श्री गणेशाय नम: । हे विधात्या परमेश्वरा । तुझा वास चराचरा । माझ्यावर कृपावर्षाव करा ॥ १ ॥ यावे तू माझ्या स्थाना । सहाय्य व्हावे ग्रंथलेखना । सहाय्य हो तू पूर्ण करण्या । पूर्णत्वातच शांती मना ॥ २ ॥ गुरू मंदिर झाले । कळस बाकी राहिले । मुख्यच बाकी राहिले । ते पूर्ण करण्या पुन्हा विनविले ॥ ३ ॥ जैसे गुरूलीला मंदिर सुंदर । तैसाच कळस होवो सुंदर । कळसावीण मंदीर । कैसे शोभून दिसणार ? ॥ ४ ॥ इतुके केलेस सहाय्य । आता थोडक्यासाठी आर्जव । पुन्हा पुन्हा हा विनवे जीव । येऊ दे तुला कीव ॥ ५ ॥ ठेवू नकोस तू अर्धवट । जेणे ठरेन मी अर्धवट । ऐसा नको प्रसंग बिकट । पूर्ण करावे अर्धवट ॥ ६ ॥ एकवेळ परवडेल अज्ञानी । परी न परवडणार अर्धवट ज्ञानी । लाथाडतील मजलागुनी । निंदा नालस्ती करुनी ॥ ७ ॥ अर्धवटास जगणे भारी । जो तो निर्भत्सना करी । होईन भार भुमीवरी । त्यापेक्षा मरण यावे सत्वरी ॥ ८ ॥ कोण मज पत्करेल ? । तुलाच उद्धरावे लागेल । ग्रंथ पूर्ण करावा लागेल । अर्धवट टाकून कैसे चालेल ? ॥ ९ ॥ पूर्ण होण्यातच तुझी वाहवा । जेणे सहाय्यभूत व्हावा । पुन्हा पुन्हा विचार करावा । मला जवळ करावा ॥ १० ॥ सर्वजण तिष्ठत बसले । ग्रंथपूर्तीत उत्सुकलेले । सभोवतालीच बसले । पूर्तीची वाट पाहू लागले ॥ ११ ॥ नुसते नको आश्वासन । लाभू दे तुझे चरण । वाट पहाती भक्तगण । होऊ दे मनोरथ पूर्ण ॥ १२ ॥ ऐसा करावा कळस । जे स्मरतील तास नि तास । तेणे गुरूसहवास । तूच पात्र ठरशील स्तुतीस ॥ १३ ॥ एकोणिसाव्या पर्यंत । हयातीच्या लीला येतात । विसाव्या अध्यायात । हयातीनंतरच्या येतात ॥ १४ ॥ एकविसाव्या अध्यायात । सर्वांचे सार त्यात । लक्ष गुंतू दे लेखनात । जेणे पदरचे न येईल त्यात ॥ १५ ॥ ज्याला वाटे भेटावा भगवंत । त्याने आधी आळवावा संत । संत भेटतो कशात ? । हे ही सांगतो भगवंत ॥ १६ ॥ नाम ज्याच्या मुखात । संत त्याच्या दारात । भगवंत त्याच्या दारात । तेणे नाम असावे मुखात ॥ १७ ॥ संतांस आवडे नाम सहवास । नामातच घालवती अगणित तास । तेच तारतात भक्तास । लावतात सन्मार्गास ॥ १८ ॥ असेच होते संत गजानन । मुखी त्यांच्या नामस्मरण । तारतात भक्तगण । जे त्यांचे राहती होऊन ॥ १९ ॥ नामजप इतुका करावा । जेणे गुरू गजानन तोषावा । त्यानेच जवळ करावा । सहाय्यभूत व्हावा ॥ २० ॥ चिंतन करावे नामाचे । नच नुसत्या वैभवाचे । होऊन रहावे नामाचे । जेणे व्हाल गजाननाचे ॥ २१ ॥ नामजप आत्मा समजा । वैभवास देह समजा । नाम शाश्वत समजा । देह अशाश्वत समजा ॥ २२ ॥ आत्म्यास महत्व फार । आत्माच राहे अमर । देह हा नश्वर । हेच ठसवा मनावर ॥ २३ ॥ ऐसे प्रयत्न करावे । गुरूकृपेस पात्र ठरावे । गण गण गणात बोते जपावे । तेणे गुरू दर्शन व्हावे ॥ २४ ॥ गुरूलीलेस स्मरावे । तेच आधार मानावे । नामजप ऐसे करावे । प्रारब्ध सुसह्य व्हावे ॥ २५ ॥ समर्थ गजाननाच्या अनेक लीला । वाचण्यात आनंद मनाला । अजूनही चमत्कृती लीला । येतात अनुभवाला ॥ २६ ॥ महाराज प्रकटले शेगावास । माघ वद्य सप्तमीस । ऐन दुपारच्या समयास । पातुरकराच्या घरास ॥ २७ ॥ पातुरकराच्या घरात । होती सुनेची ऋतुशांत । वाटे सुसंतती नांदावी घरात । सुसंस्कार टिकावे घरात ॥ २८ ॥ कर्मफळे अवलंबती कर्मांवर । सत्वृत्तीची सत्फळे मिळणार । सुसंस्कारी सत्शील पातुरकर । जेणे दारी प्रकटला योगेश्वर ॥ २९ ॥ पत्रावळीची शीते । वेचून खाण्यात मग्न होते । अन्न परब्रह्म पटवत होते । त्यांच्या कृतीत दिसत होते ॥ ३० ॥ बंकटे दामोदरे ओळखले त्यास । वाळ्याचे पाणी देता पिण्यास । गेला हाळाचे पाणी पिण्यास । गढुळ निर्मळ सारखे त्यास ॥ ३१ ॥ नाल्यात तुंब्या भरला । पितांबरास चमत्कार दावला । गोविंदबुवाच्या कीर्तनाला । उत्तरार्ध वदला ॥ ३२ ॥ गोविंदबुवे जाणले अधिकाराला । समर्थांस उच्चासन देता झाला । बळी न पडले आग्रहाला । उपदेश केला गोविंदबुवाला ॥ ३३ ॥ अती आग्रह फार वाईट । पटवते झाले समर्थ । पटवते झाले एकेक कृतीत । ह्या कथा द्वितीय अध्यायात ॥ ३४ ॥ काशीच्या गोसाव्याने नवस केला । समर्थांस गांजा देता झाला । समर्थे स्विकार केला । न दुखविले गोसाव्याला ॥ ३५ ॥ जानराव देशमुखाला । गंडांतराचा योग आला । तीर्थ अंगारा उपयुक्त ठरला । टाळले गंडांतराला ॥ ३६ ॥ विठोबा घाटोळ ढोंगी भक्त । त्याच्या वशिल्यास झिडकारतात । त्याला झोडपून काढतात । ह्या कथा तृतीयाध्यात ॥ ३७ ॥ ठिणगीवाचून चिलिमीस पेटवले । पंचमहाभूतातील तत्व निर्मिले । चंदू मुकिनाच्या घरचे कानवले । अंतर्ज्ञाने ओळखले ॥ ३८ ॥ योग्य कर्म योग्य वेळेस । माधवास उपदेश । आले ब्राह्मण वसंतपूजेस । ह्या कथा चवथ्या अध्यायास ॥ ३९ ॥ पिंपळगावात महाराज गेले । योगी पुरूष पटवले । कोरड्या विहिरीत जल उत्पन्न केले । पाचव्या अध्यायी आले ॥ ४० ॥ जशास तसे न वागावे । हेच मनावर ठसवावे । गांधिलमाशांनी समर्थांस चावावे । समर्थे निमूटपणे सहन करावे ॥ ४१ ॥ नरसिंगास भेटले । मनोमन खूष झाले । व्रजभूषणा तपोबल पटवले । सहाव्या अध्यायी आले ॥ ४२ ॥ हरी पाटलाशी कुस्ती खेळले । योग सामर्थ्याचे बळ पटवले । पाटिलांनी ऊसांनी बडवले । तरी पाठीवर एकही वळ न उठले ॥ ४३ ॥ पाटिलांस ऊसाचा रस देते झाले । विशाल अंतःकरण दावले । गुरूकृपेने खंडूस पुत्ररत्न झाले । प्रसंग सातव्या अध्यायी आले ॥ ४४ ॥ गुरूकृपे संकटमुक्त । खंडू पाटिल बेडीमुक्त । महाराज वेद पारंगत । तेलंगी ब्राह्मण आश्चर्यचकित ॥ ४५ ॥ आधी करावे मग सांगावे । उगाच कीर्तन तमाशा नसावे । वाटे ब्रह्मगिरीने जागे व्हावे । विपरित प्रसंग न भोगावे ॥ ४६ ॥ ठिणगी पडली पलंगावर । पलंग पेटला सत्वर । महाराज तसेच पलंगावर । आठव्या अध्यायात कथासार ॥ ४७ ॥ द्वाड घोडे शांत केले । चौखुरात झोपले । गोविंदबुवास जागृत केले । नामजपाचे महत्व पटवले ॥ ४८ ॥ “तो” “मी” नसे वेगळा । बाळकृष्णास उपदेश केला । रामदासरूपात योगी प्रकटला । कथा नवव्या अध्यायाला ॥ ४९ ॥ गणेश अप्पांची पूजा स्विकारतात । अंतर्ज्ञानाची खूण पटवतात । स्पर्धा नसावी भक्तीत । होते त्यात विपरीत ॥ ५० ॥ गायीचे आडदांडपणे । शांत केले योगलीलेने । लक्ष्मणाचे पोटदुखणे । बरे केले उष्ट्या आंब्याने ॥ ५१ ॥ नको आचरू दांभिकपणास । पटवले लक्ष्मणास । तेणेच दारिद्र्य योग त्यास । कथा दहाव्या अध्यायास ॥ ५२ ॥ पूर्वसंचितानुसार । दिला भास्करास मार । कावळ्यांस शिकवला वेदसार । नको द्वेष मत्सर आचार ॥ ५३ ॥ गणू जवर्‍यास वाचवले । सुरुंगातून बाहेर काढले । त्याचे गंडांतर टाळले । प्रसंग अकराव्या अध्यायी आले ॥ ५४ ॥ ज्याला जे दिल्यास । संतोष होतो त्यास । झिडकारले अलंकारास । पटवले बच्चूलालास ॥ ५५ ॥ वठलेल्या आंब्यास पालवी फुटली । गुरूकृपेची खूण पटवली । करारापेक्षा जास्त जागा घेतली । सरकारी दंडाची माफी झाली ॥ ५६ ॥ दंडाची रक्कम परत मिळाली । चमत्कृतीची खूण पटवली । पितांबरास गुरूकृपा झाली । बाराव्या अध्यायी वर्णिली ॥ ५७ ॥ गुरूकृपा योग गंगाभारतीला । बरे केले महारोगाला । पर्जन्याचा गोंधळ टाळला । झ्यामसिंगाचा भंडारा निर्विघ्न झाला ॥ ५८ ॥ प्लेगची गाठ पुंडलीकास । मुक्त केले दुखण्यास । बरे करतात रोगास । कथा तेराव्यास ॥ ५९ ॥ बंडूतात्यास कर्ज झाले । सावकारी व्याज सुरू झाले । होते नव्हते ते सर्व गेले । पुन्हा त्यास पूर्वव्रत केले ॥ ६० ॥ ओंकारेश्वरी दर्शनास । घडले विपरीत प्रसंगास । प्रत्यक्ष नर्मदा आली दर्शनास । तीने रक्षिले सर्वांस ॥ ६१ ॥ जेवून गेले माधवनाथ । विडा येथेच विसरतात । वानवळ्यास पटवतात । कथा चवदाव्यात ॥ ६२ ॥ कृपाशिर्वाद लोकमान्यांस । अमर झाले गीतारहस्य । प्रारब्ध भोग न सुटला कुणास । सुचवले कोल्हटकरास ॥ ६३ ॥ श्रीधर काळे गोविंदास । केला उपदेश त्यास । नको जाऊ विलायतेस । कथा पंधराव्यास ॥ ६४ ॥ दिल्या पादुका पुंडलीकास । खरा गुरू दावला त्यास । थांबले तिसर्‍या प्रहरास । भाऊ कवराच्या प्रसादास ॥ ६५ ॥ तुक्याच्या कानात छरा गेला । मठ झाडल्याने बरा झाला । गुरूसेवेचा महिमा पटवला । कथा सोळाव्या अध्यायाला ॥ ६६ ॥ फिर्याद झाली नागवेपणावर । जिंकली योगसामर्थ्यावर । निकाल देतात जठार । भास्कर ठरला गुन्हेगार ॥ ६७ ॥ आडदांडपणा करू नये । लोकांना छळू नये । भूमीवर भार होऊ नये । महताबशास पटवे ॥ ६८ ॥ बापूरावाच्या पत्नीस । भानामतीची पीडा तीस । अंगार्‍याने बरे केले तीस । गुरूकृपा योग तीस ॥ ६९ ॥ महाराज गेले अकोटास । भेटले नरसिंगास । झरे उत्पन्न विहिरीस । कथा सतराव्यास ॥ ७० ॥ बायजेची अब्रूरक्षण । बापुन्यास विठ्ठल दर्शन । तीर्थ अंगारा भाऊस देऊन । फोड दिला बरा करून ॥ ७१ ॥ कुत्रे मेलेले रस्त्यात । पदस्पर्शाने जिवंत करतात । थोर प्रभाव स्पर्शात । ह्या कथा अठराव्यात ॥ ७२ ॥ भविष्य कथिले काशिनाथास । सांगितले बदलीच्या वृत्तास । कृपाशिर्वाद गोपाळबुटीस । पुत्ररत्न झाले त्यास ॥ ७३ ॥ आधीच ओळखतात । बाळाभाऊस सांगतात । येतात धारचे रंगनाथ । माणगावचे वासुदेवानंद येतात ॥ ७४ ॥ ज्ञान प्राप्तीचे तीन मार्ग । भक्ती, कर्म नि योग । त्यात सोपा भक्तीमार्ग । योग, कर्म कठीण मार्ग ॥ ७५ ॥ सांगितले साळूबाईस । रहावे मठात स्वयंपाकास । वेदज्ञान महाराजांस । पटवले आत्मारामास ॥ ७६ ॥ तिमाजीस जागे केले । गाढवांपासून शेत रक्षिले । हवालदाराने महाराजांस बडवले । हवालदारास मरण आले ॥ ७७ ॥ संसारसुख हरी जाखड्यास । योगविद्या निमोणकरास । हेतु जाणुनी भक्तमनास । कृपाशिषे पूर्णत्वास ॥ ७८ ॥ विसरू नये केलेला नवस । सांगितले तुकाराम कोकाटेस । स्वयेच जाणला समाधी दिवस । सांगितला हरी पाटिलास ॥ ७९ ॥ बाळाभाऊस गादीवर बसवतात । संपले आमचे कार्य म्हणतात । ऋषीपंचमीस समाधीस्त । कथा एकोणिसाव्यात ॥ ८० ॥ जागे केले गणपताच्या पत्नीस । वागू द्यावे पतिच्या मर्जीस । दानधर्म करता दसर्‍यास । नाही मुकणार वस्त्रालंकारास ॥ ८१ ॥ नको कंटाळू घरच्या त्रासास । दर्शन दिले जांजळास । पूर येतो मन नदीस । वाचवले माधव मार्तंड जोशास ॥ ८२ ॥ भिकार्‍याच्या रूपात । यादवास दर्शन देतात । कापसाच्या व्यापारात । त्याचा फायदा करतात ॥ ८३ ॥ न जाऊ दिले तेल्हार्‍यास । व्यतीपात योगास । थांबवतात भाऊस । तीर्थ प्रसादास ॥ ८४ ॥ दिनकरास घेरले सोबणी रोगाने । बरा झाला शेरणी नवसाने । चंद्रभागेस झालेले दुखणे । बरे झाले तीर्थ अंगार्‍याने ॥ ८५ ॥ रामचंद्राची पत्नी वेडमुक्त झाली । मठाला प्रदक्षिणा फळाला आली । जयपुरची बाई उत्सवास आली । भूतपिशाच्च पीडा टळली ॥ ८६ ॥ तीस फुटांवरून गवंडी पडला । तत्क्षणी झेलला त्याला । योगी कुणास न दिसला । क्षणात अदृष्य झाला ॥ ८७ ॥ रामचंद्र पाटिलास । दर्शन देते झाले त्यास । दक्षिणा नको सांगितले त्यास । पहावे मठाच्या कारभारास ॥ ८८ ॥ शतचंडीत आले विघ्न । गुरूकृपे झाला निर्विघ्न । भक्तांचा शुद्ध हेतू जाणून । महाराज येतात धावून ॥ ८९ ॥ समाधीनंतर महाराज दर्शन देतात । आपल्या भक्तांस रक्षितात । श्रद्धेचे महत्व पटवतात । कथा येतात विसाव्यात ॥ ९० ॥ गणामहाराज सांगे स्वानुभवाने । सांगतो येथे खात्रीने । नामस्मरण करावे श्रद्धेने । तेणे महाराजांचे येणे ॥ ९१ ॥ जैसे दर्शन, संभाषण गणामहाराजास । तैसेच लाभो सर्वांस । हीच प्रार्थना महाराजांस । आनंद लाभुद्या सर्वांस ॥ ९२ ॥ गणामहाराज सांगे भक्तांस । ज्याला वाटे मुक्त व्हावे संकटास । त्याने आळवावे गजाननास । गण गण गणात बोते मंत्रास ॥ ९३ ॥ श्रद्धेने पाच गुरूवार करावे । शेगावी गुरूंचे दर्शन घ्यावे । शेगावच्या पाच वार्‍या करावे । तेणे संकटमुक्त व्हावे ॥ ९४ ॥ बोलू नये दुसर्‍याशी पारायणात । चित्त ठेवावे गजाननात । पारायण ठरविलेल्या संकल्पात । पूर्ण होण्या महत्व त्यात ॥ ९५ ॥ मनाची तळमळ असल्यावर । का न संकल्प पूर्ण होणार ? । लागतो मनोनिर्धार । ठरतो गुरूंचा आधार ॥ ९६ ॥ ऐसे पारायण करावे । गुरू गजानने स्वयेच दर्शन द्यावे । गुरू सहाय्य लाभावे । शुद्ध हेतू पूर्ण व्हावे ॥ ९७ ॥ पीठले झुणका भाकर । गुलाब फुले नि वार गुरूवार । महाराजांस प्रिय फार । परी श्रद्धेला महत्व फार ॥ ९८ ॥ विसरू नका गणपती सरस्वतीस । दृष्टांत दिला गणामहाराजास । आज्ञा गणामहाराजास । लिहावे गुरू गजानन लीला ग्रंथास ॥ ९९ ॥ १९८७ माघ वद्य सप्तमीस । गुरू प्रकट दिनास । दिनांक २० फेब्रुवारी १९८७ स । आज्ञा झाली ग्रंथलेखनास ॥ १०० ॥ मातापिता कुलदेवतांचे आशिर्वाद । प. पू. योगीराज समर्थ गजाननाचे आशिर्वाद । प. पू. पांडुरंग शास्त्री आठवले गुरूंचे आशिर्वाद । सदा पाठीशी निर्विवाद ॥ १०१ ॥ पत्नी सौ. सुनीतीच्या सहाय्याविना । न झाले ग्रंथलेखन । पुत्र देवेन्द्र कन्या प्रज्ञा । देती संमती ग्रंथलेखना ॥ १०२ ॥ बंधू चंद्रकांत (दीपक) । बंधू श्यामकांत (अनिरुद्ध) । परमभक्त मनुभाई कोठारी त्यात । श्रीमती इंदूताई नेने होत्या सप्ताहात ॥ १०३ ॥ गुरूवारी दिनांक २६ फेब्रुवारी १९८७ स । महाशिवरात्रीच्या दिवसास । सायंकाळच्या प्रहरास । ग्रंथ जातो पूर्णत्वास ॥ १०४ ॥ प. पू. राजाराम महाराज गद्रे (बडोदे) प्रथम दिवसास । प. पू. दत्तात्रेय शास्त्री प्रकाशकर (बडोदे) पूर्णाहुतीस । ह्या थोर विभूतींचे आशिष । लाभले गणामहाराजास ॥ १०५ ॥ परोक्ष अपरोक्ष सहाय्य गणामहाराजास । तेणेच ग्रंथ जातो पूर्णत्वास । जेणे आनंद सर्वांस । ह्याची जाणीव गणामहाराजास ॥ १०६ ॥ आता विनवितो गजाननास । गुरूलीला वर्णनास । काही न्यूनता असल्यास । क्षमा करावी गणामहाराजास ॥ १०७ ॥ प. पू. दासगणू कृत “गजानन विजय ग्रंथ” । “गजानन कथासार” डॉ. भिंगारकर कृत । पोथी सकळकळे कृत । ठरले ग्रंथास सहाय्यभूत ॥ १०८ ॥ दशमी, एकादशी, द्वादशीस । गुरूपुष्य नक्षत्र योगास । तसेच गुरूवारास । वाचावे एकवीस अध्यायांस ॥ १०९ ॥ जो श्रद्धेने ग्रंथ वाचणार । जो शुद्ध हेतूने वाचणार । जो तळमळीने वाचणार । त्याचा मनोरथ पूर्ण होणार ॥ ११० ॥ ॥ शुभं भवतु ॥ ॥ श्री गणपती सरस्वतीर्पणमस्तु ॥ ॥ इति श्रीगुरूगजाननलीला ग्रंथस्य एकविंशोऽध्यायः संपूर्णः ॥

Aliquam sed mauris

Sed lorem ipsum dolor sit amet et nullam consequat feugiat consequat magna adipiscing tempus etiam dolore veroeros. eget dapibus mauris. Cras aliquet, nisl ut viverra sollicitudin, ligula erat egestas velit, vitae tincidunt odio.

Contact

Address
B2/201 Ashvamegh 3, Akota Munj Mahuda Rd. • Vadodara, GJ 390 020 • INDIA
Email
info@ganamaharaj.org