुढे ॥ ६५ ॥ विचारांच्या तंद्रीत अंतर कापले । त्याचे त्याला न कळले । पहाता पहाता गाव आले । कोंडोली ग्राम दिसू लागले ॥ ६६ ॥ प्रत्येक गावचे वातावरण । अगदी असते भिन्न । तत्वाचे ठराविकपण । कधी न होणार भिन्न ॥ ६७ ॥ काही विशेष दिसताक्षणी । जमावे चारचौघांनी । मनसोक्त करावी बोलणी । वाटे प्रत्येकजण शहाणी ॥ ६८ ॥ परी वेळ प्रसंगात । शहाणे मूर्ख ठरतात । मूर्ख शहाणे ठरतात । उलटे सुलटे अनुभवतात ॥ ६९ ॥ पितांबराचे असेच झाले । रात्रभर झाडावर बसावे लागले । पहाता पहाता तांबडे फुटले । कोंबड्याचे आरवणे सुरू झाले ॥ ७० ॥ गाव जागे झाले । व्यवहार सुरू झाले । पायवाटा हालचालींमुळे । सुन्नतेचे नाव विरले ॥ ७१ ॥ पक्षांचे चिवचिवणे । गायी गुरांचे हंबरणे । पोरांचे बागडणे । होत होते मुक्तपणे ॥ ७२ ॥ आंब्याच्या झाडावर । बसलेला पितांबर । पोरे तेथे जमल्यावर । हसू लागली त्यावर ॥ ७३ ॥ तो एक एक फांदी बदलत । जात होता पुढे सरकत । माकडचेष्टा होती वाटत । पोरांना कुतुहल त्यात ॥ ७४ ॥ मुंग्या मुंगळे झाडावरी । त्यास सतावे भारी । त्यातुनी सुटका होण्यावरी । ऐसे कृत्य तो आचरी ॥ ७५ ॥ दोन जमले की चार जमतात । नियम तंतोतंत पाळतात । नेमके प्रश्र्न विचारले जातात । नेमकी उत्तरे मिळतात ॥ ७६ ॥ नियम तेथे खरा ठरला । जन समुदाय गोळा झाला । जो तो कारण पुसु लागला । त्याच्या ऐशा कृत्याला ॥ ७७ ॥ पितांबरास विचारले । त्याने सर्वांस सांगितले । जनांस कुतुहल वाटले । सार्‍यांनाच न ते पटले ॥ ७८ ॥ पट्टशिष्य गजाननाचा । बोल ऐकता पितांबराचा । गावकर्‍यांस न पटला त्याचा । म्हणती डाव भोंदूगिरीचा ॥ ७९ ॥ शिष्य ओळखला जातो । तो न सांगावा लागतो । सारा भार कृतीवर असतो । कृतीनेच नराचा नारायण होतो ॥ ८० ॥ जमलेले म्हणती त्यास । खोटे बोलू नकोस । भोंदूगिरी करू नकोस । बाया पोरांना फसवू नकोस ॥ ८१ ॥ खरे खोटे शोधून काढू । खोटे ठरता बडवून काढू । अंगाची सालटे काढू । नको बाया बापड्या भोंदू ॥ ८२ ॥ चोर ढोंगी टवाळखोर । तू बोलशील बडविल्यावर । सर्व निमूटपणे सांगितल्यावर । तुला न त्रास देणार ॥ ८३ ॥ उगाच सोंग करू नकोस । भलते सलते सांगू नकोस । आम्ही ओळखतो गजाननास । लावू नकोस बट्टा त्यास ॥ ८४ ॥ महाराजांनी वठलेल्या आंब्याला । फळे आणली त्याला । नुसती पालवी आण त्याला । दाखव तुझ्या चमत्कृतीला ॥ ८५ ॥ अनपेक्षितपणे प्रसंग आला । पितांबर अस्वस्थ झाला । गुरूंचा धावा करू लागला । मनोमन आळवू लागला ॥ ८६ ॥ म्हणाला महाराज । कैसा प्रसंग आला आज । तुम्हीच राखा माझी लाज । अन्यथा बेअब्रु होईल आज ॥ ८७ ॥ भास्करा वैकुंठा पाठविले । मी ऐसे काय केले ? । सर्वांनी मला घेरले । संकट विनाकारण ओढवले ॥ ८८ ॥ तूच धाव आता । तूच ठरणार त्राता । तू दिलेला हा दुपेटा । तूच म्या रक्ष आता ॥ ८९ ॥ पालवी न फुटता । लोक मारतील लाथा । खरा शिष्य ठरेल खोटा । तुझ्या नावाला लागेल बट्टा ॥ ९० ॥ त्याला प्रेरणा मिळाली । त्याला हिंमत आली । नामगजराची युक्ती सुचली । तीच तारती झाली ॥ ९१ ॥ लोकांना अट घातली । धून लावता धावेल गुरू माऊली । लाभता कृपासावली । वृक्षास येतील पाने भली ॥ ९२ ॥ गावकरी वदले त्यावर । धून लावल्यावर । जर पालवी न फुटणार । तर आम्ही तुला बडवणार ॥ ९३ ॥ त्याच्या सुरात सूर मिसळला । काही काळ लोटला । सुकलेल्या फांदीला । चीक दिसू लागला ॥ ९४ ॥ जो तो पाहू लागला । आश्चर्याचा धक्का बसला । स्वतःस चिमटे काढु लागला । भानाचाही विसर पडला ॥ ९५ ॥ लोकांस जादूचे खेळ वाटले ।लोकांस नजरबंदीचे खेळ वाटले । प्रथम विश्वास न बसले । खरे बोलणे खोटे वाटले ॥ ९६ ॥ अखेर पितांबर शिष्य पटले । गावकरी माफी मागू लागले । विनम्र भावे वंदन केले । फुलहार गळ्यात घातले ॥ ९७ ॥ पितांबर शहाणा ठरला । गैरसमज दूर झाला । पालवी फुटली डहाळीला । हिरवा रंग पालवीला ॥ ९८ ॥ गावकर्‍यांनी पितांबरास ओळखले । त्याला पालखीतुनी मिरविले । त्याचे शब्द झेलू लागले ॥ ९९ ॥ गुरूकृपेनेच सर्व घडते । अन्यथा विपरीत घडते । उगाच नाही कुणी शब्द झेलत । कृती असावी लागते श्रेष्ठ ॥ १०० ॥ पितांबराच्या शोधात गुरू येतील । वासराच्या शोधात गोमाता येईल । सारे गाव पावन होईल । नव चैतन्य निर्माण होईल ॥ १०१ ॥ त्या झाडास पुढे जी फळे आली । इतरांपेक्षा जास्त आली । गावकर्‍यांनी चूक सावरली । कोंडोली कर्मभूमी ठरली ॥ १०२ ॥ जैसे रक्षिले पितांबरास । तैसेच रक्षो तुम्हास । पाळावे गुरू आज्ञेस । जेणे व्हाल गुरूकृपेस ॥ १०३ ॥ एकेकाची कर्मभूमी निश्चित असते । गुरू गजाननाचे तसेच होते । शेगाव सुटत नव्हते । तेच त्यांच्या नशिबी होते ॥ १०४ ॥ गावकरी सेवा करीत होते । समर्थ एका घरी स्थिर नव्हते । त्यांना भक्त आवडत होते । एकाकडे रहाणे पसंत नव्हते ॥ १०५ ॥ उगाच भक्तांच्या घरच्यांस । नको उपाध्या वाट्यास । सार्‍यांनीच त्यांच्या तैनातीस । पसंत नव्हते त्यांस ॥ १०६ ॥ खर्‍या अर्थी योगीपुरूष होते । नुसत्या देहाने जगत नव्हते । प्रत्येक कृतीतून पटवत होते । उगाचच स्वतःस मिरवत नव्हते ॥ १०७ ॥ वारंवार प्रसंग यायचे । नित्य नविन घडायचे । जशास तसे न वागायचे । हेच सर्वांना पटवायचे ॥ १०८ ॥ सहज कृतीतुन उतरत होते । अंगवळणीच पडले होते । मुद्दाम काहिच करायचे नसते । हेच ते पटवत होते ॥ १०९ ॥ जसा कुणी पाहुणा येता । मुद्दाम चहा चांगला करता । काहितरी न्यूनता । हेच तुम्ही अनुभवता ॥ ११० ॥ मुद्दाम न काही करायचे । सहजपणे जगायचे । ओढून ताणून न वागायचे । हेच त्यांना पटवायचे ॥ १११ ॥ जो सर्वांची मने जिंकणार । त्यांच्या हृदयात वसणार । जो तो त्यांचाच होणार । का न तो योगी होणार ? ॥ ११२ ॥ ऐसी कृती करावी । दुसर्‍याच्या हृदयात ठसावी । सदा विशेष ठरावी । प्रेरणादायक ठरावी ॥ ११३ ॥ समर्थ शिकलेले नव्हते । त्यांना उपजतच होते । पुष्कळसे उपजततेवर असते । जे सारे शिक्षणातून न मिळते ॥ ११४ ॥ योगी सर्व सारखे मानणार । घरदार विशेष नसणार । जो दिशा हेच वस्त्र समजणार । कैसा घरास महत्व देणार ? ॥ ११५ ॥ एके दिवशी सर्व भक्तांस । समर्थे सांगितले त्यांस । कुणाचे घर नको आम्हांस । जाऊ दुसर्‍या जागेस ॥ ११६ ॥ गावात दुफळी माजली फार । जो तो कुरापती काढणार । हे न मला खपणार । मी न आता येथे रहाणार ॥ ११७ ॥ मी निघालो, सोडीन गाव । नको हे शेगाव । शोधीन दुसरा गाव । गर्दीस न मिळे वाव ॥ ११८ ॥ विधात्यास मंजूर नव्हते । प्रारब्ध आडवे होते । कर्मभूमी बदलत नव्हते । तेणे शेगावीच झाले रहाते ॥ ११९ ॥ कुणाची बदली करणे । अथवा ती रद्द करणे । हे अधिकार्‍यांचे पहाणे । त्यानेच अधिकार गाजवणे ॥ १२० ॥ अधिकार्‍यास विनविता । त्याची मर्जी संपादन करता । हेतू साध्य करता । अन्यथा विपरित भोगता ॥ १२१ ॥ ईश्वर जगात कर्ता । पालन कर्ता नि त्राता । सर्वोच्च अधिकार हाता । सूत्रे चालन कर्ता ॥ १२२ ॥ भक्तांच्या प्रार्थना । ईश्वरास नाना । समर्थांनी तेथून हलण्या । नव्हते पसंत कुणा ॥ १२३ ॥ प्रेरणा दिली भक्तांस । भक्त वदले समर्थांस । माफी असावी कृत्यांस । सोडू नका शेगावास ॥ १२४ ॥ तुम्ही सांगाल ते ते कृतीतुनी । नाही दुखवणार कुणी । विनवणी केली भक्तांनी । जाऊ नये शेगावातुनी ॥ १२५ ॥ जेव्हा कुणी तयार नसते । गळीच उतरवावे लागते । शेगावकर हुशार होते । पक्के मुरलेले होते ॥ १२६ ॥ समर्थांस पटवणे सोपे नव्हते । शेगावकर योग्य होते । सरस पट्टीतले होते । सोडण्यास तयार नव्हते ॥ १२७ ॥ समर्थांची कृपादृष्टी । तीच होती आधारमूर्ती । उपाधी वाटत नव्हती । परी सोबतच होती ॥ १२८ ॥ अंधारातून प्रकाशाकडे । नेण्यास समर्थ बापडे । खरा आधार सापडे । कोण त्यांना सोडे ? ॥ १२९ ॥ वागणूक अशी असावी । दुसर्‍यांस सोबत ठरावी । निःस्पृहतेची जोड हवी । शुद्ध चित्ताची साथ हवी ॥ १३० ॥ शब्द मोडवेना भक्तांचा । केवढा कनवाळू मनाचा । शोधून न सापडायचा । ऋणानुबंध शेगावचा ॥ १३१ ॥ भाग्य शेगावकरांचे । समर्थे ऐकावे त्यांचे । बदलावे विचार स्वतःचे । भक्तांचे होऊन रहावयाचे ॥ १३२ ॥ अशी जागा घ्यावी । कुणाची मालकी नसावी । मला मिळता ग्वाही । राहीन मी शेगावी ॥ १३३ ॥ समर्थांचे चमत्कारिक । नाही व्यवहारिक । हवी असता त्यांची जवळिक । पाळावा लागतो त्यांचा शब्द एकेक ॥ १३४ ॥ भक्तांस पडला प्रश्र्न । केले त्यांचे स्मरण । समर्थे जाणले मन । टाळला बिकट क्षण ॥ १३५ ॥ समर्थ वदले भक्तांस । सरकार देईल जागेस । मागावे जागेस । येईल त्यात यश ॥ १३६ ॥ जागा नाही सरकारची । मालकी सच्चिदानंदाची । छाती न त्याची व्हावयाची । जागा नाकारण्याची ॥ १३७ ॥ तेव्हा सत्ता परकीयांची । इंग्रज सरकारची । वेळ होती भारताची । त्यांच्या गुलामगिरीची ॥ १३८ ॥ भारतवासी गुलाम होते । इंग्रजांस भुलवणे सोपे नव्हते । समर्थांचे सहाय्य होते । तेणे सर्व जुळत होते ॥ १३९ ॥ गुरू आज्ञा प्रमाण मानले । जागेसाठी अर्ज केले । अधिकार्‍यांनी वाचले । सर्व विचारात पडले ॥ १४० ॥ त्यावर बैठकी झाल्या । सल्ला मसलती झाल्या । काही अटी घातल्या । अर्ज मंजूर झाला ॥ १४१ ॥ लेखी जवाब मिळाला । सरकारचा होकार कळला । आनंदास पारावार न राहिला । समर्थांचा शब्द खरा ठरला ॥ १४२ ॥ मठासाठी “करी” साहेबांनी । जागा दिली तत्क्षणी । एक एकर जागा देऊनी । तपशील दिला धाडुनी ॥ १४३ ॥ समर्थांची जैशी कृपा शेगावास । तैशी असुद्या बडोद्यास । भव्य दिव्य वास्तू बडोद्यास । हीच ईच्छा गणामहाराजास ॥ १४४ ॥ जागा मिळाल्यावर जे घडते । ते पुढिल अध्यायी येते । प्रसंग वाचावेत शांत चित्ते । होईल प्रसन्न मन त्याते ॥ १४५ ॥ नका आचरू दंभाचारास । नको वैभवाच्या प्रदर्शनास । ऐसे आळवावे गजाननास । पालवी फुटेल कल्पवृक्षास ॥ १४६ ॥ ॥ शुभं भवतु ॥ ॥ श्री गणपती सरस्वतीर्पणमस्तु ॥ ॥ इति श्रीगुरूगजाननलीला ग्रंथस्य द्वादशोऽध्यायः संपूर्णः ॥

Aliquam sed mauris

Sed lorem ipsum dolor sit amet et nullam consequat feugiat consequat magna adipiscing tempus etiam dolore veroeros. eget dapibus mauris. Cras aliquet, nisl ut viverra sollicitudin, ligula erat egestas velit, vitae tincidunt odio.

Contact

Address
B2/201 Ashvamegh 3, Akota Munj Mahuda Rd. • Vadodara, GJ 390 020 • INDIA
Email
info@ganamaharaj.org