श्री गणेशाय नम: । हे वाग्देवते, मयुरेश्वरी । तुझा वास आमच्या घरी । अज्ञान कैसे राहिल घरी ? ॥ १ ॥ जगात महत्व ज्ञानाला । नच नुसत्या धनाला । धनाच्या जमाखर्चाला । ज्ञान कारक उत्पत्तीला ॥ २ ॥ धन गुरफटवे व्यवहारी । लौकिकात जीव अडकतो भारी । पैशाचे मोजमाप दारोदारी । पैसाच बेजार करी ॥ ३ ॥ मोहमाया सतावे भारी । तिचे साम्राज्य घरोघरी । द्रव्य माध्यमे वावरी । काळजास जखम करी ॥ ४ ॥ अज्ञानाच्या असता राशी । धनिक राहतो उपाशी । जरी अगणित राशी । परी ज्ञानी खातो तुपाशी ॥ ५ ॥ येथे तूप संबंध दर्शवितो । क्रिया प्रक्रिया दर्शवितो । सत्वाचा संबंध दर्शवितो । जो जीवनी आधार ठरतो ॥ ६ ॥ जीवनात तत्वाला महत्व फार । तैसेच सत्वाला महत्व फार । जेथे ह्यांचे प्राधान्य असणार । तेथे दैन्य कैसे टिकणार ? ॥ ७ ॥ दैन्य सैन्य अज्ञानी माणसास । न बाधक ज्ञानी माणसास । नाश त्याचा विनासायास । हेच येते अनुभवास ॥ ८ ॥ हा खेळ चमत्कृतीचा । त्या जगत् निर्मात्याचा । ईश्वरी सत्ता टिकविण्याचा । हाच हेतू असेल त्याचा ॥ ९ ॥ हे तत्व कळले ज्ञान्याला । हेच दृष्टोत्पत्तीला । सारी ईश्वराचीच लीला । म्हणे नको महत्व आपल्याला ॥ १० ॥ गणामहाराज प्रार्थितो । देवा ! लेखन करा म्हणतो । अज्ञान दूर करा सांगतो । ज्ञानी करण्यास सांगतो ॥ ११ ॥ श्री गुरू गजानन लीला । ऐशी येऊ दे लेखनाला । वाचता आनंद मनाला । जो तो सांगेल दुसर्‍याला ॥ १२ ॥ जो करेल ह्याचे पारायण । तो न भटकणार वणवण । पळुन जाईल अज्ञान । मुक्काम करेल ज्ञान ॥ १३ ॥ जेथे सरस्वतीच लिहिणार । गणपती कृपादृष्टी असणार । तेथे काय कमी असणार? । सारे उत्कृष्टच असणार ॥ १४ ॥ गुरूलीला ठरते सार्थक । सुरस कथा एकेक । त्यातील कथा आहे एक । अग्निनिर्मितीची एक ॥ १५ ॥ अशाच एका वैशाख मासी । अक्षय तृतियेच्या दिवशी । चमत्कृती जाहली ऐशी । ती अक्षयच राहिली ॥ १६ ॥ गुरू चमत्कृती नाही करत । सहजगत्या कृत्यात । इच्छा शक्ती एवढी श्रेष्ठ । घडते जे जे विचारात ॥ १७ ॥ ते नाहीत जादुगार । जे नजरबंदी करणार । क्षणभर भासवणार । त्याच्यावर उदर भरणार ॥ १८ ॥ अवलंबतो जादूगार । जादू नि दृष्टीदोषांवर । वाक्‌चातुर्यावर । वातावरण निर्मितीवर ॥ १९ ॥ संतांचे वेगळेच सारे । त्यांचे न ऐसे पसारे । अंतरंगातले दाखवणारे । दृष्टीदोष दूर करणारे ॥ २० ॥ जादूगाराचे ध्येय उदर भरण । प्रेक्षकांचे मनोरंजन । संतांचे ऐसे आचरण । कृतीतून सहज शिकवण ॥ २१ ॥ जादूगाराचे मुद्दामपणे । कृती न घडे सहजपणे । संतांच्या सदाचरणाने । कृती घडते सहजपणे ॥ २२ ॥ तेथे मनाचा निर्मळपणा । मनाचा सात्विकपणा । कनवाळु कृपाळुपणा । पदोपदी जिवंतपणा ॥ २३ ॥ मनोरंजने दुःख न हरे । ते क्षणभरी विसरे । विरंगुळा पळभरे । परी चिंता काळजी न सरे ॥ २४ ॥ संत केवळ नामावर । भक्तांचे दुःख हरणार । जे संतांचे होणार । ते दुःखमुक्त होणार ॥ २५ ॥ जो दुःखमुक्त होतो । तो सदा संतांशीच असतो । मनोरंजन गौण समजतो । नामावरच असतो ॥ २६ ॥ वैशाख अक्षय तृतियेला । महत्व घटदानाला । संतुष्ट करावे ब्राह्मणाला । जेणे संतोष देव पितराला ॥ २७ ॥ नच संतुष्ट देव पितर । नुसत्या घटदानावर । ते संतुष्ट सत्कृत्यांवर । तैसेच सदाचरणावर ॥ २८ ॥ कोणत्या मायबापास । ऐसे ये‌ईल मनास । की आपल्या लेकरांस । संकटांनी घेरावे त्यांस ? ॥ २९ ॥ मायबाप जिवंतपणी । जपे लेकरांस क्षणोक्षणी । सांगे दुष्कृत्ये त्यजुनी । रहावे सत्कृत्यांतुनी ॥ ३० ॥ आपल्या स्वानुभवांवर । अपत्ये जपणार । जेथे ऐसे संस्कार । त्यांचीच स्मृती टिकणार ॥ ३१ ॥ महत्व आहे गुरूलीलेला । महत्व नाही शब्दलीलेला । महत्व आहे घटनेला । अक्षय तृतियेला ॥ ३२ ॥ एका वैशाख मासी । अक्षय तृतियेच्या दिवशी । महाराज सकाळी भक्तांपाशी । बाळगोपाळांपाशी ॥ ३३ ॥ महाराज होते नामजप तंद्रीत । पोरे होती बागडत । महाराजांना नव्हती नडत । जो तो आपापल्या तंद्रीत ॥ ३४ ॥ बाळगोपाळांतही परमेश्वर । जो हे तत्व जाणणार । तो कैसे दूर लोटणार ? । तो त्यांत परमेश्वर पहाणार ॥ ३५ ॥ महाराजांना वेड नामजपाचे । त्यातच ते धुंद व्हायचे । तैसेच वेड चिलीमीचे । परी न व्यसन त्याचे ॥ ३६ ॥ कधी नामजप तंद्रीत । कधी चिलीमीच्या मस्तीत । कुणी नव्हता रोकू शकत । कोण पडणार भानगडीत ? ॥ ३७ ॥ महाराजांची काढण्यात खोड । जाते कार्यात तड । भगवंताची न जोड । काही न वाटणार गोड ॥ ३८ ॥ जो तो उत्सुक जोडण्यात । सर्वदा उपाध्या टाळण्यात । तो नाही पडणार भानगडीत । परी हाताची बोटे सारखी नसतात ॥ ३९ ॥ त्या दिवशी सकाळी । चिलीम नाही पेटलेली । स्वारी ऐसीच बसुन राहिली । चिलीम बाजूस पडलेली ॥ ४० ॥ चिलीमीस हवा वैश्वानर । जेणे चिलीम पेटणार । ते शोधत होते ऐसा नर । जो दे‌ईल त्यांस वैश्वानर ॥ ४१ ॥ पोरांना बोलावले । विस्तवाचे सांगितले । पोरे आपापसात बोले । विस्तव कोठे मिळे ? ॥ ४२ ॥ तेथे जरूर होती अग्नीची । एका तत्वाची । उणीव असता त्यांची । काय स्थिती व्हायची ? ॥ ४३ ॥ देहही पंचमहाभुतयुक्त । हे जाणत होते समर्थ । ते न बसणार अवलंबत । परी वेळेनुसार क्रिया घडतात ॥ ४४ ॥ चिलीमीस अग्नी निमित्त । बोलले समर्थ पोरांप्रत । परी जीवनातले खरे तथ्य । दडविणे न उपयुक्त ॥ ४५ ॥ जगात सत्वच टिकणार । सत्यच टिकणार । जो ह्या तत्वावर जगणार । तोच अमर होणार ॥ ४६ ॥ संतांचा संबंध सत्याशी । नच नुसत्या देहाशी । त्यांची एक एक कृती ऐशी । चमत्कृती झालीशी ॥ ४७ ॥ पोर असतात हुशार फार । कुठे काय मिळणार । हे पटकन कळणार । कुणा न ते पुसणार ॥ ४८ ॥ पोरांच्या डोळ्यासमोर । जानकीराम सोनार । अग्नीविणा न धंदा होणार । म्हणे हाच देईल वैश्वानर ॥ ४९ ॥ सारी पोरे पळाली । सोनाराकडे धावली । माऊली तेथेच राहिली । पोरांकडे बघत राहिली ॥ ५० ॥ पोरे म्हणाली सोनारास । शेठजी आलो तुमच्या घरास । एक विनंती करण्यास । नका दुखवू बाल मनास ॥ ५१ ॥ सोनार म्हणे पोरांस । ऐसे काय बालमनास ? । जेणे सकाळच्या वेळेस । येणे माझ्या घरास ॥ ५२ ॥ पोरे त्यास म्हणाली । आज गुरूमाऊली । चिलीमीवाचून तशीच राहिली । अग्नीविणा चिलीम न पटली ॥ ५३ ॥ माऊलीच्या चिलीमीस । अग्नी हवा त्यास । तो अग्नी मागण्यास । आलो तुमच्या घरास ॥ ५४ ॥ ऐकले सर्व सोनाराने । नकार दिला मानेने । माझ्याकडे मागणे । म्हणजे ते समर्थ नसणे ॥ ५५ ॥ जो योगी म्हणवतो स्वतःस । नागवाच फिरतो रस्त्यास । विधीनिषेध नसे त्यास । पुटपुटतो येईल ते मुखास ॥ ५६ ॥ अक्षय तृतिया दिनास । न द्यावे अग्नीस । काय कळते पोरांस । रागे भरले पोरांस ॥ ५७ ॥ त्या नंग्या पिश्यास । योगलीला अवगत त्यास । कां न निर्मिले अग्नीस ? । धाडले माझ्या घरास ॥ ५८ ॥ त्यानेच करावा वैश्वानर । त्याच्या योगबळावर । रागे भरला पोरांवर । काढून दिले घराबाहेर ॥ ५९ ॥ घालवून दिले परत । म्हणे आता उपाधी रहित । चालीरीती जपण्यात । जन्म घालवला त्यात ॥ ६० ॥ कुणी न सुटे कर्मावाचून । त्याचे फळ मिळाल्यावाचून । जन्मोजन्मीच्या हिशोबातून । कुणी न सुटे त्यातून ॥ ६१ ॥ कर्माचा संबंध प्रसंगाशी । वर्तणूक त्यावेळी जैसी । फळे मिळणार तैसी । हेच तत्व गीतेसी ॥ ६२ ॥ कर्मकृतीची सांगड ऐशी । कोण करणार नाहिशी? । जो ऐशा प्रयत्नासी । ठरे व्यवहार अपयशी ॥ ६३ ॥ जो पडतो ऐशा भानगडीत । संकटे स्वयेच त्याच्या दारात । उपाय सारे थकतात । गुरू चरण धरावे लागतात ॥ ६४ ॥ जानकीरामाचे तसेच झाले । महाराजांना न ओळखले । पोरांना तसेच वाटेला लावले । तेच उपाधीचे कारण झाले ॥ ६५ ॥ महाराजांजवळ परत । हिरमुसली तोंडे परत । जानकीराम न अग्नी देत । तैसेच धाडले परत ॥ ६६ ॥ महाराज न चिडले त्यावर । जशास तसे न वागणार । त्यांचा भरवसा ईश्वरावर । म्हणे काय आज होणार ? ॥ ६७ ॥ बोलले ते बंकटासी । काडी धरावी तू ऐसी । न संबंध पेटीच्या गंधकाशी । अग्नी प्रकट करण्यार्‍या तत्वासी ॥ ६८ ॥ बंकटे तैसे केले । काडीस वरती धरले । भोवताली सारे जमले । टकमक बघू लागले ॥ ६९ ॥ टक लावून पहाता महाराजांनी । आळवले मनोमनी । अंतरात्म्याच्या हाकेनी । तेथेच प्रकटला अग्नी ॥ ७० ॥ योगबळाचे ऐसे झाले । अग्नीस प्रकटणे भाग पडले । सारेच सहज घडले । महाराज समर्थ ठरले ॥ ७१ ॥ इकडे जानकीरामास । वृत्त कळले त्यास । आश्चर्य वाटले त्यास । तैसाच थरकाप मनास ॥ ७२ ॥ केला अविचार फार । संकटे आपणा घेरणार । कोण सहाय्य करणार ? । विचारात पडला सोनार ॥ ७३ ॥ दशरथाचे हातून । श्रावणाचे प्राणोत्क्रमण । अनपेक्षित आले घडून । परी दशरथ न सुटला त्यातून ॥ ७४ ॥ येथे आज आपण । महाराजांना चिथावून । बनलो मुद्दाम कारण । आता प्रसंग दारूण ॥ ७५ ॥ अविचाराचा झाला ताप । झाला त्यास मनस्ताप । त्याला जाहला पश्चाताप । बोल निघती आपोआप ॥ ७६ ॥ ते ही सहजपणे घडते । अंतरंग उकलले जाते । कोंडलेले बाहेर पडते । किती कोंडून रहाणार ते ? ॥ ७७ ॥ तेथे न जरूर शिकवणीची । उपदेशाच्या डोसांची । सारी लीला परमेश्वराची । खेळ मांडणार्‍याची ॥ ७८ ॥ वर्‍हाडात अक्षयतृतियेला । महत्व फार चिंचवण्याला । आप्तेष्ट भोजनाला । जमले सोनाराच्या घराला ॥ ७९ ॥ जानकीरामाच्या मनात । जमवावे आप्तेष्ट । चिंचवणे भोजनात । तृप्त होतील आप्तेष्ट ॥ ८० ॥ विचार मनीचा चांगला । जो परवडणार लौकिकाला । जन सुखाच्या सोबतीला । संत दुःखाच्या सोबतीला ॥ ८१ ॥ चिंचवण्यात किडे पडले । निमंत्रिलेले उपाशी राहिले । वचवच करू लागले । फजितीचे कारण झाले ॥ ८२ ॥ उपासमारीचे पातक झाले । सोनाराच्या नशिबी आले । काही सुचेनासे झाले । तोंडचे पाणी पळाले ॥ ८३ ॥ घाबरून गेला क्षणात । किडे दिसती चिंचवण्यात । गोंधळला मनात । काय झाले स्वयंपाकात ? ॥ ८४ ॥ अद्वातद्वा भाषण । निघाले त्याच्या मुखातुन । घाम सुटला दरदरून । काही न सुचे त्यातून ॥ ८५ ॥ सकाळच्या उपाधीस टाळले । मोठ्या आपत्तीचे झाले । क्षणभर सुचेनासे झाले । गोंधळाचे साम्राज्य झाले ॥ ८६ ॥ संत आणि ईश्वर । स्वतःचे अस्तित्व टिकवणार । कैसे खोटे ठरणार ? । चमत्कृतीने अमर होणार ॥ ८७ ॥ संतांचे हृदय कोमल । करती सर्वांस जवळ । दाखवतात योगबळ । संकटे होती विफळ ॥ ८८ ॥ संतांच्या अंगी सामर्थ्य । दिसे त्यांच्या कृतीत । ऐसेच गजानन समर्थ । कळले जानकीरामाप्रत ॥ ८९ ॥ काहींनी सांगितले जानकीरामास । शरण जावे योग्यास । शरण जावे गजाननास । जेणे मुक्त होशील संकटास ॥ ९० ॥ जानकीराम वदला जनांस । अग्नी न दिला चिलीमीस । तेणेच ऐशा प्रसंगास । शरण जाण्या न धाडस ॥ ९१ ॥ जानकीरामास वाटले । गजाननास दुखवले । तेणे अंतरी कोपले । तेणे चिंचवणे नासले ॥ ९२ ॥ कैसे असते अज्ञान ? । समर्थ न सामान्य जन । जेणे क्लुप्ती आचरण । समर्थ तर दयाघन ॥ ९३ ॥ अहो योगी न पडे भानगडीत । जो मुळचाच उपाधीरहित । तो न करणार ऐसे कृत्य । जे ठरेल दुष्कृत्य ॥ ९४ ॥ संत योगी संकटहर्ता । नच संकटकर्ता । तो विघ्नहर्ता । नच विघ्नकर्ता ॥ ९५ ॥ श्रद्धेने तुम्ही पहाता । श्रद्धेने तुम्ही भजता । चरणी ठेवता माथा । तोच तुम्हास त्राता ॥ ९६ ॥ श्रद्धेने मिळते सारे । अश्रद्धेने जाते सारे । श्रद्धेवर अवलंबणारे । तरले आजवर सारे ॥ ९७ ॥ तो शरण गेला महाराजांस । त्याने धरले गुरूचरणास । विनविता झाला त्यांस । कृपा करावी लेकरास ॥ ९८ ॥ पश्चातापे बोलता झाला । चिलीमीस अग्नी न दिला । तेणेच प्रसंग ओढवला । कुणी न सहाय्यभूत ठरला ॥ ९९ ॥ गुरू ऐशी करावी कृती । जेणे टळेल माझी आपत्ती । चिंचवण्यातले किडे दूर होती । जेणे आप्तेष्ट उपाशी न रहाती ॥ १०० ॥ गेलो पुण्य कर्म करण्यास । परी झालो कारण पापास । तुम्हीच तारणार आम्हांस । हेच येते अनुभवास ॥ १०१ ॥ समर्थांचे हृदय द्रवले । त्यांनी त्यास जवळ केले । मी न तुझे चिंचवणे नासले । उगाच तुझे येणे झाले ॥ १०२ ॥ महाराज म्हणे “अरे सोनार! । मी न खोटे बोलणार । तुझे चिंचवणे आहे मधुर । कैसे किडे त्यात असणार ?” ॥ १०३ ॥ सार्‍या जनांनी ऐकले । चिंचवणे पुन्हा पाहिले । चिंचवणे पूर्वव्रत दिसले । एकही कीडा नसलेले ॥ १०४ ॥ सारे जन थक्क झाले । समर्थांचे अधिकार कळले । समर्थांचे चरण धरले । त्यांचेच भक्त झाले ॥ १०५ ॥ आता पुढे काय झाले? । ते सांगणे भाग पडले । ज्येष्ठ महिन्यात ऐसे घडले । चंदू मुकिनाचे भाग्य उदयास आले ॥ १०६ ॥ संत मागतात ज्या घरचे । ते घर ठरते भाग्याचे । ऐसेच झाले चंदू मुकिनाचे । कान्होले मागितले त्या घरचे ॥ १०७ ॥ संतानी त्याच्या घरचे ओळखले । जे जे घरात दडून बसलेले । परी ते न चंदू मुकिना दिसले । तेणे समर्थ अंतर्ज्ञानी ठरले ॥ १०८ ॥ समर्थांची चमत्कृती ऐशी । तिचा संबंध जडतो मनाशी । तैसेच अंतरंगाशी । तेच येते प्रत्ययासी ॥ १०९ ॥ एक वेळ योगी राहील उपाशी । परी भीक न मागणार कुणाशी । हक्काने सांगणार त्यांसी । आलो तुझ्या दाराशी ॥ ११० ॥ तो नाही भीक मागत । केवळ ईश्वराच्या आदेशात । कृती आचरणात । कर्ता करविता भगवंत ॥ १११ ॥ भगवंत कर्ता असल्यावर । चमत्कृतीच घडणार । साधेपणा नसणार । काही विशेष घडणार ॥ ११२ ॥ एका ज्येष्ठ मासात । ते भक्तांच्या समवेत । निःस्सीम भक्त चंदू मुकिन त्यात । महाराज नामजप तंद्रीत ॥ ११३ ॥ कुणी खडीसाखर वाटती । कुणी पंख्याने वारा घालती । कुणी आंबे कापती । कुणी फोडी हातावर ठेवती ॥ ११४ ॥ महाराज म्हणाले मुकीनाला । आंबे नकोत मला । दोन कानवले उतरंडीला । तेच द्यावे खायला ॥ ११५ ॥ मुकीन म्हणाला त्यावर । “कानवले कुठून असणार ?” । एक महिना झाल्यावर । कानवले कुठून टिकणार ? ” ॥ ११६ ॥ समर्थ हसले त्यावर । त्यांची दृष्टी गेली उतरंडीवर । तेथल्या कानवल्यांवर । म्हणे मुकीना “आण तू सत्वर ॥ ११७ ॥ मुकीना नको फसवू मला । नको प्रयोजन ताज्याला । दे शिळेच खावयाला । जे आहेत उतरंडीला” ॥ ११८ ॥ लोक अवघे बोलती । चंदू मुकीनाप्रती । जावे सत्वर घराप्रती । संत न खोटे वदती ॥ ११९ ॥ तो क्षणभर गोंधळला । तसाच तो चालता झाला । गेला आपल्या घराला । कानवले घ्यावयाला ॥ १२० ॥ चंदू आला घराला । कांतेस पुसू लागला । “कानवले उतरंडीला । आहेत का सांग मला ? ” ॥ १२१ ॥ पत्नी बोलती झाली पतीला । “तुम्हीच पहावे उतरंडीला । कान्होल्यास महिना झाला । कैसे रहातील उतरंडीला?” ॥ १२२ ॥ चंदूने उतरंडीस पाहिले । आश्चर्य त्यास वाटले । कानवले होते सुकलेले । उतरंडीस जे पडलेले ॥ १२३ ॥ कानवले पार गेले सुकून । कैसे गुरूस करणार अर्पण? । येथे आहे तत्वज्ञान । वृत्तीवर सारे अवलंबून ॥ १२४ ॥ जे जे आपणास रुचावे । तेच दुसर्‍यास द्यावे । आधी दुसर्‍याचे विचार करावे । मग स्वतःचे हित साधावे ॥ १२५ ॥ दोघे पती पत्नी । हेच विचार मनोमनी । सुकलेले कानवले पाहुनी । अर्पण करण्याचे न धाडस मनी ॥ १२६ ॥ पती पत्नी दोघे आले । उतरंडीचे कानवले । आणते जाहले । परी महाराजांस विनविले ॥ १२७ ॥ नका खाऊ सुकलेले । ताजे करून आणते झाले । समर्थांनी स्मित केले । ताजे शिळे भेद न उरले ॥ १२८ ॥ नुसते न कर्मफळ जाणुनी । तत्व आणले आचरणी । धन्य ती पती पत्नी । कैसे रहाणार कृपेवाचुनी ॥ १२९ ॥ पत्नी योग्यास म्हणते । “ताजे कानवले करते । तेच तुम्हास धाडते । नको विचार शिळ्याचे ते” ॥ १३० ॥ महाराज मुळचेच चमत्कारिक । सुकलेले न बाधक । ताजे शिळे सर्व एकच । कृतीही त्यांची तशीच ॥ १३१ ॥ सुकलेले जे मागितले । तेच कानवले खाल्ले । ताजे शिळे भेद न राहिले । हे पटवते झाले ॥ १३२ ॥ महाराजांच्या हयातीत । अनेक भक्त शरणागत । माधव विप्र त्यात । रहातसे चिंचोलीत ॥ १३३ ॥ संसाराचे चटके सोसत । आयुष्य सरले त्यात । प्रयत्न सारे विफलात । तेणे झाला शरणागत । १३४ ॥ माधव ऐसा विप्र नर । घरदार नि पत्नी सुंदर । संततीयुक्त परीवार । सौख्यात पडत होती भर ॥ १३५ ॥ पुण्य कर्म संपत होते । नविन भरीचे नाव नव्हते । चिंता काळजीचे नाते । माधवाच्या नशिबी होते ॥ १३६ ॥ पत्नीत सदा मन रमलेले । अपत्यांच्या हितात गुंतलेले । पहाता पहाता पुण्य सरले । हे ही त्याला न कळले ॥ १३७ ॥ जितुके शिल्लक असते । तेवढेच उपयुक्त ठरते । प्रयत्नावीण न मिळते । हेच अनुभवास येते ॥ १३८ ॥ पहिले जेव्हा जाते । तेव्हाच दुसरे येते । हेच नेहमी घडते । परी सर्वांना न कळते ॥ १३९ ॥ शिळे न काही टिकत । ताजे न काही उरत । ताजेच शिळे होण्यात । ताजेपणा संपण्यात ॥ १४० ॥ सृष्टीचा चालला ऐसा क्रम । कर्म करण्यास परिश्रम । न करता काहि न उद्यम । न चालणार जीवनक्रम ॥ १४१ ॥ सारे अवलंबे परिश्रमांवर । जो असतो श्रद्धेवर । श्री गुरू आज्ञेवर । त्यासही टाकावी लागे भर ॥ १४२ ॥ ज्या देहात आत्मा असतो । तो चैतन्य मागतो । चेतनामय जीवन करतो । तोच प्रवृत्तीमय राहतो ॥ १४३ ॥ नुसते नसावे देहावरती । भार असावा आत्म्यावरती । जे आत्म्यास संतोषती । तेच भवसागर तरती ॥ १४४ ॥ माधवाचे प्रयत्न देहपुष्टीत । बायको पोरे पोसण्यात । नुसतेच उदर भरण्यात । नच परमेश्वर प्राप्तीत ॥ १४५ ॥ त्याने जाणले देहाला । त्याने न ओळखले आत्म्याला । आतल्या आवाजाला । कैसे ओळखणार परमेश्वराला ? ॥ १४६ ॥ प्रत्येकाच्या नशिबात । लेण देण निश्चित । माधवही होता त्यात । बायको पोरे समवेत ॥ १४७ ॥ वेळेवेळेनुसार । आपत्ती आली माधवावर । ज्यांच्यावर प्रेम जीवापाड । तेच ठरली निराधार ॥ १४८ ॥ पूर्वसंचिताप्रमाणे । यमराजाचे बोलावणे । पत्नी मुलांस क्रमाक्रमाने । तेणे माधवाचे व्यर्थ जीणे ॥ १४९ ॥ माधवाचे वय साठावर । एक एक अवयव क्षीण फार । हमाधुनीचा केला संसार । जीव रमवला प्रपंचावर ॥ १५० ॥ माधव झाला उदास । जीवन झाले भकास । आधार न राहिला त्यास । कंटाळा आला जगण्यास ॥ १५१ ॥ जो निराधार बनतो । आप्तेष्ट त्यास दूर लोटतो । एखादाच पुढे येतो । जो मदतरूप होतो ॥ १५२ ॥ जन सुखाचे सोबती । जन भोजनाचे सोबती । पंचपक्वान्ने झोडती । त्याची वाहवा करती ॥ १५३ ॥ मनमिळाऊ वृत्तीने जो वागतो । दुसर्‍यांस मदतरूप होतो । केवळ धनाचा हिशोब नसतो । त्याला परमेश्वर सहाय्यभूत होतो ॥ १५४ ॥ जन असतात भोजनभाऊ । आपत्तींचा वाटतो बाऊ । एखादाच म्हणे मदतरूप हो‌ऊ । बाकीचे पळून जाऊ ॥ १५५ ॥ आपत्तींना घाबरतात । पळुन जातात क्षणभरात । पळण्याने संकटे नाही टळत । भोगण्याने कमी होतात ॥ १५६ ॥ जीवास प्रारब्ध भोगावे लागते । नियतीचे कोडे न उलगडते । कर्मच प्राधान्य ठरते । तैसे तेणे भोगणे होते ॥ १५७ ॥ आपली मती न चालणार । अंधारातच रमणार । सवय झालेली आजवर । अंधारातच मरणार ॥ १५८ ॥ अंधारच त्याला घेरतो । काळ उभा ठाकतो । प्रयत्न करून कंटाळतो । शेवटी भरवसा ठेवतो ॥ १५९ ॥ संसारात खाव्या लागतात ठोकरा । अनुभवाने सूज्ञ जरा । हाच मार्ग आहे बरा । अन्यथा संकटे येरझारा ॥ १६० ॥ जे वासनामय जगणार । त्यांना मर्म न कळणार । ते वासनेतच गुरफटणार । धोक्यात अडकणार ॥ १६१ ॥ अहो वासनाच त्यांना खाणार । ते काय वासनेला खाणार ? । ते मृगजळाला भुलणार । वासनेच्या आहारी जाणार ॥ १६२ ॥ वासना उपभोगल्याने वाढतात । लोक अग्नीत तेल ओततात । भडका होता प्रयत्न करतात । सारे प्रयत्न विफल होतात ॥ १६३ ॥ नको दोष परमेश्वरास । दोष द्यावे आपल्या कर्मास । जैसे ज्याचे आचरणास । तैसे त्याचे फळ त्यास ॥ १६४ ॥ महाराज सांगतात माधवास । नको हो‌ऊ हताश । नको उतरू उपोषणास । समजून घे मूळ तत्वास ॥ १६५ ॥ माधव उपोषण करतो । नाना तर्‍हे विनवितो । महाराजांजवळ बसतो । परी उसना वैरागी ठरतो ॥ १६६ ॥ जे अंतरंगात नसणार । ते कोठून टिकणार ? । परमार्थात उसने न टिकणार । अंतरंगातले उकलले जाणार ॥ १६७ ॥ परमार्थात घालावे लागते स्वतःचे । निःस्वार्थ नि निःस्पृहतेचे । महत्व शुद्ध अंतरंगाचे । शुद्ध सात्विक विचारांचे ॥ १६८ ॥ जो भरतो ऐशा घागरी । तहानलेला भगवंत त्याचे घरी । जो ऐशी कर्मे आचरी । तोच भवसागर तरी ॥ १६९ ॥ महाराज म्हणे माधवास । तरूणपणी ऐसा वागलास । नुसता देह पोसलास । काय उपयुक्त वृद्धापकाळास ? ॥ १७० ॥ पोसलेस अशाश्वतास । विसरलास शाश्वतास । तैशा आता कर्मफळास । सुटका न तुझ्या जीवास ॥ १७१ ॥ माधवाने हट्ट केले । उपोषण चालू ठेवले । लोकांचे यत्न व्यर्थ ठरले । हट्टासी न सोडले ॥ १७२ ॥ नाही पटले माधवास । बसला सान्निध्यास । आळवे भगवंतास । विनवे महाराजांस ॥ १७३ ॥ रात्रीच्या दोन प्रहरी । शब्द किर्र करी । अंधार पसरला चौफेरी । कुत्री भुंकती वरचेवरी ॥ १७४ ॥ रूप अक्राळ विक्राळ । धारण केले तत्काळ । महाराज ठरले काळ । माधवाच्या गेले जवळ ॥ १७५ ॥ धावून गेले अंगावर । काय करणार माधव त्यावर । कांपू लागला थरथर । बोबडीच वळली सत्वर ॥ १७६ ॥ वाचा क्षणात गेली । छाती धडधडू लागली । गात्रे ढीली झाली । पाचावर धारण बसली ॥ १७७ ॥ माधवाची झाली फजिती । ऐसी पाहुनी त्याची स्थिती । समर्थ सौम्य रूप धारण करती । पहाते झाले माधवाप्रती ॥ १७८ ॥ म्हणे हेच का तुझे धीटपण ? । बोलले त्यास गर्जोन । तू काळाचे भक्ष्य जाण । ह्याची करतो तुज जाण ॥ १७९ ॥ चुणुक तुज दाखवली । तुझी परिक्षा पाहिली । यमलोकी न जागा उरली । पळता भुई थोडी झाली ॥ १८० ॥ माधव सर्व पहाता झाला । तसेच ऐकता झाला । समर्था विनवू लागला । परमार्थ दावा मजला ॥ १८१ ॥ माझ्या पातकांच्या राशी । तेणे भय काळजासी । काळाची भिती मजसी । जाळा पातकांच्या राशी ॥ १८२ ॥ माधवाचे ऐकता भाषण । द्रवले समर्थ अंतःकरण । आयुष्य देतो वाढवून । इच्छा असता मनोमन ॥ १८३ ॥ माधवा ! कर तू नामस्मरण । मुखे म्हणावे नारायण । भितीचे न कारण । तारेल तुज नारायण ॥ १८४ ॥ माधव प्रपंचास कंटाळलेला । मुळातच भयभीत असलेला । यमलोकाला घाबरलेला । पातकांची जाणीव असलेला ॥ १८५ ॥ तो काय आयुष्य मागणार ? । तो मरणच मागणार । माधव म्हणे गुरूवर । वैकुंठास धाडावे सत्वर ॥ १८६ ॥ नको प्रपंच माया । तीच जाळते काया । अशाश्वतात जाते वाया । नको गुरफटणे जीवा ॥ १८७ ॥ आलो तुमच्या जवळ । तुम्ही जाणा सकळ । तुमच्यावरी विश्वास अटळ । नको नको आता भुरळ ॥ १८८ ॥ तुम्हीच करा उद्धार । हाच माझा मनोनिर्धार । तुमच्यावरी विश्वास अटळ । नको नको आता भुरळ ॥ १८९ ॥ माधवाचे संकट टळले । काळाचे भय गेले । यमलोकाचे क्लेश टळले । समर्थे त्यास जवळ केले ॥ १९० ॥ धन्य धन्य तो माधव । ज्याची ऐकावी आर्जव । समर्थांस आली कीव । परमार्थाची केली सोय ॥ १९१ ॥ शेगावकर पुण्यवान । ज्यांना लाभले गजानन । एकेकाचे अंतरंग जाणून । परमार्थी केले रममाण ॥ १९२ ॥ एकदा महाराजांच्या मनात । व्हावी वसंतपूजा शेगावात । आनंद वसंतोत्सवात । चिरकाल टिकतो मनात ॥ १९३ ॥ समर्थ वदले शिष्यांस । करावे वसंतपूजेस । बोलवावे ब्राह्मणांस । करण्या मंत्रजागरणास ॥ १९४ ॥ उत्सवात आनंद वृत्ती । ऐक्य भाव जागृत होती । मिळते चैतन्य नि स्फूर्ती । हास्य जनांच्या मुखावरती ॥ १९५ ॥ जीवनात स्फूर्तीला महत्व फार । स्फूर्तीस कारण सदाचार । तेणेच सत्कृत्य साकार । जीवनात महत्व फार ॥ १९६ ॥ सत्विचार कोणाच्या मनात ? । जो असतो तत्व चिंतनात । तोच राहे सत्विचारांत । तोच राहे सत्कृत्यांत ॥ १९७ ॥ सत्विचार न करावे लागत । ज्याला चिंतनाची सोबत । सत्विचार त्याचे मनात । आपोआप येतात ॥ १९८ ॥ सारे सहज घडते । मुद्दाम न होते तेथे । परोपकारी व्हावेसे वाटते । नुसते म्हणणे न उचित ठरते ॥ १९९ ॥ परोपकार करावा सहजपणे । निर्मळ शुद्ध मनाने । शुद्ध अंतःकरणाने । निःस्वार्थ वृत्तीने ॥ २०० ॥ जीवनात महत्व सहजतेला । महत्व आनंद वृत्तीला । तैसेच ऐक्य भावाला । नि धार्मिक वृत्तीला ॥ २०१ ॥ महाराज म्हणाले भक्तांस । उद्या करावे वसंतपूजेस । जी कधीची ईच्छा मनास । लागा तयारी करण्यास ॥ २०२ ॥ समर्थच ईच्छा करणार । ती कां न पूर्ण होणार ? । समर्थांची ईच्छा काय असणार ? । हीच असणार ॥ २०३ ॥ भक्त म्हणती समर्थांस । उद्या करू वसंतपूजेस । परी वैदिक ब्राह्मण न शेगावास । हीच आडकाठी उत्सवास ॥ २०४ ॥ समर्थ म्हणती त्यावर । तयारी करावी सत्वर । सच्चिदानंद ब्राह्मण धाडणार । वसंतपूजा होणार ॥ २०५ ॥ तयारीची सुरूवात झाली । दक्षिणेची सोय केली । हरभर्‍याची डाळ ओली । कैरीची सोबत झाली ॥ २०६ ॥ थंडगार पन्हे । अत्तरासी न उणे । समर्थ जे जे म्हणे । तैसेच होई वागणे ॥ २०७ ॥ दोन प्रहराच्या समयाला । ब्राह्मण आले शेगावाला । थाटात वसंतपूजा सोहोळा । निर्विघ्न पार पडला ॥ २०८ ॥ खरा धर्म ओळखावा । जीव वासनेत न गुरफटवावा । संबंध सत्कृत्यांशी जडवावा । सत्वृत्तींशी जडवावा ॥ २०९ ॥ सत्वृत्ती ज्याच्या पाठीशी । भगवंत त्याच्या पाठीशी । तो कैसा रहाणार उपाशी ? । निश्चिंती त्याच्या मनासी ॥ २१० ॥ व्यर्थ भटकू नका । मूळचे तत्व सोडू नका । सच्चिदानंद विसरू नका । परावृत्त हो‌ऊ नका ॥ २११ ॥ महाराज कैसे विसरणार ? । ते तंतोतंत आचरणार । श्रद्धेने जीवन जगणार । भगवंत मनोरथ पूर्ण करणार ॥ २१२ ॥ सत्वृत्तिच्या सड्यावर । सत्कर्माची रंगावली काढल्यावर । भगवंत का न तेथे येणार ? । त्यास यावेच लागणार ॥ २१३ ॥ भगवंताने धाडले ब्राह्मणांना । शेगावी वसंतपूजेला । एका आनंदोत्सवाला । चेहेर्‍यावरचे हास्य टिकवायला ॥ २१४ ॥ केवढी सदिच्छा मनाची । पूर्तता व्हावी त्याची । मर्जी असावी भगवंताची । खूण पटते त्याची ॥ २१५ ॥ समर्थांची ईच्छा समर्थ ठरली । सारी मंडळी आनंदित झाली । समर्थांची खूण पटली । भक्त मंडळी नतमस्तक झाली ॥ २१६ ॥ ॥ शुभं भवतु ॥ ॥ श्री गणपती सरस्वतीर्पणमस्तु ॥ ॥ इति श्रीगुरूगजाननलीला ग्रंथस्य चतुर्थो‌ऽध्यायः संपूर्णः ॥

Aliquam sed mauris

Sed lorem ipsum dolor sit amet et nullam consequat feugiat consequat magna adipiscing tempus etiam dolore veroeros. eget dapibus mauris. Cras aliquet, nisl ut viverra sollicitudin, ligula erat egestas velit, vitae tincidunt odio.

Contact

Address
B2/201 Ashvamegh 3, Akota Munj Mahuda Rd. • Vadodara, GJ 390 020 • INDIA
Email
info@ganamaharaj.org