श्री गणेशाय नम: । हे परमेश्वरा नारायणा । माझ्या मनाचे हेतू नाना । पूर्ण करण्यास करू नको ना ना ॥ १ ॥ तुझ्या होकारातच होते साकार । तूच भक्तांना वाटतो आधार । नको बनवू निराधार । तुझ्यावरच भरवसा ठेवणार ॥ २ ॥ एक देतो दुसरा रक्षितो । हे गणामहाराज जाणतो । तुला स्थानास येण्यास विनवितो । ग्रंथास सहाय्य करण्या विनवितो ॥ ३ ॥ गुरू तोषण्यात आनंद मिळतो । हे भक्तगण जाणतो । गुरू वेळोवेळी परिक्षा घेतो । उत्तीर्णास जवळ करतो ॥ ४ ॥ तू यावे माझ्या स्थानास । द्यावे भक्तांच्या परिक्षेस । प्रमाणपत्र द्यावे उत्तीर्णास । आनंद होईल भक्तांस ॥ ५ ॥ मी तोषीन भक्त होण्या उत्तीर्ण । तू जाण माझे मन । मी न मागणार अन्य । कर तू त्यांना लोकमान्य ॥ ६ ॥ येऊ दे संकट भक्तांना । तव कृपे होणार्‍या लोकमान्यांना । तुझ्यावाचुन न तारे त्यांना । हे माहित आहे भक्तांना ॥ ७ ॥ लोकमान्यांचे असेच झाले । त्यांच्यावरही संकट आले । समर्थ आशिष मदतरूप झाले । तेणे बाळ लोकमान्य झाले ॥ ८ ॥ ऐसे झाले प्रसंगास । शिवजयंती उत्सव अकोल्यास । बोलाविले बड्या बड्या नेत्यांस । आमंत्रिले लोकमान्यांस ॥ ९ ॥ शिवाजी सुपुत्र जिजामातेचा । सुपुत्र भारतमातेचा । प्राणाचीही पर्वा न करायचा । तिच्यासाठीच जगायचा ॥ १० ॥ शिवाजीची माता जिजाबाई । शूरवीरांचे संस्कार देई । पिता शहाजी परगावी । मोगलांच्या सेवेत राही ॥ ११ ॥ शिवाजी मूळचा शूर वीर । त्यात मातेच्या शिकवणीची भर । मावळे लाभले थोर । अनेक किल्ले केले सर ॥ १२ ॥ गनिमीकावे अजमावून । शत्रुंवर जरब बसवून । स्त्रियांची अब्रू रक्षून । परी कुणास न लुबाडून ॥ १३ ॥ समर्थ रामदास गुरू लाभले । जीवन प्रेरणामय झाले । ऐसे पराक्रम त्याने केले । इतिहासात पान अमर झाले ॥ १४ ॥ जो अमर राही नामाने । वागे ऐशा कृतीने । समाजासाठीच त्याचे जीणे । त्याचे उत्सव होती नेमाने ॥ १५ ॥ प्रेरणा मिळण्याच्या हेतूने । होती प्रेरणात्मक भाषणे । येतात वक्ते उत्साहाने । जे निमंत्रिले जातात प्रामुख्याने ॥ १६ ॥ शिवजयंती उत्सव अकोल्यास । वाटे बोलवावे लोकमान्यांस । द्यावे सणसणीत भाषणास । लोकांस प्रेरणा मिळण्यास ॥ १७ ॥ समर्थांस बोलवा सभेस । असे वाटले काही जणांस । रामदास छत्र शिवाजीस । तैसे समर्थ टिळकांस ॥ १८ ॥ काही फुटले मंडळीतले । दुसर्‍यांस ते म्हणू लागले । नको वेडा-पिसा करेल चाळे । जेणे सभा उधळे ॥ १९ ॥ आधीच उत्सव पहिला होईल । त्यात जर समर्थ येतील । तर गोंधळच होईल । तोच शेवटचा होईल ॥ २० ॥ नको समर्थांस आमंत्रण । नको उपाधीस आमंत्रण । होऊ फजीतीस कारण । न वठणार टिळकांचे भाषण ॥ २१ ॥ तो कसला आला योगी ? । तो तर पक्का ढोंगी । दारोदारी भीक मागी । योग्याचे लक्षण न त्याचे अंगी ॥ २२ ॥ नको नको ते सोंग येथे । उपाधीचे धेंड येथे । चालत्या गाडीत खीळ ते । तेणे येती नाना संकटे ॥ २३ ॥ जो तो टाळे उपाधीला । कोण पत्करणार तिला ? । समर्थ येता सभेला । गोंधळ होईल सभेला ॥ २४ ॥ जनांस न कळे गूढ । मूढांस वाटते दुसरा मूढ । जो समर्थांस म्हणे मूढ । तोच समजावा मूढ ॥ २५ ॥ जो अश्रद्धावान असणार । तो मूढ असणार । तो कधीही न सुधरणार । तो ऐसेच बोलणार ॥ २६ ॥ ज्यांनी समर्थांस नाकारले । तेच प्रसंगी मूढ ठरले । ज्यांनी त्यांना निमंत्रिले । तेच प्रसंगी योग्य ठरले ॥ २७ ॥ शेवटी आमंत्रण करणे ठरविले । दादासाहेब खापर्ड्यांस सोपविले । दादासाहेब शेगावी गेले । समर्थांचे चरण धरले ॥ २८ ॥ ऐसे न करणार आम्ही चाळे । जेणे सभा उधळे । खापर्डे चकित झाले । समर्थ अंतर्ज्ञानी पटले ॥ २९ ॥ अंतर्ज्ञानी पटतो प्रसंगाने । नच आत्मस्तुतीने । नुसत्या वाणी प्रभावाने । वा दुसरे कोणी सांगितल्याने ॥ ३० ॥ दिवस उजाडला सभेचा । पारावार न आनंदाचा । आनंद होता उत्सवाचा । नव्हे उत्सव होता आनंदाचा ॥ ३१ ॥ एकातच लाभे अनेक । जो तो सभेस उत्सुक । दूरदूरहुन आले कित्येक । भाषण प्रभावी तितकेच ॥ ३२ ॥ वाट पहात होते गजाननाची । एका समर्थाची । एका योग्याच्या लीलेची । एका सामर्थ्याची ॥ ३३ ॥ एका आशिर्वादाची । एका कृपादृष्टीची । सोबत असावी त्याची । हीच ईच्छा असते सर्वांची ॥ ३४ ॥ कृपादृष्टी असावी । कृती अमर ठरावी । ऐसी अपेक्षा असावी । ती योग्यच ठरावी ॥ ३५ ॥ टिळक मुळातच सोने । त्यात भर पाडावी गजानने । एका योग्याच्या सहवासाने । एका योग्याच्या आशिषाने ॥ ३६ ॥ सोने काय न लकाकणार ? । त्याचे तेज फाकणार । एका तेजात दुसरे तेज मिसळणार । तेजस्वी दैदिप्यमान वातावरण होणार ॥ ३७ ॥ सार्‍या जनांचे डोळे लागलेले दोघांकडे । एक डोळा टिळकांकडे । दुसरा डोळा योग्याकडे । घ्यावया जीवनाचे धडे ॥ ३८ ॥ तैसेच होते कानांचे । विशेष श्रवण करण्याचे । लक्ष लागलेले सर्वांचे । चाहते होते दोघांचे ॥ ३९ ॥ टिळक उभे राहिले । भाषणास प्रारंभ केले । उत्सवाचे महत्व सांगितले । एकोप्याचे महत्व समजाविले ॥ ४० ॥ गर्दी वाढत होती । उत्स्फूर्त हजेरी होती । उत्सुकता शिगेला पोहोचली होती । विशेष ऐकण्याची वाट पहात होती ॥ ४१ ॥ टिळक ठासून बोलले । त्यांना न भान राहिले । इंग्रजांवर कोरडे ओढले । त्यासाठीच ते आलेले ॥ ४२ ॥ महाराजांना हे न खपले । पुढचे प्रसंग जाणले । त्यांने टिळकांना हटकले । समयसूचकता सुचवले ॥ ४३ ॥ कर्तबगारी नि देशभक्ती । बाणेदार वृत्ती नि कणखर वृत्ती । हरघडीस साथ होती । तीच प्रवृत्त करत होती ॥ ४४ ॥ टिळक बोलतच राहिले । पुढच्या प्रसंगास कारण बनले । सरकारने दोषी ठरविले । सरकारने खटले भरले ॥ ४५ ॥ महाराज चर्चेचे निमित्त बनले । नव्हे महाराजच कारणीभूत झाले । समर्थांचे सामर्थ्य जागे झाले । हे येथे प्रत्ययास आले ॥ ४६ ॥ सभा संपता श्रोते घरी गेले । टिळकांवर मात्र खटले भरले । नेहमीचेच झाले । टिळकांस विशेष न वाटले ॥ ४७ ॥ साथीदारांचे प्रयत्न चालले । नवस अंगार्‍याचेही प्रयत्न झाले । खापर्डे कोल्हटकरही निघाले । खापर्डे कोल्हटकरांस म्हणाले ॥ ४८ ॥ तुम्ही जावे शेगावास । समर्थांना साकडे घालण्यास । मी जातो मुंबईस । कोर्टाच्या कामास ॥ ४९ ॥ कोल्हटकर आले दर्शनाला । समर्थांचे आशिष घ्यायला । प्रत्येकाचा हेतू जरी वेगळा । परी एकच होते कृतीला ॥ ५० ॥ सवय होती महाराजांना । आशिर्वाद द्यावे भक्तांना । केव्हा पहातो महाराजांना । ऐसे झाले कोल्हटकरांना ॥ ५१ ॥ येथे एक प्रसंग घडला । कोल्हटकरांची परिक्षा घ्यायला । महाराज होते निद्रेला । उठेनात काही केल्या ॥ ५२ ॥ दोन दिवस तसेच गेले । तिसर्‍या दिवशीचेही तसेच झाले । महाराज काही न बोलले । कोल्हटकरांस तिष्ठत ठेवले ॥ ५३ ॥ परी कोल्हटकर चिकाटीचे होते । कळकळ व्यक्त करत होते । ते तेथेच बसले होते । आशिषावाचून जाणार नव्हते ॥ ५४ ॥ उजाडले चवथ्या दिवसास । समर्थ वदले कोल्हटकरांस । सरकार चालवेल खटल्यास । त्रास होईल टिळकास ॥ ५५ ॥ सज्जनांस त्रास दिल्यावाचून । राज्यक्रांतीचे न नाव निशाण । समाजास जागृत केल्यावाचून । सज्जन न राहे स्वस्थ बसून ॥ ५६ ॥ सरकार न ह्याला सोडणार । परी वचपा काढणार । जो सरकार विरूद्ध जाणार । त्याला शिक्षाच होणार ॥ ५७ ॥ कोल्हटकर निराश झाले । पुन्हा पुन्हा विनवू लागले । त्यावर समर्थ म्हणाले । त्याच्या भाग्यातलेच सांगितले ॥ ५८ ॥ परी देतो भाकरीच्या प्रसादाला । तू द्यावेस टिळकाला । जगी अमर करायला । हाच प्रसाद उपयोगाला ॥ ५९ ॥ कोल्हटकर निराशेने परतले । कोल्हटकर टिळकांस भेटले । सारे वृत्तांत सांगितले । भाकरीचा प्रसाद देते झाले ॥ ६० ॥ दीर्घ दृष्टीच्या टिळकांस पटले । नशिबातले पुढचे ताट दिसले । मन खंबीर केले । टिळक कोर्टात हरले ॥ ६१ ॥ तुरूंगवास घडले । तुरूंगात गीतारहस्य रचले । यावत्चंद्रदिवाकरौ अमर झाले । टिळक लोकमान्य झाले ॥ ६२ ॥ गुरू भोग नाही टाळत । परी मदतरूप सुसह्य करण्यात । नाना प्रकारचे भक्त भेटत । आपला हेतू सांगत ॥ ६३ ॥ कोल्हापूरचा श्रीधर गोविंद काळे । गरिबीने नाना विचार चाले । मॅट्रीक पास झाले । इंटर नापास झाले ॥ ६४ ॥ वृत्तपत्र वाचत राहिले । नोकरीच्या शोधात राहिले । ओयोमा टोगोचे चरित्र वाचले । जपानचे विचार सुरू झाले ॥ ६५ ॥ जपानला जावे । यंत्रविद्येचे शिक्षण घ्यावे । भरपूर पैसे मिळवावे । आपले दारिद्र्य दूर करावे ॥ ६६ ॥ एकदा अकोल्याला । मित्रास भेटण्या गेला । परतताना शेगावी उतरला । समर्थांचे दर्शन घ्यायला ॥ ६७ ॥ समर्थ चरणी माथा ठेवला । कृपाशिष मागू लागला । समर्थे हेतू ओळखला । बोलले श्रीधर काळ्याला ॥ ६८ ॥ जाऊ नकोस तू विलायतेला । उच्च शिक्षण घ्यायला । येथे न कमी पडणार तुला । भाग्य येईल उदयाला ॥ ६९ ॥ समर्थांचे बोल खरे ठरले । श्रीधर एम्. ए. झाले । कॉलेजचे प्रिन्सिपॉल झाले । श्रीधर काळे उदयास आले ॥ ७० ॥ गुरूवर ठेवलेल्या निष्ठेस । काही न कमी पडले श्रीधरास । भाग्य आले उदयास । तैसेच येवो सर्व भक्तांस ॥ ७१ ॥ ॥ शुभं भवतु ॥ ॥ श्री गणपती सरस्वतीर्पणमस्तु ॥ ॥ इति श्रीगुरूगजाननलीला ग्रंथस्य पंचदशोऽध्यायः संपूर्णः ॥

Aliquam sed mauris

Sed lorem ipsum dolor sit amet et nullam consequat feugiat consequat magna adipiscing tempus etiam dolore veroeros. eget dapibus mauris. Cras aliquet, nisl ut viverra sollicitudin, ligula erat egestas velit, vitae tincidunt odio.

Contact

Address
B2/201 Ashvamegh 3, Akota Munj Mahuda Rd. • Vadodara, GJ 390 020 • INDIA
Email
info@ganamaharaj.org