श्री गणेशाय नम: । हे वक्रतुंडा विघ्नहर्ता । तू सुखकर्ता । तू दुःखहर्ता । तू पावतोस शरणागता ॥ १ ॥ क्रोध कारण नाशास । शंकरास प्रत्ययास । स्वतःच्या मुलाच्या मुखकमळास । क्रोधाने छेदले त्यास ॥ २ ॥ क्रोध इतका नसावा । जेणे जीव चिंताक्रांत व्हावा । दुसर्‍यास ताप नसावा । हाच मार्ग अनुसरावा ॥ ३ ॥ भक्ती करावी इतुकी । संतोष होण्या इतुकी । दुसर्‍या आनंद देण्या इतुकी । नको प्रपंचास पोरकी ॥ ४ ॥ इतके असावे नामजपाला । जेणे प्राप्त शांत चित्ताला । महत्व आहे शांतीला । समाधानी वृत्तीला ॥ ५ ॥ प्रयत्नवादी असावे । अल्पसंतुष्ट नसावे । प्रयत्नवादी असावे । परी दुसर्‍याचे न हिरवावे ॥ ६ ॥ दुसर्‍याच्या हिरावण्यात । निश्चित र्‍हास । हेच येते प्रत्ययास । नको ऐशा कृत्यास ॥ ७ ॥ ज्याला वाटे व्हावे मंगल । नको चिंतन अमंगल । आचरण होता मंगल । गाठता मुक्काम मंगल ॥ ८ ॥ नामामुळे मंगल चिंतन । मंगल चिंतने गुरू स्मरण । गुरू स्मरणे गुरू चरण । तेणे घरास मंगल तोरण ॥ ९ ॥ जे मंगलमय झाले । ते गुरूमय झाले । भक्तीने जे जे अर्पिले । ते ते गुरूने स्विकारले ॥१० ॥ असेच गुरू गजानन भोळे । त्यांनी भक्तांस जवळ केले । भक्ताने गांजाचे नवस केले । श्री गुरूंनी ते स्विकारले ॥ ११ ॥ गांजाचा केला नवस । केवढे भक्ताचे साहस । जाणले गुरूंनी भक्तास । त्याच्या शुद्ध मनास ॥ १२ ॥ शेगावी गुरू गजानन असता । गर्दीस काय पुसता ? । मुद्दाम न कधी जमवता । ओढ लागते चित्ता ॥ १३ ॥ गर्दी नाही जमवावी लागत । जैसी दिसे राजकारणात । नेते भाड्याने जमवतात । गुरू नामाने जमवतात ॥ १४ ॥ नेत्यांचे अशुद्ध चित्त । त्यात भर पाडते वित्त । नाना क्लुप्त्या अंगीकृत । ओढण्या आपल्या पक्षात ॥ १५ ॥ गुरूंचे सदा शुद्ध चित्त । तुच्छ लेखतात वित्त । सत्कृत्याच्या भरीत । भक्तीभाव जागृत ॥ १६ ॥ शुद्धतेची बैठक टिकते । नच भाडोत्री टिकते । हेच अनुभवास येते । शुद्धतेत सारे मिळते ॥ १७ ॥ गुरू बोल मौलिक विचार । कोण त्यास भ्रष्ट करणार ? । जो दुसर्‍यास उद्धरणार । तो सदाचारीच असणार ॥ १८ ॥ कितीही प्रसंग बिकट । कळते गुरूची किंमत । श्री गुरू चमत्कृतीने श्रेष्ठ । नेता धन क्लुप्त्यात श्रेष्ठ ॥ १९ ॥ ऐसा नेता टिकणार । जो शुद्ध चित्ताने वागणार । वेदांचे सार हेच सांगणार । चित्त शुद्धीत सारे टिकणार ॥ २० ॥ जगावे व्यवहारापुरते । अंतरी भाव ईश्वरा भेटण्याते । मनाने त्याचे होण्याते । सदा कृपा त्याची असते ॥ २१ ॥ जो ईश्वर प्राप्तीस उत्सुक । तो नामाचे रोपटे लावण्यास उत्सुक । नाम घेता हसतमुख । ईश्वर भेट हसतमुख ॥ २२ ॥ जो नामाची ऐशी बी पेरतो । तो नामाने अविनाशी ठरतो । जरी तो देह रूपाने जातो । परी नामाने चिरंजीव होतो ॥ २३ ॥ नित्य ताजे नवे । शेगावी दिसावे । जेथे महाराज असावे । लीलेनेच नाचावे ॥२४ ॥ बंकटाच्या घरी । ऐन सकाळच्या प्रहरी । दर्शनास नरनारी । परगांवांहुन येणारी ॥ २५ ॥ नाना तर्‍हेचे भक्त जमले । नाना तर्‍हेचे नवस झाले । महाराजांचे दर्शन घेतले । कृतकृत्य झाले ॥ २६ ॥ तर्‍हेवाईक भक्तांचे तर्‍हेवाईक नवस । प्रसन्न करावे गजाननास । आले नवस फेडण्यास । कृपाशिष घेण्यास ॥ २७ ॥ गजाननाचे दास होण्याते । सर्वांनाच वाटते । परी नाही सोपे इतुके । हे अनुभवानेच पटते ॥ २८ ॥ वारंवार परिक्षा घेतात । जे उत्तीर्ण होतात । तेच दास होतात । बाकीचे तसेच रहातात ॥ २९ ॥ गुरू चरण सहज न मिळे । नुसत्या नवसाने न मिळे । स्वतःचे ओतावे लागते सगळे । हे सकळांस न कळे ॥ ३० ॥ आधी व्हावे लागते त्याचे । मग नवस बोलायचे । ऐसे नवस बोलायचे । जे गुरूने स्विकारायचे ॥ ३१ ॥ असाच गोसावी काशीचा । अंतर्मनाने महाराजांचा । नवस केला गांजाचा । म्हणे स्विकार करावा त्याचा ॥ ३२ ॥ प्रातःकाळच्या समयाला । काशीचा गोसावी आला । पहातो तो रांगेला । म्हणे कैसे होईल दर्शनाला ॥ ३३ ॥ रांगेत श्रीमंत नरनारी । हा गोसावी भिकारी । कोण त्यास उभा करी । क्षणभर विचार करी ॥ ३४ ॥ भगवी चिंधी डोक्यास । फाटकी लंगोटी नेसण्यास । एक झोळी बगलेस । बसून राहिला कोपर्‍यास ॥ ३५ ॥ दर्शनास गर्दी फार । दर्शन कैसे होणार ? । हाच सतत विचार । गोसाव्यास सतावे फार ॥ ३६ ॥ मुखे होतसे नामस्मरण । गजानन गजानन । होतसे त्याचे चिंतन । म्हणे कैसे घडेल दर्शन ? ॥ ३७ ॥ मी काशीस असताना । ऐकल्या त्याच्या कथा । ओढ लागली माझ्या चित्ता । आलो दर्शना करता ॥ ३८ ॥ काशीस असताना । गांजाचा नवस बोलताना । काही न आले माझ्या मना । कैसे अर्पण करावे ह्यांना ? ॥ ३९ ॥ गांजाचा नवस कळता । लोक मारतील लाथा । म्हणे भ्रष्ट करण्या करता । तू आलास येथे येता ॥ ४० ॥ परी मी बोललो मनाने । नवस केला आवडीने । स्विकारावी बुटी गुरूने । धन्य होईल माझे जीणे ॥ ४१ ॥ जे मला आवडते । त्याचे नवस होते । तेच अर्पण करण्याते । नवसाची पूर्ती होते ॥ ४२ ॥ त्याच्या जे जे मनात । विचार होते चालत । अंतर्ज्ञानाने जाणतात । श्री गुरू साक्षात ॥ ४३ ॥ अहो रांग जरी भली मोठी । परी प्रसन्न झाली गुरू माऊली । गुरूंनी खूण केली । गोसाव्यास ती पटली ॥ ४४ ॥ श्री गुरू कित्येक वेळी । न बोलती मुळी । बोलती ते ऐशा वेळी । जे ठरते योग्य वेळी ॥ ४५ ॥ हा गोसावी मुळचाच पुण्यवान । त्यात करे नामस्मरण । शिल्लक असता पुण्य । चांगल्या कुळी जनन ॥ ४६ ॥ जीवाचा संबंध अवलंबणार । एक एक कर्मावर । पुण्य कर्मावर । पुण्यवान होणार ॥ ४७ ॥ काशीचा गोसावी पुण्यवान । गजानने त्यास ओळखून । आणले बोलावून । एका कोपर्‍यातून ॥ ४८ ॥ गुरूस मनातले कळते । हे तत्व खरे ठरते । अगाध शक्ती जाणते । ह्याचे प्रत्यंतर येते ॥ ४९ ॥ गोसाव्याच्या खिशातली । गांजाची बुटी काढली । म्हणे का रे ऐशी लपवली ? । खुण सार्‍यांस पटवली ॥ ५० ॥ गजानन समर्थ ठरले, ठरणार । गोसावीही मुळचाच हुशार । संधीचा फायदा घेतला सत्वर । गुरूस बोलला तत्पर ॥ ५१ ॥ बुटी काढीन एका अटीवर । तुम्ही कधी न करावी दूर । गुरूंनी दिला होकार । केला तिचा स्विकार ॥ ५२ ॥ गुरू नाही भाळला बुटीला । जरी जवळ केले बुटीला । गुरू भाळले भोळ्या भावाला । जेणे गांजाचा स्वीकार केला ॥ ५३ ॥ काहिंना असे वाटते । नवसाने काय होते? । तीर्थ अंगार्‍याने काय होते? । हेच त्यांना कोडे पडते ॥ ५४ ॥ जे वैद्यकीय इलाजाने । नाही बरे होणार दुखणे । कैसे तीर्थ अंगार्‍याने । बरे होईल दुखणे? ॥ ५५ ॥ शंका कुशंका मनात । तर्क वितर्क मनात । काहूर माजते मनात । नाना प्रश्र्न मनात ॥ ५६ ॥ चित्ताची शांती ढळते । विचार चक्र जलद चालते । ऐसे चक्र जलद चालते । गुरू काय करणार तिथे ? ॥ ५७ ॥ गुरू ऐसे नाही वदणार । जेणे शांती ढळणार । गुरू दोषित नसणार । कर्मच दोषित ठरणार ॥ ५८ ॥ जीवनी कर्म प्रधान ठरते । प्रत्येक जीवास करावे लागते । त्याचे फळ भोगावे लागते । कोणी न सुटणार त्याते ॥ ५९ ॥ जैसे ज्याचे चिंतन । तैसे त्याचे आचरण । नको शंकेस स्थान । जेणे धोक्याचे कारण ॥ ६० ॥ शंकेने जी जी कृती । तेथे न होते प्रगती । संशयात्मा विनश्यती । हीच ठरते खरी उक्ती ॥ ६१ ॥ अहो वेदान्त एवढे सांगितले । ज्यांनी ज्यांनी अनुसरले । ते जीवनी धन्य झाले । जीवनाचे सार्थक झाले ॥ ६२ ॥ श्रद्धेने जे जे होते । ते फलदायी ठरते । श्रद्धेवर अवलंबण्याते । बोजे हलके होते ॥६३ ॥ श्रद्धेने टळते गंडांतर । ह्याचे येते प्रत्यंतर । जानराव देशमुखावर । आले एकदा गंडांतर ॥ ६४ ॥ शेगावात जानराव देशमुख । प्रसिद्ध व्यक्ती एक । तापाने पीडला देशमुख । झाली गती मरणोन्मुख ॥ ६५ ॥ ज्वराने जानरावास घेरले । कित्येक दिवस गेले । वैद्यकीय इलाज झाले । परी सारे निकामे ठरले ॥ ६६ ॥ रोग गेला बळावून । जानराव झाला क्षीण । जो होतो जर्जर क्षीण । तेव्हाच गुरू चरणी लीन ॥ ६७ ॥ हेच प्रत्ययास आले । जानरावाचे तसेच झाले । औषधोपचार सरले । आप्तेष्ट विचारात पडले ॥ ६८ ॥ नच काही उरले बळ । जो होतो हतबल । तो जातो गुरू जवळ । टाळण्या संकट सकळ ॥ ६९ ॥ बंकटाच्या घरी । गुरू माऊली वास करी । जावे त्याच्या घरी । आप्तेष्ट विचार करी ॥ ७० ॥ साधुने मनात आणता । त्याचे कृपाशीष मिळता । जानराव वाचेल आता । नको उशीर आता ॥ ७१ ॥ एक बंकटाकडे आला । वृत्तांत सारा वदला । म्हणे प्रार्थना करा गुरूला । द्यावे तीर्थ अंगार्‍याला ॥ ७२ ॥ त्यावर बंकट बोलला । श्रद्धेने घेता तीर्थाला । आराम पडेल त्याला । खात्री देतो तुम्हाला ॥ ७३ ॥ आपल्या वडिलांस वदला । भवानीराम थोर भला । विनवू लागला गुरूला । म्हणे देतो तीर्थ अंगार्‍याला ॥७४ ॥ श्री गुरू ! आम्ही अंधारात चालतो । दृष्यासच सत्य मानतो । अदृष्यास असत्य मानतो । अपयश येता धाव धेतो ॥ ७५ ॥ दावावा प्रकाश सत्वर । भाव सारा श्रद्धेवर । जेणे जानरावाचा ज्वर । जाईल सत्वर ॥ ७६ ॥ तीर्थ दिले आप्तेष्टाला । गेला जानरावाच्या घराला । श्रद्धेने पाजले त्याला । श्रद्धेचा महिमा आला फळाला ॥ ७७ ॥ गजानने वाचवले एका जीवाला । संत टाळती गंडांतराला । याचा प्रत्यय आला । गुरू खर्‍या अर्थी समर्थ म्हणायला ॥ ७८ ॥ जानरावाचा ज्वर बरा केला । तीर्थ अंगार्‍याचा महिमा पटवला । जो तो गजाननाचा झाला । चरण धरू लागला ॥ ७९ ॥ गुरूचरण तीर्थ फळाला । आले जानरावाला । तैसेच येवो तुम्हाला । हीच प्रार्थना गजाननाला ॥ ८० ॥ गजानन नव्हते नुसते वेषधारी । खरेखुरे सक्षात्कारी । जानरावास पटल्यावरी । भंडारा घातला बंकटाघरी ॥ ८१ ॥ भलते सलते प्रश्र्न । नका पुसू विनाकारण । गुरू जवळ जाऊन । व्हाल फजितीस कारण ॥ ८२ ॥ श्रद्धेचा खेळ चालतो । जो श्रद्धेवर विसंबतो । तोच वेळप्रसंगी तरतो । ऐसे गुरू वारंवार सांगतो ॥ ८३ ॥ उगाच घेऊ नका परिक्षा । तुम्ही काय घेणार परिक्षा ? । तो उत्तीर्णच होणार परिक्षा । नको शंका कुशंका ॥ ८४ ॥ तुम्ही काय प्रश्र्न विचारणार? । तुमचे प्रश्र्न क्षुल्लक असणार । निरर्थक असणार । परी उत्तर समर्पक मिळणार ॥ ८५ ॥ प्रश्र्न विचारावे ऐसे । जीवन जगावे कैसे? । सुसंगत होईल कैसे? । भगवंतास काय हवेहवेसे? ॥ ८६ ॥ अंतःकरणाच्या ओढीने । होतात गुरूदर्शने । आकर्षितो तळमळीने । नच व्यवहारी धनाने ॥ ८७ ॥ ऐशी भक्त्ती करावी । जेणे गुरूमुर्ती प्रसन्न व्हावी । हीच अंतरिच्छा असावी । गुरूचरणी व्यक्त करावी ॥ ८८ ॥ गुरू जे अंतरंग जाणणार । ते कैसे हजेरीला भुलणार ? । ते कैसे धनाला भुलणार ? । ते खर्‍या प्रेमाला भुलणार ॥ ८९ ॥ हजेरी नाही महत्वाची । बैठक असावी तळमळीची । ओढ असावी चित्ताची । तेणे वेळ गुरूप्राप्तीची ॥ ९० ॥ जे तळमळीने मिळते । तेच केवळ टिकते । जे मनापासून नसते । ते उघडकीस येते ॥ ९१ ॥ फजितीस कारण होते । गुरूकृपा नष्ट होते । जे असते ते जाते । विठोबाचे जे झाले ते ॥ ९२ ॥ ऐसाच विठोबा घाटोळ । जो राहिला समर्थांजवळ । ढोंग लोभाचे वाढता बळ । गुरूने दूर लोटले तत्काळ ॥ ९३ ॥ जीवनात भाव महत्वाचा । तैसाच बोल अंतरीचा । त्या विठोबा घाटोळाचा । भाव लोभी वृत्तीचा ॥ ९४ ॥ शुद्ध भाव नव्हता साचा । तेणे योग गुरूकृपा नष्टचा । कळस झाला ढोंगीपणाचा । प्रसंग आला फजितीचा ॥ ९५ ॥ महाराजांनी ओळखले त्यास । विठोबा घाटोळ भक्तास । सांगितले कित्येक वेळेस । नको होऊ फजितीस ॥ ९६ ॥ नको अनुसरू ढोंग कधी । करशील एके दिवशी उपाधी । नको करू भ्रष्ट बुद्धि । घालवशील सुवर्णसंधी ॥ ९७ ॥ गुरू स्वभावाने कडक । सोसले प्रसंग अनेक । परी परमार्थात जे बोचक । गुरूस न खपणार एकेक ॥ ९८ ॥ एकदा गुरू निद्रावस्थेस । परगावची मंडळी दर्शनास । हेतु सांगितला विठोबास । वशील्याने जवळ केले त्यासी ॥ ९९ ॥ वशीला जैसा उपयोगी । तैसाच ठरे निरुपयोगी । खरा सत्पुरुष योगी । कधी वशीला न मागी ॥ १०० ॥ ह्याचेच आले प्रत्यंतर । महाराज रागावले फार । विठोबा घाटोळावर । आला प्रसंग अनावर ॥ १०१ ॥ केवढा अनर्थ घडला । विठोबा कायमचा दुरावला । परी गुरूचा ताप गेला । गुरू उपाधीमुक्त झाला ॥ १०२ ॥ महाराज मुळचेच अलिप्त । कैसे होणार लीप्त? । व्यवहारात नि उपाधीत । जे सर्व जन असतात ॥ १०३ ॥ महाराज उपाध्या टाळतात । भाव अंतरीचा जाणतात । जे खरे गुरू असतात । ते ऐसेच वागतात ॥ १०४ ॥ ऐसे समर्थ गजानन । चमत्कृती विलक्षण । थक्क होती जन । सहज धरती गुरुचरण ॥ १०५ ॥ गणामहाराज सांगे । जो शुद्ध अंतरंगे वागे । तेणे न होणार वावगे । होईल त्याच्या मनाजोगे ॥ १०६ ॥ श्रद्धा शुद्धतेचा अभाव । तैशा कृतीस होता वाव । तेणे गुरूप्राप्ती अभाव । गुरूकृपा अभाव ॥ १०७ ॥ तळमळ श्रद्धा जाणून । गुरू करती भक्त रक्षण । शुद्ध अंतरंगाविण । न लाभे गुरू चरण ॥ १०८ ॥ ॥ शुभं भवतु ॥ ॥ श्री गणपती सरस्वतीर्पणमस्तु ॥ ॥ इति श्रीगुरूगजाननलीला ग्रंथस्य तृतीयोऽध्यायः संपूर्णः ॥

Aliquam sed mauris

Sed lorem ipsum dolor sit amet et nullam consequat feugiat consequat magna adipiscing tempus etiam dolore veroeros. eget dapibus mauris. Cras aliquet, nisl ut viverra sollicitudin, ligula erat egestas velit, vitae tincidunt odio.

Contact

Address
B2/201 Ashvamegh 3, Akota Munj Mahuda Rd. • Vadodara, GJ 390 020 • INDIA
Email
info@ganamaharaj.org