श्री गणेशाय नम: । हे सृष्टी निर्मात्या । तुझ्या कृतीस अंत न तत्वता । तेणे संबोधिले अनंता ॥ १ ॥ तू जी जी कृती करणार । ती कोण वर्णन करणार । ती अपूर्णच रहाणार । तो असमर्थच ठरणार ॥ २ ॥ तुझी कृती अनंत रहाणार । ती सदा बदलत रहाणार । मी काय वर्णन करणार ? । ते अज्ञानच ठरणार ॥ ३ ॥ तू जर सहाय्य करणार । तरच मी लेखणी उचलणार । सरस्वती जरी लिहविणार । परी तुझे सहाय्य असल्यावर ॥ ४ ॥ तू एक योगी निर्मिला । एक समर्थ निर्मिला । तो चमत्कृती करता झाला । स्वलीले भक्तां रक्षिता झाला ॥ ५ ॥ ही सर्व तुझीच लीला । समर्थांच्या ज्या लीला । त्या त्या सर्व तुझ्याच लीला । ऐसेच वाटते सरस्वतीला ॥ ६ ॥ वाटे तुझ्या लीलांना स्मरावे । तुझे गुणगान गावे । त्यातच सभोवतालचे विसरावे । जीवन सार्थक करावे ॥ ७ ॥ स्मरणाचे प्रकार अनेक । ग्रंथलेखन त्यातले एक । जे जे स्मरले कित्येक । त्यांचा संग्रह ग्रंथ एक ॥ ८ ॥ तूच नामाचे घास भरवले । तूच नामाचे महत्व ठसवले । तूच नामात रमवले । तूच नामाने तृप्त केले ॥ ९ ॥ जो रंगणार, एकरूप होणार । तोच लिहिणार, रंगवणार । चित्त एकरूप झाल्यावर । तो त्यात रंगून जाणार ॥ १० ॥ हे सरस्वतीने जाणले । तीने आसनावर बसवले । श्री गणपतीचे सहाय्य लाभले । तेणे ग्रंथलेखन आरंभिले ॥ ११ ॥ एका गुरूंची लीला वर्णिल्याने । गुरू गजाननाची लीला वर्णिल्याने । भक्त डोलतील आनंदाने । गाऊ लागतील आनंदाने ॥ १२ ॥ हे सर्व तुझेच आहे । माझे काय आहे ? । मी ही तुझाच आहे । सर्व तुझीच लीला आहे ॥ १३ ॥ मी खरोखरच अकर्ता । तूच कृतीचा कर्ता । हे जाणतो तत्वता । जेणे तुला झालो विनविता ॥ १४ ॥ गणामहाराज करे प्रार्थना । तू यावेस ह्या स्थाना । दावावे गजानन लीलांना । जे उपयुक्त ग्रंथलेखना ॥ १५ ॥ महाराज जरी समाधीस्त । परी वारंवार दर्शन देतात । भक्तांस सहाय्यभूत होतात । आपली खूण पटवतात ॥ १६ ॥ गणपत कोठाडे भाग्यवान थोर । करे सदा पुण्याचार । ब्राह्मणांस भोजन वारंवार । तेणे मना आनंद फार ॥ १७ ॥ असेच एके दिवशी । विजयादशमीच्या आदल्या दिवशी । आला मंदीरी दर्शनासी । समर्थे प्रेरणा दिली त्यासी ॥ १८ ॥ भरपूर दानधर्म करावा मठाला । गुरूआज्ञा अनुसरता झाला । हे न खपले पत्नीला । टाकून बोलली गणपताला ॥ १९ ॥ पत्नी म्हणे याने खाली होईल कोठार । आधार ठरेल निराधार । तिचे मन घेई माघार । वाटे पुढे करावा दानधर्म अपार ॥ २० ॥ मुकू अलंकार वस्त्राला । परी महाराज आले स्वप्नाला । जागे केले तिला । उपदेश केला तिला ॥ २१ ॥ वागू दे गणपतास । येईल त्याच्या मनास । तू त्याला अडविल्यास । मुकशील अलंकारास ॥ २२ ॥ चूक कळली पत्नीला । महाराजे लावले सन्मार्गाला । जीवनाचा खरा अर्थ कळला । दानधर्म केला दसर्‍याला ॥ २३ ॥ अशाच घरच्या कटकटींचा । अनुभव लक्ष्मण हरी जांजळाचा । काही निमित्त कामाचा । योग आला मुंबईचा ॥ २४ ॥ मुंबईस गेला असता । बोरीबंदरावर जाता । परमहंसास झाला पहाता । हर्षभरीत झाला चित्ता ॥ २५ ॥ अजानुबाहु उंच मुनीवर । दृष्टी स्थिर नासिकाग्रावर । हाती कमंडलू पासोडी अंगावर । शोभे त्यांच्या गळ्यात हार ॥ २६ ॥ बोलता झाला त्यास । तू अमरावतीस । केले पुण्यतीथीस । केले अमाप दानधर्मास ॥ २७ ॥ चारशे ब्राह्मण आले । यथेच्छ जेवू घातले । पेटकर, बापट मास्तर आले । बापटास स्वप्न पडले ॥ २८ ॥ गजानन सांगे बापटास । नको करू पुत्र शोकास । जावे जांजळाच्या घरास । पुण्यतिथीच्या उत्सवास ॥ २९ ॥ असे म्हणाले नि अदृष्य झाले । जांजळे इकडे तिकडे पाहिले । परी कुणी न त्यास दिसले । आश्चर्य त्यास वाटले ॥ ३० ॥ एकदा माधव मार्तंड जोशास । जावे लागले कामास । कळंब कसूरास । होता गुरूवारचा दिवस ॥ ३१ ॥ वाटे जावे दर्शनास । शेगावी मठास । म्हणाले नोकरास । जोड बैलगाडीस ॥ ३२ ॥ पावसाळ्याचे दिवस । नोकर म्हणे जोशास । ढगाळ वातावरण नभास । पूर येईल मन नदीस ॥ ३३ ॥ नोकराचे म्हणणे न पटले । जोशांनी जाण्याचे ठरवले । बैल गाडीस जुंपले । दोघे शेगावी निघाले ॥ ३४ ॥ अर्ध्या वाटेत पोहोचले । पावसाने थैमान केले । दर्शनास उत्सुकलेले । पुढेच जाऊ लागले ॥ ३५ ॥ पूर आला मन नदीला । जोशी समजले मनाला । ते म्हणाले नोकराला । तुझाच सल्ला खरा ठरला ॥ ३६ ॥ बैलगाडी पुढे जाईना । मागेही जाता येईना । काय करावे सुचेना । महाराजच आठवले त्या क्षणा ॥ ३७ ॥ माधव मार्तंड जोशी म्हणाले । “संतांनी सागरातून वाचवले । येथे तर नदीला पूर आले । तुझ्यावरच आता सोपवले ॥ ३८ ॥ गुरूमहाराज धावून यावे । आम्हांस रक्षावे । आमचे प्राण वाचवावे । आम्हां शेगावी न्यावे” ॥ ३९ ॥ ऐसी मनोमनी प्रार्थना । डोळे घट्ट मिटले तत्क्षणा । पुढचे प्रसंग पहावेना । महाराजांशिवाय काही दिसेना ॥ ४० ॥ ऐसे केले विनवणीस । धावावे लागले महाराजांस । रक्षावे लागले जोशांस । सुखरूप आले शेगावास ॥ ४१ ॥ जोशी वृत्तांत वदले । बाळाभाऊ समजले । समाधीचे दर्शन घेतले । कृपाशिष घेते झाले ॥ ४२ ॥ केले अभिषेक अन्नदान । घेतले पालखीचे दर्शन । प्रसन्न झाले मनोमन । निघाले कृतकृत्य होऊन ॥ ४३ ॥ महाराजांचे भक्त अपार । त्यांच्या कृपादृष्टीचा आधार । हाच ठरे जीवनी आधार । कुणी न होई निराधार ॥ ४४ ॥ असाच एक भक्त यादव गणेश सुभेदार । हिंगणीस घरदार । करे कापसाचा व्यापार । समर्थांवर श्रद्धा अपार ॥ ४५ ॥ आला एकदा वर्ध्याला । विनायक आसिरकरांच्या घराला । गाड्या बरोबर आणल्या । कापसाच्या व्यापाराला ॥ ४६ ॥ होते दोघे ओसरीवर । एक भिकारी आला त्यावर । भिकारी येत असती वरचेवर । भीक मागून भरती उदर ॥ ४७ ॥ परी हा भिकारी वेगळा । कंप सुटलेला तनूला । बनातीची टोपी घातलेला । हातात काठी असलेला ॥ ४८ ॥ बोलता झाला यादवाला । रुपये मागता झाला । सत्वर द्यावे तू मजला । आलो येथे भीक मागायला ॥ ४९ ॥ परी तो संतुष्ट होईना । तेथून काही जाईना । कसा घालवावा कळेना । यादवास काही सुचेना ॥ ५० ॥ गेला विनायक इतुक्यात । कामानिमित्ते घरात । भिकारी म्हणे तेवढ्यात । दहा हजार रुपये तोटा व्यापारात ॥ ५१ ॥ हात फिरवतो तुझ्यावरी । दुखणे जाईल सत्वरी । आवाज होता समर्थांपरी । जणू उभी समर्थ स्वारी ॥ ५२ ॥ परी यादव होता हुशार । बोलता झाला त्यावर । आज फायदा झाल्यावर । तुला महाराज म्हणणार ॥ ५३ ॥ भिकारी अदृष्य झाला । यादव त्याच विचारात गुंतला । इकडे व्यापार सुरू झाला । पहाता पहाता नफा झाला ॥ ५४ ॥ खूण पटली यादवास । व्यापारात फायदा झाला त्यास । आराम पडला दुखण्यास । दर्शन दिले यादवास ॥ ५५ ॥ अशीच कथा भाऊ कवराची । तेल्हारी बदली झाली भाऊची । ओढ चित्ती शेगावची । ओढ चित्ती दर्शनाची ॥ ५६ ॥ वाटे आधी करावे दर्शन । तेल्हारी जावे तेथून । बैलगाडीस जुंपून । निघाला तो मुक्कामाहून ॥ ५७ ॥ संध्याकाळी दर्शना गेला । दर्शन करून निघता झाला । बाळाभाऊ त्यास म्हणाला । जाऊ नये व्यतीपाताला ॥ ५८ ॥ येथे उद्या यावे प्रसादास । मग जावे तेल्हार्‍यास । सुटका नव्हती भाऊस । गेल्यावाचून तेल्हार्‍यास ॥ ५९ ॥ निरोप घेऊन स्वारी निघाली । तेल्हार्‍याची वाट धरली । गाडी पुढे चालतच राहिली । परी शेगावची वाट न सोडली ॥ ६० ॥ बैल थांबले तलावावर । गाडीवान आला भानावर । म्हणे रस्ता चुकलो सरकार । गाडी पुढे न जाणार ॥ ६१ ॥ राग आला भाऊस । बोलू लागला गाडीवाल्यास । स्मरले त्याने महाराजांस । ऐकले घुंगराच्या आवाजास ॥ ६२ ॥ भाऊ म्हणे गाडीवानास । “ऐक आवाजाच्या रोखास । तसेच जाऊदे गाडीस । तेल्हार्‍याच्या वाटेस” ॥ ६३ ॥ पुढे पहातो तो वाट शेगावची । चमत्कृती कळली महाराजांची । डोळ्यासमोर स्वारी बाळाभाऊची । खूण पटली अधिकाराची ॥ ६४ ॥ भाऊ मठात परतला । त्या दिवशी प्रसाद घेता झाला । नंतर गेला तेल्हार्‍याला । असा व्यतीपात योग टळला ॥ ६५ ॥ ऐसे रक्षिले भाऊ कवरास । असेच रक्षिले दिनकरास । थोडे वेगळे प्रकारास । परी महत्व रक्षणास ॥ ६६ ॥ शेगावी रतनसा एक भक्त । दिनकर त्याचा सुपुत्र । झाला एकदा व्याधियुक्त । सोबणी रोग त्याप्रत ॥ ६७ ॥ अन्नपाणी जाईना । औषध लागू पडेना । जरी इलाज केले नाना । परी उपयोग होईना ॥ ६८ ॥ रतनसा कंटाळला दुखण्याला । आराम न वाटे दिनकराला । अंगात त्राण न उरला । नवस करता झाला ॥ ६९ ॥ बरे वाटू दे दिनकराला । शेरणी देईन तुला । पाव आता नवसाला । रक्षावे आता भक्ताला ॥ ७० ॥ विपरित घडता डोके फोडीन । वर्‍हाडात नाचक्की करीन । नको येऊ दे ऐसा क्षण । करावे भक्त रक्षण ॥ ७१ ॥ असेच एकदा चंद्रभागेला । रामचंद्राच्या कन्येला । टेकली असता बाळंतपणाला । दुखणे झाले तिला ॥ ७२ ॥ लाडेगावाहुन आणली तिला । माहेरी बाळंतपणाला । दाखवले डॉक्टर वैद्याला । निदान न झाले कुणाला ॥ ७३ ॥ रामचंद्र तिचा पिता । महाराजांचा भक्त होता । जरी औषध झाला करता । परी गुण येत नव्हता ॥ ७४ ॥ कंटाळला औषधास । म्हणाला महाराजांस । तीर्थ अंगारा देतो चंद्रभागेस । आराम पडूद्या दुखण्यास ॥ ७५ ॥ औषधोपचार बंद केले । तीर्थ अंगार्‍यावर ठेवले । बरेच दिवस असे गेले । हळुहळु दुखणे कमी झाले ॥ ७६ ॥ श्रद्धा आली फळास । आराम पडला कन्येस । चंद्रभागा गेली दर्शनास । म्हणे “स्वामी तुम्हीच आता सहाय्यास” ॥ ७७ ॥ असेच एकदा जानकाबाईस । रामचंद्राच्या पत्नीस । वात विकाराचे दुखणे तीस । काही सुचेना तीस ॥ ७८ ॥ नाना ते बोलावे । वाटेलते चाळे करावे । डोके फिरल्यास्तव वागावे । भ्रमिष्टासारखे वागावे ॥ ७९ ॥ कधी जेवू नये । उपाशीच रहावे । वाटेल ते खावे । कधी उपाशीच झोपावे ॥ ८० ॥ कुणी म्हणे भूतबाधा । कुणी म्हणे करणी बाधा । कुणी म्हणे अंगरोग बाधा । कुणी मानसिक रोग बाधा ॥ ८१ ॥ औषधोपचार झाले । डॉक्टर वैद्य झाले । मांत्रिक तांत्रिक झाले । गंडे दोरे ताईत झाले ॥ ८२ ॥ औषधे उपयोगी पडेना । दुखण्यास आराम पडेना । स्वस्थ झोप येईना । रामचंद्रास काही सुचेना ॥ ८३ ॥ जीवनास कंटाळला । जात होता दर्शनाला । एक दिवस आळवून म्हणाला । आता शेवटच्या नवसाला ॥ ८४ ॥ प्रदक्षिणा घालीन मंदिरास । आराम पडुद्या दुखण्यास । कंटाळलो आता औषधोपचारास । मांत्रिकाच्या इलाजास ॥ ८५ ॥ त्याने सांगितले पत्नीस । पत्नीने प्रदक्षिणा घातल्या मंदिरास । आराम पडला दुखण्यास । श्रद्धा आली फळास ॥ ८६ ॥ महाराज समाधिस्त झाल्यावर । बाळाभाऊ आले गादीवर । वागती गुरूआज्ञेनुसार । ठरले भक्तांस आधार ॥ ८७ ॥ सेवा करीत होते मठाची । सोबत होती समर्थकृपेची । बरोबर तीर्थ अंगार्‍याची । फळे मिळाली श्रद्धेची ॥ ८८ ॥ आधार ठरले भक्तांस । मार्गदर्शक झाले त्यांस । वैशाख शुद्ध षष्ठीस । ते गेले वैकुंठास ॥ ८९ ॥ नांदुर्‍याच्या नारायणास । समर्थे स्वप्नी सांगितले त्यास । जावे तू शेगावास । नारायणे प्रमाण मानले त्यास ॥ ९० ॥ नारायण गेले शेगावास । चालवले अधिकारास । काही काळाने चैत्र शुद्ध षष्ठीस । ते गेले वैकुंठास ॥ ९१ ॥ एकदा मंदीराच्या दुरुस्ती कामात । मजूर होते त्याच्या कामात । अगदी मग्न होते त्यात । कळसाच्या शिखरात ॥ ९२ ॥ तीस फूट उंचावर । दगड झेलित होते वरचेवर । गर्क होते दगड देण्यात । एकमेकांच्या हातात ॥ ९३ ॥ त्यात एकाचा तोल गेला । क्षणभरात खाली पडला । न आपटता झेलला गेला । प्राण त्याचा वाचला ॥ ९४ ॥ सहज तो खाली उतरला । म्हणे कुणी उचलले मला ? । क्षणभरात गोंधळला । लोक बघते झाले त्याला ॥ ९५ ॥ ज्याने त्यास रक्षिले । “महाराजच” सर्व म्हणाले । गवंड्याचे प्राण रक्षिले । भक्तास पुनर्जीवन मिळाले ॥ ९६ ॥ अशीच महाराजांची भक्तीण । जयपूरात सासुरवाशीण । करावे तिने गुरूंचे स्मरण । वेळोवेळी व्हावे रक्षण ॥ ९७ ॥ भूतपिशाच्च पीडा झाली तीस । विचित्र वागावे हरघडीस । वाटेल ते मागावे खावयास । वाटेल त्या समयास ॥ ९८ ॥ झोप काही येईना । चैन काही पडेना । अपशब्द बोले नाना । औषधोपचार लागू पडेना ॥ ९९ ॥ महाराजे तिला दिली प्रेरणा । म्हणती शेगावी जावे दर्शना । आराम पडेल दुखण्या । विसरशील यातना ॥ १०० ॥ प्रमाण मानली गुरूआज्ञा । घेतले आपल्या दोन मुलांना । आली शेगावी दर्शना । दुखण्यातून ती सुटण्या ॥ १०१ ॥ रामनवमीचे दिवस होते । उत्सवाचे दिवस होते । मंदिराचे बांधकाम चालू होते । आधारास खांब उभे होते ॥ १०२ ॥ उभी होती दगडी खांबाजवळी । खांब सरकला त्यावेळी । तत्क्षणी ती खाली पडली । वाटले कपाळमोक्ष झाली ॥ १०३ ॥ लोकांना वाटले । बाईचे वाईट झाले । खांबास उचलले । बाजूस केले ॥ १०४ ॥ सर्वजण तिला पहाते झाले । डॉक्टरांना बोलावले । डॉक्टरांनी तपासले । दुखापतीचे निशाण न दिसले ॥ १०५ ॥ सर्वांना आश्वर्य वाटले । महाराजे तिला रक्षिले । भूत पिशाच्च दूर पळाले । त्यासाठीच खांबाचे पडणे झाले ॥ १०६ ॥ रामचंद्र पाटिल निःसीम भक्त । श्रद्धेने होता वागत । दररोज जाई मठात । समाधीचे दर्शन घेत ॥ १०७ ॥ महाराजांना आळवत । महाराजांशी बोलत । दुखले खुपले सांगत । त्यांची आज्ञा पाळत ॥ १०८ ॥ एक दिवस उजाडला । दारात साधू आला । रामचंद्रास पाहू लागला । त्यास न्याहाळू लागला ॥ १०९ ॥ आश्चर्य वाटले रामचंद्रास । निरखुन पाहिले साधूस । महाराजांचाच भास । महाराजच वाटे त्यास ॥ ११० ॥ त्यांना पाटावर बसवले । आदरातिथ्य केले । पाच रुपये दक्षिणा दिले । काय आज्ञा ? ते विचारले ॥ १११ ॥ महाराज म्हणती त्यास । काय देतो दक्षिणेस ? । पहावे मठाच्या कारभारास । सेवा हीच दक्षिणा आम्हास ॥ ११२ ॥ देतो ताईत तुझ्या मुलास । चेटुक करणी न बाधेल त्यास । आराम पडेल दुखण्यास । शांती लाभेल मनास ॥ ११३ ॥ महाराजे केले उपदेश । पाळावे गुरू आदेश । आचरू नये दंभाचारास । तैसेच मत्सर द्वेषास ॥ ११४ ॥ साधू भोंदू ओळखावा । उगाच वेळ न दवडावा । साधूस विन्मुख न पाठवावा । दानधर्म करावा ॥ ११५ ॥ लोभास ओळखावा । लोभ न आचरावा । मनी हेतू शुद्ध ठेवावा । तैसाच वर्ताव करावा ॥ ११६ ॥ गुरूनिष्ठेत रहावे । गुरूआज्ञेत रहावे । राजाविरुद्ध जाऊ नये । दुसर्‍या कुणाचे हिरावू नये ॥ ११७ ॥ शुद्ध असावे अंतःकरण । तैसेच कृतीत आचरण । मुखी असू दे नामस्मरण । तेच करेल रक्षण ॥ ११८ ॥ अतीक्रोध करे घात । दया असावी अंतरंगात । शब्द जपावे बोलण्यात । दक्ष असावे कर्तव्यात ॥ ११९ ॥ असे सांगता झाला । गोसावी घराबाहेर पडला । रामचंद्र त्यास पाहू लागला । परी तो कोठे न दिसला ॥ १२० ॥ ऐसे झाले रामचंद्रास दर्शन । असेच होवो तुम्हा दर्शन । दर्शनाने आनंदेल मन । आनंदातच शांती समाधान ॥ १२१ ॥ भव्य दिव्य मंदीरास । वर्गणी जमवली त्यास । अनेकांचे सहाय्य लाभले त्यास । मंदिर गेले पूर्णत्वास ॥ १२२ ॥ किसनलाले केला शतचंडीयज्ञ । बोलावले त्यास ब्राह्मण । भरपूर केले अन्नदान । पूर्ण झाले अनुष्ठान ॥ १२३ ॥ हे अनुष्ठान अत्यंत अवघड । चूक होता जाते तड । पूर्ण करण्यास गुरूकृपा जोड । तेणेच पूर्णत्वाची जोड ॥ १२४ ॥ आग्रवाल बंकटलालास । किसनलालच्या वडिलांस । आले दुखणे ह्याच समयास । दुखणे गेले विकोपास ॥ १२५ ॥ जणू काळाने बोलावले । सर्वजण घाबरले । महाराजांस स्मरले । यज्ञ पूर्ण करण्यास सांगितले ॥ १२६ ॥ यज्ञ पूर्णत्वास गेला । बंकटलाल बरा झाला । गुरूकृपेचा प्रभाव झाला । सर्वांचा भार हलका झाला ॥ १२७ ॥ जैसे महाराज दर्शन देती दुसर्‍यांस । तैसेच मिळो आपणांस । हीच ईच्छा गणामहाराजास । येथेच विसावा अध्याय जातो पूर्णत्वास ॥ १२८ ॥ ॥ शुभं भवतु ॥ ॥ श्री गणपती सरस्वतीर्पणमस्तु ॥ ॥ इति श्रीगुरूगजाननलीला ग्रंथस्य विंशोऽध्यायः संपूर्णः ॥

Aliquam sed mauris

Sed lorem ipsum dolor sit amet et nullam consequat feugiat consequat magna adipiscing tempus etiam dolore veroeros. eget dapibus mauris. Cras aliquet, nisl ut viverra sollicitudin, ligula erat egestas velit, vitae tincidunt odio.

Contact

Address
B2/201 Ashvamegh 3, Akota Munj Mahuda Rd. • Vadodara, GJ 390 020 • INDIA
Email
info@ganamaharaj.org