श्री गणेशाय नम: । हे ईशा परमेश्वरा । निराकारातून येणार्‍या । साकारातून परत जाणार्‍या ॥ १ ॥ हे नृसिंहा श्रीकृष्णा । श्रीरामा गौरीरमणा । आपण यावे माझ्या स्थाना । सरस्वतीचा मनोरथ पूर्ण करण्या ॥ २ ॥ भोवतालचे वातावरण । धुंद करते माझे मन । कैसे होईल ग्रंथ लेखन ? । कैसा होईल त्यात रममाण ? ॥ ३ ॥ नको गुंतवू त्यात । मी गुंतता त्यात । पूर्ण न होणार ग्रंथ । भंग होईल मनोरथ ॥ ४ ॥ हे ईशा परमेश्वरा । आनंद टिकविणार्‍या । धावून यावे सत्वरा । कृपा करावी ह्या लेकरा ॥ ५ ॥ करतो पुन्हा पुन्हा विनवणी । चालू राहू दे लेखणी । तुझ्या कृपेवाचूनी । न चाले लेखणी ॥ ६ ॥ तूच माझे ऐकतो । जेणे तुला विनवितो । पुन्हा पुन्हा आमंत्रितो । विश्वास तुझ्यावर ठेवतो ॥ ७ ॥ तू भेटतो वेगळ्या रूपात । भक्तांसही भेटावे त्या रूपात । विश्वास ठेवतील माझ्यात । अन्यथा कुणी न रहाणार विश्वासात ॥ ८ ॥ जेणे होईल भक्तीचा र्‍हास । तूच कारण तुझ्या र्‍हासास । तूच तुझ्या नाशास । मी न कारण दोषास ॥ ९ ॥ हे सर्व जाणणार्‍या । निराकारा परमेश्वरा । घात करू नको बरा । हा हेतू जाण जरा ॥ १० ॥ आपल्या मनातले बेत । परमेश्वर जाणतो तंतोतंत । तसेच भक्तांच्या जे जे मनात । ते ते समर्थ जाणतात ॥ ११ ॥ काशीनाथ गर्दे एक भक्त । जे जे हेतू त्याच्या मनात । ते ते महाराज जाणत । वेळ प्रसंगी साध्य करत ॥ १२ ॥ खामगावचा गर्दे काशीनाथ । जाणत होता महाराज योगी निश्चित । योग लीला अनुभवण्यात । सदा आला विचार मनात ॥ १३ ॥ महाराजांच्या दर्शनास आला । नोकरीचा विचार मनातला । अंतर्ज्ञाने समर्थे जाणला । पटवले काशिनाथाला ॥ १४ ॥ समर्थ कोपरखळी मारतात । तेणे त्यास सुचवितात । पोस्टमन तुझ्या दारात । तुझे टपाल त्याच्या हातात ॥ १५ ॥ तुझ्या बदलीचे वृत्त । आहे त्या टपालीत । झाला आश्चर्यचकित । कैसे जाणतात समर्थ ? ॥ १६ ॥ नतनम्र झाला । आशिष मागता झाला । प्रसाद घेऊन निघाला । घरी येऊन पोहोचला ॥ १७ ॥ तो तेच दृष्य पहाता झाला । तारवाला तार घेऊन आला । तारेतला मजकूर वाचला । मुनसफीच्या हुद्द्यावर बदली झालेला ॥ १८ ॥ आनंदाने काही सुचेना । समर्थांवाचून काही दिसेना । योगी म्हटल्यावाचून रहावेना । वाटे पुन्हा पुन्हा जावे दर्शना ॥ १९ ॥ पुन्हा शेगाव आठवले । महाराज आठवले । मनोमनी वंदन केले । शेगावीच आहोत असे वाटले ॥ २० ॥ जसे आपणास कामानिमित्ये । बाहेर जावे लागते । तसे महाराज जात होते । भक्तमनोरथ पुरवत होते ॥ २१॥ येथे फरक मोठा जाणवतो । आपण आपल्यासाठी जगतो । आपलीच तुंबडी भरतो । योगी दुसर्‍यासाठी जगतो ॥ २२ ॥ जावे लागते कित्येक गावांस । असेच एकदा नागपुरास । गोपाळबुटीच्या घरास । गेले आशिष देण्यास ॥ २३ ॥ गोपाळबुटीचा भव्य वाडा । वैभव संपत्ती घाले सडा । लक्ष्मीनारायण देखिल वेडा । त्याने पसंद केला वाडा ॥ २४ ॥ सर्व गुरुकृपेने मिळते । गुरूकृपेनेच टिकते । आपले काहीच नसते । हे सत्य माहित होते ॥ २५ ॥ महाराज गेले त्याच्या घरी । गान भजन कीर्तन वरचेवरी । ज्ञानाच्या वर्षावाच्या सरी । नादाच्या उमटत होत्या लहरी ॥ २६ ॥ होती देवघेव ज्ञानाची । हिम्मत नसे कुणाची । ते थांबविण्याची । लक्षणे होती भाग्याची ॥ २७ ॥ जो तो होता आनंदात । सुखदुःख विस्मरणात । यथेच्छ होत होता तृप्त । आनंदास होता लुटत ॥ २८ ॥ एक एक घरी नेत होता । जमवत होता । कुणी अडवत नव्हता । जो तो स्वतंत्र होता ॥ २९ ॥ ऐसी होती कर्मगती । जी सहज चालली होती । भोजनाच्या त्या पंक्ती । एका मागुनी एक त्या उठती ॥ ३० ॥ अन्नदान पुण्य त्या बुटीस । आले त्याच्या भाग्यास । खोचत होता कनवटीस । कृतकृत्य होत होता मनास ॥ ३१ ॥ जो एक एक क्षण यायचा । तो तेथेच थांबायचा । तेथून हलण्याचा । त्याचा विचार नसायचा ॥ ३२ ॥ पुण्यक्षण वाढत होते । कमी होत नव्हते । सत्वृत्तीचे होते भरते । सत्कर्माशी जडले नाते ॥ ३३ ॥ गोपाळबुटीच्या घरचे । काय पुसावे त्यांचे । म्हणती थोर भाग्य आमचे । हेच म्हणायचे ॥ ३४ ॥ होते एकाच्या भाग्यात । दुसर्‍याचे भाग्य मिसळत । आनंदास द्विगुणित करत । सारे सहज होते घडत ॥ ३५ ॥ परंतु ह्या सर्वास । विविक्षित मर्यादा त्यास । माहित होती विधात्यास । नव्हती गोपाळ बुटीस ॥ ३६ ॥ विधाता नसतो एकट्याचा । तो असतो सर्वांचा । हेच सर्वांना पटवण्याचा । हेतू होता त्यांच्या मनाचा ॥ ३७ ॥ योग्यवेळेस सारे घडते । मुद्दाम करायचे नसते । योगायोगाने होते । ठरलेल्या वेळी अचूक होते ॥ ३८ ॥ नागपूरच्या गोपाळ बुटीस । आनंद जितका मनास । तितका हरी पाटलास । शेगावी गुरू विरह त्रास ॥ ३९ ॥ होता विरहाने तडफडत । जेणे त्याचे मन अस्वस्थ । लक्ष नव्हते व्यवसायात । नव्हते निद्रा भोजनात ॥ ४० ॥ जसे लेकराची माता । परगावी जाता । जी स्थिती होते चित्ता । ती तो झाला अनुभवता ॥ ४१ ॥ हरी मातेच्या भेटीला । झाला अगदी उतावळा । तो न थांबू शकला । अगदी अधीर झाला ॥ ४२ ॥ मनाचा तोल गेला । स्वतःशीच बोलता झाला । आत्ताच जावे नागपुराला । गोपाळ बुटीच्या वाड्याला ॥ ४३ ॥ विचारात दिवस गेला । परी एक दिवस उजाडला । तो शेवटी नागपुरला गेला । महाराजांना आणायला ॥ ४४ ॥ हे जाणले महाराजांनी । अंतर्ज्ञानानी । गोपाळास बोलावुनी । सांगितले तत्क्षणी ॥ ४५ ॥ गोपाळ समजला मनास । विरह दुःख झाले त्यास । महाराज सोडतिल आपणास । आता मुकू आनंदास ॥ ४६ ॥ महाराजांना नाही म्हणवेना । गुरू चरण सोडेना । गुरू चरणाविना । होईन मी सुनासुना ॥ ४७ ॥ पंगत चालू असता । हरी पाटिल झाला येता । केव्हा पहातो समर्थां ? । असे झाले त्याच्या चित्ता ॥ ४८ ॥ महाराजे प्रसंग ओळखला । बुटीस समजावला । बळी नको आग्रहाला । हरी आला मला घ्यायला ॥ ४९ ॥ इकडे भोजन पंगत । विचार चक्रे बुटीच्या मनात । अर्धे लक्ष पंगतीत । अर्धे लक्ष पुढच्या विचारात ॥ ५० ॥ त्याने विनविले हरीस । सर्व बसले भोजनास । नेऊ नये महाराजांस । ऐशा समयास ॥ ५१ ॥ बुटीने हरी पाटिलास । केला आग्रह भोजनास । म्हणे बसावे भोजनास । मग जावे शेगावास ॥ ५२ ॥ आत्ताच तुम्ही घेऊन जाता । गोंधळ माजेल तत्वता । ब्राह्मण उपाशी उठता । पाप येईल माझ्या वाट्या ॥ ५३ ॥ बोलणे पटले हरीस । संमती दिली भोजनास । होऊ दिले भोजनास । आनंद झाला गोपाळास ॥ ५४ ॥ गोपाळाने म्हणावे । एक एक क्षण जाऊ नये । ब्राह्मणांनी भोजनात गुंतावे । तेवढेच पुण्य खोचण्यास मिळावे ॥ ५५ ॥ पुण्याईला हपापलेला फार । गुरूस न सोडण्यास तयार । भोजन उरकल्यावर । महाराज निघाले जाण्यास तयार ॥ ५६ ॥ गोपाळाची वाणी मौन राहिली । डोळ्यात आसवे आली । पती पत्नी चरणी पडली । म्हणे ईच्छा अपूर्णच राहिली ॥ ५७ ॥ तिच्या हेतूस ओळखले । भाळी कुंकू लावले । तिला आशिर्वाद दिले । पुढे तिला पुत्ररत्न झाले ॥ ५८ ॥ महाराज सांगती भक्तांस । ऐसे करावे भक्तीस । पात्र ठरावे आशिर्वादास । पात्र ठरावे गुरूकृपेस ॥ ५९ ॥ परत जाताना शेगावास । दिले दर्शन अनेकांस । गेले सीताबर्डीस । गेले रामटेकास ॥ ६० ॥ महाराज आले शेगावी । भक्तगण त्यांची वाट पाही । जो तो दर्शनास येई । कृपाशिष घेऊन जाई ॥ ६१ ॥ एकदा महाराजे बाळाभाऊस । अंतर्ज्ञानाने सांगितले त्यास । शेगावच्या मठास । येत आहेत दर्शनास ॥ ६२ ॥ वासुदेवानंद सरस्वती । वसती माणगावाप्रती । भेटण्यास उत्सुक अती । उद्या येणार निश्चिती ॥ ६३ ॥ तसेच धारचे रंगनाथ । उत्सुक भेटण्यास । येणार शेगावात । उद्या निश्चित ॥ ६४ ॥ दुसरे दिवशी तसेच घडले । दोघेही तेथे आले । सांकेतिक बोलणे झाले । बाळाभाऊस आश्चर्य वाटले ॥ ६५ ॥ समर्थ वदती बाळाभाऊस । कर्म, भक्ती, योगाने गेल्यास । जाल ज्ञानमार्गास । तेणे ज्ञान मिळेल तुम्हांस ॥ ६६ ॥ वसिष्ठ, वामदेव, जमदग्नी । अत्री, पराशर, शांडिल्य मुनी । कर्ममार्ग गेले आचरुनी । गेले भवसागर तरुनी ॥ ६७ ॥ व्यास, नारद, कयाधुकुमार । शबरी, मारूती, अक्रूर । भक्तीमार्गात तत्पर । गेले तरून भवसागर ॥ ६८ ॥ मच्छींदर, गोरख, जालंदर । योगमार्गात तत्पर । जरी योगमार्ग कठिण फार । परी त्यानेच तरती भवसागर ॥ ६९ ॥ समर्थांना भक्त फार । काहिंना जवळ करणार । काहिंना दूर लोटणार । पूर्वसंचितानुसार घडणार ॥ ७० ॥ एके दिवशी साळूस । महाराज म्हणती तीस । तू न सोडावे मठास । रहावे स्वयंपाकास ॥ ७१ ॥ पटला विचार साळूबाईस । मानले जीने गुरूआज्ञेस । राहिली तेथे मठास । जेवू घाली सर्वांस ॥ ७२ ॥ जलंब गावच्या तुळशीरामास । आत्माराम पुत्र त्यास । ह्यास जावे लागले काशीस । वेदपठण करण्यास ॥ ७३ ॥ आत्माराम झाला वेद पारंगत । घरी आला परत । यावयाचा शेगावात । बसायचा समर्थ सान्निध्यात ॥ ७४ ॥ वेद म्हणून दाखवे समर्थांस । जेथे जेथे चूक म्हणण्यात । समर्थे आणावी निदर्शनास । आश्चर्य वाटले आत्मारामास ॥ ७५ ॥ चुका प्रसंगानुसार सुधरवायचे । हेच समर्थांचे चालायचे । भक्त वारंवार यायचे । आपली चूक जाणायचे ॥ ७६ ॥ भक्तांना जागे करण्यात । गुरू तत्पर असतात । तेच महाराज होते करत । हेच भक्त अनुभवत ॥ ७७ ॥ असाच प्रसंग एका भक्ताचा । बाळापुर तालुक्याचा । मोरगावच्या मारुतीपंताचा । जोंधळ्याचे शेत रक्षण्याचा ॥ ७८ ॥ मोरगावचा मारुतीपंत । होता शेतीवाडीयुक्त । धार्मिक प्रवृत्ती युक्त । होता सदा धर्मरत ॥ ७९ ॥ शेताची राखण करण्यास । ठेवले नोकरीस । तिमाजी नोकरास । स्वस्थता अनुभवण्यास ॥ ८० ॥ तिमाजी शेत रक्षीतसे । नोकरीत चोख असे । कधी फसवत नसे । इमाने इतबारे वागत असे ॥ ८१ ॥ नोकर कितीही कार्यदक्ष । चूक होण्यात रागाचे भक्ष्य । असाच प्रसंग तिमाजीस । होता त्याचे दुर्लक्ष ॥ ८२ ॥ शेताची राखण करत असता । बरीच रात्र उलटून जाता । डुलकीस झाला देता । विपरीत प्रसंग झाला भोगता ॥ ८३ ॥ पहाता पहाता डुलकी लागली । शेतात गाढवे घुसली । जोंधळ्याची रास खाऊ लागली । शेताची नासधूस झाली ॥ ८४ ॥ समर्थे अंतर्ज्ञाने जाणली । परी स्वस्थ न राहिली । ही गुरूमाऊली । तत्क्षणी तिथे आली ॥ ८५ ॥ तिमाजीस हाक मारती झाली । तिमाजीस म्हणाली गुरूमाऊली । “अरे! शेतात गाढवे शिरली” । तिमाजीस जाग आली ॥ ८६ ॥ आपली चूक लक्षात आली । ही डुलकी भारी पडली । क्षणभरात गोंधळ करती झाली । त्यास हळहळ वाटली ॥ ८७ ॥ झोपेने गोंधळ केला । आपला घात केला । करुणा भाकता झाला । म्हणे ह्यातून वाचवा मला ॥ ८८ ॥ नंतर तो जागाच राहिला । उजाडता मालकाकडे गेला । वृत्तांत सर्व सांगितला । मारूतीस फार राग आला ॥ ८९ ॥ वाटेल कोणत्या मालकाला । नुकसान व्हावे आपणाला । नुकसान नको मालकाला । मारूतीपंत त्याच विचारातला ॥ ९० ॥ परी होता गुरूसेवेत । उत्सुक दर्शन करण्यात । आधी सकाळी जाई मठात । मगच जाई शेतात ॥ ९१ ॥ हाच क्रम चालायचा । काटेकोर पाळायचा । बदल न व्हावयाचा । जरी प्रसंग नफातोट्याचा ॥ ९२ ॥ गुरूसेवा न फुकट जाणार । प्रसंग कितीही बिकट । जाणत होता मारूतीपंत । तेणे होता तैसा वागत ॥ ९३ ॥ जरी नुकसान झाले त्याला । तरी तो तिमाजीस म्हणाला । आधी जातो मठाला । मग येतो शेताला ॥ ९४ ॥ आधी गेला मठास । महाराजांचे दर्शनास । केला नमस्कार त्यांस । म्हणतो कृपा असावी आम्हांस ॥ ९५ ॥ महाराज वदती “मारुतीपंता! । झोपाळू नोकर ठेवता । गाढवे गोंधळ करता । आमची झोप मोडता” ॥ ९६ ॥ गुरूंना झालेला त्रास । सहन न झाला त्यास । तो वदे समर्थांस । नोकरीतुन काढतो नोकरास ॥ ९७ ॥ महाराज म्हणती त्यावर । अरे! तिमाजी इमानी नोकर । दुःख झाले अनावर । जणू प्रसंग स्वतःवर ॥ ९८ ॥ उजाडताच तो भेटला । तू त्यावर म्हणाला । “आधी जातो मठाला । मग येतो शेताला” ॥ ९९ ॥ वृत्तांत सारा पटला । मारुतीपंत थक्क झाला । समर्थांच्या अंतर्ज्ञानाला । मारुतीपंत अनुभवता झाला ॥ १०० ॥ प्रमाण मानले गुरू आज्ञेस । नोकरीत ठेवले तिमाजीस । गुरू रक्षिती भक्तांस । अनुभव आला दोघांस ॥ १०१ ॥ महाराजांचे असेच असायचे । कधी स्थिर नसायचे । वाटेल तेथे बसायचे । काळवेळ विसरायचे ॥ १०२ ॥ असेच एकदा हमरस्त्यावर । सुखलाल बन्सीलालच्या दुकानासमोर । नग्नावस्थेत रस्त्यावर । प्रसंग ओढवला समर्थांवर ॥ १०३ ॥ नारायण आसराजी हवालदार । त्याने पाहिला प्रकार । एक नंगा ढोंगी रस्त्यावर । जो तो करी त्यास नमस्कार ॥ १०४ ॥ हे न खपले त्याला । तो दरडावू लागला । महाराजांस हाकलवू लागला । त्यांना दंडे मारू लागला ॥ १०५ ॥ बोलण्याचा परिणाम होईना । महाराज जागचे हालत ना । अनेक प्रकारे समजावले त्यांना । परी हुं का चुं बोलेना ॥ १०६ ॥ पहाता पहाता गर्दी झाली । महाराजांना पाहू लागली । महाराजांची कीव आली । हवालदाराकडे पाहू लागली ॥ १०७ ॥ हवालदारे दरडावले । चालते व्हा येथून झाले । असे म्हणता दंडे उगारले । काहिंना झोडपले ॥ १०८ ॥ त्यातला एक पुढे आला । त्यास समजावू लागला । नका मारू सांगू लागला । त्यास बाजूस करू लागला ॥ १०९ ॥ परी जागे झाले शिपाईपण । म्हणे “आणखीन बडवीन । झोडपून काढीन । उगाच नंगा फिरतो गावातुन” ॥ ११० ॥ तेवढ्यात हुंडीवाल्या दुकानदारास । न पाहवले दृष्यास । त्याने आवरले शिपायास । दूर केले सर्व लोकांस ॥ १११ ॥ तो महाराजांजवळ गेला । त्यांचा हात धरला । म्हणे “चला माझ्या दुकानाला । पाणी देतो तुम्हाला” ॥ ११२ ॥ इकडे शिपायास समजावले । माफी मागण्यास सांगितले । शिपायाने नाकारले । हेच पुढच्यास कारण झाले ॥ ११३ ॥ महाराजांना मारल्यामुळे । काळाने त्याला घेरले । ईहलोकातुन उठवले । पुढे सारे घरच उध्वस्त झाले ॥ ११४ ॥ एका सत्पुरुषास । विनाकारण मारल्यास । कारण होते दुष्परीणामास । ऐसेच झाले हवालदारास ॥ ११५ ॥ महाराज समर्थ होते । लोकांस पटत होते । नतमस्तक होत होते । कृपाशिर्वाद घेत होते ॥ ११६ ॥ जो तो संधी सोडत नव्हता । आपापल्यापरीने येत होता । त्यांच्याजवळ मागत होता । लोटांगण घालत होता ॥ ११७ ॥ संगमनेर, नगर जिल्ह्यातले । भक्त यायचे तेथले । नाना हेतू मनातले । साध्य व्हायचे दर्शनामुळे ॥ ११८ ॥ हरी जाखडा तेथला । तोही ऐकता झाला । समर्थ एक शेगावला । तो ही दर्शना उत्सुक झाला ॥ ११९ ॥ हरी जाखडा भीक मागतसे । कधी उपासमार होत असे । जीवनाला कंटाळत असे । जीवाला चैन नसे ॥ १२० ॥ कुठच्या जीवास । आवडे त्रास व्हावेत आपणास । चिमटे बसावे पोटास । जो तो उत्सुक टाळण्या त्रास ॥ १२१ ॥ हरी जाखडाही त्यातला । आशाळभूत शेगावी आला । समर्थ चरणी पडला । ढसा ढसा रडु लागला ॥ १२२ ॥ त्यांचे चरण सोडेना । आशिर्वादावाचून निघेना । समर्थे जाणले त्याच्या मना । म्हणती पूर्ण होवोत मनोकामना ॥ १२३ ॥ समर्थ हरीस म्हणे । का रे झाले येथे येणे ? । हरी त्यावर म्हणे । आलो संसारसुखाकारणे ॥ १२४ ॥ उदर भरतो भीक मागून । कधी असतो उपाशी राहून । मी दरिद्री नारायण । सुंदर कन्या कोण करील अर्पण ? ॥ १२५ ॥ धन धान्य संपत्ती । स्त्रीसुख संतती । मागितले महाराजांप्रती । महाराज पूर्ण करोत ती ॥ १२६ ॥ महाराज थुंकले त्यावर । त्याच्या अज्ञानावर । त्यास आणण्या भानावर । समर्थ वदले त्यावर ॥ १२७ ॥ जो तो विनवितो सुटण्यासाठी । नच गुरफटण्यासाठी । तू आलास गुरफटण्यासाठी । सहाय्यभूत होवो जगत्‌जेठी ॥ १२८ ॥ महाराजांजवळ कुणी मागे भोग । कुणी सांगे बरा करा रोग । कुणी मागे विद्यायोग । जैसा ज्याचा योग ॥ १२९ ॥ निमोणकर होता त्यातला । योगविद्या मागता झाला । त्याचीच तळमळ असलेला । तेच प्रार्थिता झाला ॥ १३० ॥ रामचंद्र निमोणकर । होता ओव्हरसीयर । संगे वासुदेव बेंद्रे सर्व्हेयर । आले मुकना नदीवर ॥ १३१ ॥ सह्याद्री पर्वतात । मुकना नदी डोंगरात । नाशिक जिल्ह्यात । इगतपुरी तालुक्यात ॥ १३२ ॥ आले एका पर्वणीस । तीर्थस्नान करण्यास । गर्दी जमे नाल्यास । कपिलधारा प्रवाहास ॥ १३३ ॥ रामचंद्र निमोणकरास । येत होता योगाभ्यास । तो होण्या पूर्णत्वास । पुसे तेथल्या साधूस ॥ १३४ ॥ परी कुणी न दिसे योग्यतेचा । तेणे योग शिकण्याचा । विचार तसाच रहायचा । शेवटी हताश व्हायचा ॥ १३५ ॥ स्नान आटोपल्यावर । उठला निमोणकर । बसला काठावर । तो एक साधू दृष्टीगोचर ॥ १३६ ॥ पाहिले त्या साधूस । आजानुबाहूस । बसलेला समाधीस । पाहिले आशेच्या किरणास ॥ १३७ ॥ त्यांची समाधी काही उतरेना । उत्तर काही मिळेना । हेतू सफळ होईना । परी तेथून निघवेना ॥ १३८ ॥ असाच एक दिवस सरला । निमोणकर उपाशी राहिला । चित्ती ध्यास लागलेला । कैसे करावे योगाभ्यासाला ॥ १३९ ॥ साधू चतुर होता । परिक्षा घेत होता । तिष्ठत ठेवत होता । परत जातो का पहात होता ॥ १४० ॥ निमोणकर चिकाटीचा होता । तो कंटाळलेला नव्हता । तो गरजवंत होता । वाटेल ते करण्यास तयार होता ॥ १४१ ॥ सूर्य अस्तास गेला । साधू समाधीतून उतरला । निमोणकरास बघता झाला । त्याच्यावर पाणी शिंपडू लागला ॥ १४२ ॥ साधूचे पाय धरले । योगाभ्यासाचे विनवले । साधूने स्मितहास्य केले । निमोणकरास उभे केले ॥ १४३ ॥ साधू म्हणे त्यास । फार कठीण योगाभ्यास । जाऊ नको तू वाटेस । न जमणार तुला योगाभ्यास ॥ १४४ ॥ निमोणकराने हट्ट न सोडला । त्यांस पुन्हा विनवता झाला । साधूने त्यास तक्ता दिला । म्हणे पूर्ण करेल मनोरथाला ॥ १४५ ॥ तांबडा खडा प्रसाद दिला । निमोणकर तेथून निघाला । पुढे हाच साधू नाशिकला दिसला । मागील आठवणीस उजाळा दिला ॥ १४६ ॥ साधूस झाला बोलता । तुझे नाव गाव न सांगता । का रे झाला बेपत्ता ? । तूच दिलास ना तक्ता ? ॥ १४७ ॥ साधू म्हणाला निमोणकराला । तू मूर्खच राहिला । तांबडा खडा जो दिला । तो खूण पटवायला ॥ १४८ ॥ माझे नाव गजानन । आणखीन काय पटवू खूण ? । नको शंकेस स्थान । अभ्यास कर श्रद्धा ठेवून ॥ १४९ ॥ दोघे बरोबर निघाले । दोघे वाटेने चालू लागले । क्षणात गजानन गुप्त झाले । निमोणकर मनात गोंधळले ॥ १५० ॥ निमोणकर पुढे चालू लागला । धुमाळ सदनी पोहोचला । तो हाच साधू तेथे दिसला । आश्चर्य वाटले निमोणकराला ॥ १५१ ॥ धुमाळास वृत्तांत सांगितला । धुमाळ मनात समजला । मनोमन खूष झाला । तो निमोणकराला म्हणाला ॥ १५२ ॥ तो तांबडा गणपती । योगाभ्यास शिकवेल तुजप्रती । तो तक्ता नि गणपती । गजानन समज चित्ती ॥ १५३ ॥ असेच होते समर्थांचे भक्त । पूर्ण व्हायचे मनोरथ । तुकाराम कोकाटे त्यात । रहात होता शेगावात ॥ १५४ ॥ तुकारामाची संतती । जगू शकत नव्हती । करू लागला तो भक्ती । म्हणे नांदू दे घरी संतती ॥ १५५ ॥ अशीच भक्ती करू लागला । एक सुदिन उजाडला । समर्थांच्या चरणी लागला । संतती मागता झाला ॥ १५६ ॥ म्हणाला महाराजांस । संतती जगल्यास । थोरला पुत्र आपणास । अर्पण करीन तुम्हांस ॥ १५७ ॥ पुढे मुले झाली दोन तीन । आनंदात झाला तल्लीन । नवसाची न राहिली आठवण । प्रपंची गेला गुंतून ॥ १५८ ॥ प्रपंच मोहाने नवस विसरला । थोरला नारायण आजारी पडला । औषधोपचार सुरू झाला । परी आराम न पडला ॥ १५९ ॥ तो चिंताक्रांत झाला । त्याने भगवंत स्मरला । प्रार्थना केली त्याला । म्हणे आराम पडू दे प्रकृतीला ॥ १६० ॥ कालांतराने आठवले । नवसास केलेले । नवस विसरता दुखणे आले । असे मन सांगू लागले ॥ १६१ ॥ विनवू लागला समर्थांना । समर्थांस केली प्रार्थना । तुम्हीच वाचवा नारायणा । आराम पडूद्या दुखण्या ॥ १६२ ॥ तुकाराम म्हणे सद्गुरूराया । पुत्र नारायण वाचवा । हा पुत्र वाचलीया । येईन अर्पण कराया ॥ १६३ ॥ ऐसे वचनबद्ध होता । नाडी ठिकाणी झाली येता । डोळे उघडून झाला पहाता । पुत्र वाचला मरता मरता ॥ १६४ ॥ व्याधी बरी झाल्यावर । तुकाराम आला मठावर । म्हणे नारायणास वाहतो तव चरणांवर । करा नवसाचा स्विकार ॥ १६५ ॥ समर्थांच्या चरणी जैसा नारायण । तुकारामे केला अर्पण । नवसाचे भान ठेवून । झाला मुक्त नवसातून ॥ १६६ ॥ तैसे स्मरण गजाननास । झाले नवसाचे भान त्यास । देह अर्पण करावा विठ्ठलास । पूर्ण होता कार्यभागास ॥ १६७ ॥ जैसा नारायण आज्ञेत । गजाननाच्या शब्दात । तैसे गजानन आज्ञेत । विठ्ठलाच्या शब्दात ॥ १६८ ॥ आपला नवस फेडण्यास । जाणीव होऊ लागली गजाननास । म्हणे एके दिवशी हरीस । चला जाऊ पंढरपुरास ॥ १६९ ॥ विठ्ठलाच्या दर्शनास । नवस फेडण्यास । कृपाशिष घेण्यास । कृपाप्रसाद घेण्यास ॥ १७० ॥ पुढे शके अठराशे बत्तीस । साधारण नाम संवत्सरास । आषाढमासास । गेले पंढरपुरास ॥ १७१ ॥ महाराज विठ्ठलास वदले । नवस केलेले आठवले । कार्य माझे संपले । नवस फेडणे झाले ॥ १७२ ॥ ह्या वर्षीच्या ऋषीपंचमीस । फेडीन नवसास । स्विकारावे त्यास । लावावे पुढिल कार्यास ॥ १७३ ॥ समर्थां विरह जाणवला । कंठ दाटून आला । अश्रु गाली ओघळला । हरी पहातच राहिला ॥ १७४ ॥ महाराज वदती हरीस । नवस होता विठ्ठलास । तो आलो फेडण्यास । तो पूर्ण करण्यास ॥ १७५ ॥ हरी आता संगत थोडी राहिली । ऋषीपंचमी जवळ आली । जायची वेळ आली । विठ्ठलाची आज्ञा झाली ॥ १७६ ॥ ह्या वर्षीच्या ऋषीपंचमीस । अवतार कार्य संपवीन मी । राहीन तुमच्या अंतर्यामी । स्मरताच दिसेन मी ॥ १७७ ॥ हरी म्हणे महाराजांस । सोडू नका आम्हांस । तुमचाच आधार आम्हांस । निराधार करू नका पोरांस ॥ १७८ ॥ हरीस कळला अर्थ । म्हणे थोडे दिवस समर्थ । विठ्ठला करू नको अनर्थ । दीर्घायुषी होऊ दे समर्थ ॥ १७९ ॥ गोपाळबुटीच्या वाड्यातुन । महाराज आणले हिरावून । तेच प्रारब्ध भोग म्हणुन । न भोग सुटे भोगल्यावाचून ॥ १८० ॥ हरीच्या नयनी अश्रू आले । पुढचे चित्र दिसू लागले । प्रफुल्लित मन मावळले । निराशेचे सूर कानी आले ॥ १८१ ॥ दोघांनी घातल्या प्रदक्षिणा । घेऊ लागले विठ्ठल दर्शना । वेगळाच अनुभव आला । विषण्ण मन त्या क्षणा ॥ १८२ ॥ दोघे शेगावी परतले । गावकर्‍यांस सारे कळले । परी कुणी खरे न मानले । मायेने सर्वांना चकवले ॥ १८३ ॥ हरी म्हणे नाव पैलतीरी जाणार । पुन्हा न आपणा दिसणार । आठवणीच रहाणार । साकार निराकार होणार ॥ १८४ ॥ श्रावण महिना आला । देहभोग निमित्त झाला । तोच कारण बनला । पुढचा प्रसंग बोलका केला ॥ १८५ ॥ पुढे भाद्रपद आला । गणेश चतुर्थी दिवस आला । समर्थे बाळाभाऊचा हात धरला । आपल्या आसनावर बसवला ॥ १८६ ॥ विठ्ठलाचे होते सहाय्य । तोवरी होता देह । संपले आमचे कार्य । उद्यापासून तुझे कार्य ॥ १८७ ॥ शके अठराशे बत्तीस । साधारण नामे संवत्सरास । गुरूवारी ऋषीपंचमीस । सकाळी आठच्या सुमारास ॥ १८८ ॥ आठ सप्टेंबर एकोणीसशे दहास । संपवले अवतार कार्यास । रहाता विठ्ठलाच्या आज्ञेस । गेला पुढील कार्यास ॥ १८९ ॥ तोच समाधी दिवस ठरला । सगळ्यांना मागे ठेवता झाला । आपण आज्ञेने पुढे गेला । अनंतात विलीन झाला ॥ १९० ॥ वागला ऐशा कृतीस । दाखवले चमत्कृतीस । उपयोगी सर्वांस । त्यासाठीच अवतारास ॥ १९१ ॥ आधार ठरला सर्व भक्तांस । सर्वांना लावले मार्गास । कैसा विसरणार त्यास ? । विसरण्याने होईल र्‍हास ॥ १९२ ॥ महाराज देहाने गेले । हे सर्वांनाच कळले । पहाता पहाता सर्व जमले । अगदी मनापासून आलेले ॥ १९३ ॥ काही भक्तांच्या स्वप्नात गेले । पुढिल मुक्कामाचे वदले । भक्त शोकाकूल झाले । व्यथीत मने शेगावी आले ॥ १९४ ॥ झुंडीच्या झुंडी उमटल्या । अंत्यदर्शनास लोटल्या । जो तो शेगावी आला । सारा परीवार उदासीन झाला ॥ १९५ ॥ म्हणती समर्थ बोलके व्हावेत । योगलीलेचे चमत्कार व्हावेत । मनोरथ पूर्ण करावेत । कृपाशिष मिळावेत ॥ १९६ ॥ डोणगावच्या गोविंदशास्त्र्यांस । हा विचार न पटला त्यांस । ते म्हणाले भक्तगणांस । नका विनवू ऐसे त्यांस ॥ १९७ ॥ विनवता समर्थ उठतील । भक्तांस दर्शन देतील । निश्चित बोलके होतील । परी ईश्वरास न रुचेल ॥ १९८ ॥ ईश्वरास रुचेल तेच करावे । आपलेच म्हणणे खरे न करावे । समर्थांस न त्रास द्यावे । स्वस्थ त्यांस पडू द्यावे ॥ १९९ ॥ सारी भक्त मंडळी हळहळली । पालखीची तयारी केली । इकडे भजने चाललेली । नामगजराची सोबत झाली ॥ २०० ॥ प्रहर नि प्रहर स्वतःहून । गेले भजनात रंगून । मंत्रोच्चार नि गजर करून । महाराजमय होऊन ॥ २०१ ॥ साथ होती वेळेची । वाट न पहावी लागे तिची । गजानन गजानन म्हणायची । देहभान विसरायची ॥ २०२ ॥ स्त्रीया, मुले, वृद्ध । तेथे जमले भक्तवृंद । जो तो दर्शनास सिद्ध । हाच हेतु मनी शुद्ध ॥ २०३ ॥ पहाते झाले महाराजांस । पुन्हा न दिसणार आपणास । हाच हेतू त्यांच्या मनास । जेणे आले दर्शनास ॥ २०४ ॥ पालखी तयार झाली । फुलहारांनी सजवली । अंतीमविधीची सुरुवात झाली । मंत्रोच्चाराची सुरुवात झाली ॥ २०५ ॥ महाराजांस विधियुक्त स्नान । घातले सर्वांगावरून । अबीर गुलाल उधळून । वस्त्रालंकार सजवून ॥ २०६ ॥ महाराजांना पालखीत ठेवले । फुलहार अर्पण केले । भक्तांनी अखेरचे दर्शन घेतले । कोंडलेले अश्रू मोकळे झाले ॥ २०७ ॥ गावात पालखी फिरवली । अबालवृद्ध सारी जमली । “जय गजानन” न्हणू लागली । समर्थांना नमस्कार करू कागली ॥ २०८ ॥ सर्व भक्त पोरके झाले । सजीव निर्जीव हळहळले । वातावरण गदगदले । वेगळेच जाणवू लागले ॥ २०९ ॥ भजनाचा रंग वेगळा । अश्रुंची साथ मागता झाला । बोलका अबोल झाला । अबोल बोलका झाला ॥ २१० ॥ कुटाळांच्याही हातात । टाळ होते दिसत । झांजांच्या तालात । भजने होती गात ॥ २११ ॥ ब्राह्मणांचे मंत्रोच्चारण । त्यात समाधी प्रयोजन । सर्वांना अखेरचे दर्शन । एक वेगळेच वातावरण ॥ २१२ ॥ अबीर, बुक्का, गुलाल । उधळत होते वृद्ध अबाल । स्त्रीया, मुलेही सामील । कोण त्यांना सोडील ? ॥ २१३ ॥ वृत्तीत भाव होते कृतज्ञ । व्यक्त करत होते ते जन । कनवाळू कृपाळू गजानन । जगले स्वतःस विसरून ॥ २१४ ॥ रात्रभर पालखी फिरवली । मंत्रगजराने साथ दिली । दुसरे दिवशी सकाळी । पालखी मठात आली ॥ २१५ ॥ समाधीच्या जागेवर । समर्थांस ठेवले त्यावर । केला रुद्राभिषेक त्यावर । पूजा पंचोपचार ॥ २१६ ॥ पंचारती झाल्यावर । मीठ, अबीर, अर्गजा समाधीवर । भक्तांनी केला नामगजर । शिळा ठेवली त्यावर ॥ २१७ ॥ अनंताकडून तेज आलेले । अनंताकडे ते गेले । दहा दिवस समाराधना चालले । कित्येक भक्तांनी प्रसाद घेतले ॥ २१८ ॥ महाराज समाधीस्त झाले । भक्तगण हळहळले । नियतीपुढे काही न चाले । “जय गजानन, जय गजानन” म्हणू लागले ॥ २१९ ॥ भक्तांच्या अंतर्मनास । गजानन सांगे त्यांस । स्मरण करता आम्हांस । दर्शन देईल तुम्हांस ॥ २२० ॥ भक्तांसाठी अवतरणारा । भक्तांसाठीच जगणारा । भक्तांतच रमणार । सदा जागृत ठेवणारा ॥ २२१ ॥ समाधीनंतरही बोलणारा । सर्वांचे हित चिंतणारा । सदा सहाय्यभूत होणारा । संत गजानन समर्थ खरा ॥ २२२ ॥ गणामहाराज सांगे भक्तांस । नका विसरू मंत्रजपास । गजाननाचा मंत्र स्मरल्यास । गजानन दिसेल तुम्हांस ॥ २२३ ॥ सच्चिदानंद गजानन । सदा रक्षिती भक्तगण । जे करिती मंत्रपठण । त्यांचे संकट हरण ॥ २२४ ॥ ॥ शुभं भवतु ॥ ॥ श्री गणपती सरस्वतीर्पणमस्तु ॥ ॥ इति श्रीगुरूगजाननलीला ग्रंथस्य एकोनविंशोऽध्यायः संपूर्णः ॥

Aliquam sed mauris

Sed lorem ipsum dolor sit amet et nullam consequat feugiat consequat magna adipiscing tempus etiam dolore veroeros. eget dapibus mauris. Cras aliquet, nisl ut viverra sollicitudin, ligula erat egestas velit, vitae tincidunt odio.

Contact

Address
B2/201 Ashvamegh 3, Akota Munj Mahuda Rd. • Vadodara, GJ 390 020 • INDIA
Email
info@ganamaharaj.org