श्री गणेशाय नम: । जलावाचून जीवन । शुष्क होणार जीवन । वरुणास शतशः वंदन ॥ १ ॥ तैसेच कृपेवाचून । जे जे होते क्रीयमाण । जे जे होते लेखन । ते नुसते शब्दांचे घडण ॥ २ ॥ जेणे गणामहाराज विनवे । कृपाशिर्वाद असावे । ऐसे ग्रंथ लेखन व्हावे । सार्‍यांनी चकित व्हावे ॥ ३ ॥ प्रत्येकास वाटावे । कृपाशीष असावे । जीवन सुसंगत व्हावे । मनोरथ पूर्ण व्हावे ॥ ४ ॥ शेगावी समर्थांभोवती । भक्तगण अवती भोवती । प्रसन्न होण्या गुरूमूर्ती । नाना यत्न करती ॥ ५ ॥ सारे भोवती गजानना । समर्थांना न निवांतपणा । कैसे खपणार त्यांच्या मना । त्यांना स्थिर रहावेना ॥ ६ ॥ जो नाही लोकांच्या कौतुकावर । भाळत जनस्तुतीवर । जो मूळचाच जागृत असणार । कैसा अधोगत होणार ॥ ७ ॥ समर्थ चुकवू लागले गर्दीला । टाळू लागले प्रश्र्नोत्तरीला । शोधू लागले ऐशा स्थळाला । निवांतपणा लाभायला ॥ ८ ॥ कोठेही जावे नि रहावे । बंधन कुणाचे नसावे । मुक्तपणे वावरावे । बंदिस्त कधी नसावे ॥ ९ ॥ हे तत्व ज्याने अनुसरले । त्याला मायेचे बंधन न उरले । ज्याने मायेला ओळखले । त्यानेच शाश्वत अशाश्वत जाणले ॥ १० ॥ पुढारी गर्दी करतात । भाडोत्री सारे जमवतात । समर्थ गर्दी टाळतात । एकांतवास पत्करतात ॥ ११ ॥ समर्थांना गर्दी खपत नसे । त्यांच्या कृतीवरुन पटत असे । एका ठिकाणी स्थिर नसे । वायुवेगे धावत असे ॥ १२ ॥ ज्याने काही न ठेवले स्वतःचे । त्याला महत्व काय गर्दीचे ? । नाही महत्व कौतुकाचे । नच महत्व जन निंदेचे ॥ १३ ॥ सच्चिदानंदात रमणार । त्यातच तल्लीन होणार । त्याच्याच तंद्रीत रहाणार । गर्दीस न महत्व देणार ॥ १४ ॥ समर्थांनी नजर चुकविली । शेगांवभुमी सोडली । पिंपळगावची वाट धरली । अरण्याची वाट धरली ॥ १५ ॥ पिंपळगावचे लोक धन्य । ज्यांना लाभे गजानन । भूमी झाली पुण्यपावन । समर्थांचे लागता चरण ॥ १६ ॥ समर्थांचे चरण जेथे । सत्संग घडे तेथे । सदाचरणाशी नाते जडते । सत्वृत्ती जागृत होते ॥ १७ ॥ जीवनात महत्व सत्संगाचे । जेथे सत् असणार । तेथे असत् कसे टिकणार ? । दोघे न एके ठिकाणी नांदणार ॥ १८ ॥ सत् + चित् + आनंद । तेणेच सच्चिदानंद । जेव्हा चित्ताचा सत्‌शी संबंध । तेव्हाच मिळतो आनंद ॥ १९ ॥ जेथे असते सत्‌संगत । तेथे नांदतो भगवंत । तेणे आनंद बागडत । स्वयेच येतो धावत ॥ २० ॥ जीवाचा एकच ध्यास । मज हवा भगवंत सहवास । ऐसे करावे यत्नास । भगवंत लाभावा जीवास ॥ २१ ॥ ऐसा यत्न करावा । भगवंत जोडावा । जीव त्यात रमवावा । जीव सार्थक करावा ॥ २२ ॥ जोडण्याने मिळतो आनंद । त्यातच भेटतो परमानंद । सुख आणि आनंद । ह्यात फार मोठा भेद ॥ २३ ॥ सुखाचा संबंध दुःखाशी । एका सुखात अनेक दुःख राशी । आनंदाचा संबंध परमात्म्याशी । आनंद येता परमानंद दाराशी ॥ २४ ॥ सुख हे दुःखयुक्त । आनंद परमानंदयुक्त । हे तत्व समर्थ ओळखतात । म्हणुनच ते समर्थ ठरतात ॥ २५ ॥ ज्यांच्या कृतीत सामर्थ्य । तेच ठरती समर्थ । सामान्य जन करती अनर्थ । वेळ दवडती व्यर्थ ॥ २६ ॥ मिथ्यास मानती सत्य । सत्यास मानती मिथ्य । सारेच मायेला भुलतात । मायेतच गुरफटतात ॥ २७ ॥ तेच असत्य असते । असंख्य भोग भोगणे होते । एका कृतीवर दुसरी कृती होते । एका चुकीमुळे दुसरी चूक होते ॥ २८ ॥ चूक कळता सुधारता येते । कुणास चूक कळते ? । ज्याला जीवनातले मर्म कळते । त्यालाच चूक लक्षात येते ॥ २९ ॥ जो असतो सावध । कैसा रहाणार बेसावध ? । अनुसंधाने असतो सावध । अन्यथा होतो बेसावध ॥ ३० ॥ जो साधे अनुसंधान । तोच असतो सावधान । जो असतो सावधान । अंतरत्म्याशी अवधान ॥ ३१ ॥ महाराजांनी तत्व जाणले । गर्दीला सहज टाळले । शेगाव सोडून गेले । पिंपळगावासी पोहोचले ॥ ३२ ॥ पिंपळगावच्या शिवारात । जुने पुराणे शिवमंदीर त्यात । हेमाडपंती शिवमंदीरात । समर्थ बसले गाभार्‍यात ॥ ३३ ॥ पद्मासन घालून बैसले । काळवेळेचे भान न राहिले । भूक तहान विसरले । समर्थांचे न काही उरले ॥ ३४ ॥ होते समाधी अवस्थेत । समाधी नाही लावावी लागत । लागते एकरूपतेत । एकरूपताच ठरते श्रेष्ठ ॥ ३५ ॥ होते सर्व पूर्व पुण्याईवर । सत्कृत्याची पडली भर । पुण्याईस येतो बहर । फळे त्याची बहारदार ॥ ३६ ॥ सत्कृत्ये ह्या जन्मी करावी । फळे त्याची पुढिल जन्मी भोगावी । ऐशी कृती आचरावी । ती सत्कृतीच ठरावी ॥ ३७ ॥ ऐसे कर्म करावे । पुण्यफळ पदरी पडावे । दुराचारे वागू नये । हे तत्व सोडू नये ॥ ३८ ॥ कर्मांचा संबंध पूर्व कर्मांवर । पूर्व संचितावर । एका कर्मात दुसरे कर्म होणार । कर्म फळ भोगावे लागणार ॥ ३९ ॥ ऐसे असावे पूर्व संचित । जीव राहील आनंदित । ऐसे नसावे संचित । जेणे जीव व्यथित ॥ ४० ॥ समर्थ सर्व जाणतात । सत्वृत्तीतच रमतात । सत्कृत्येच आचरतात । धर्म रक्षण करतात ॥ ४१ ॥ समर्थ होते समाधी अवस्थेत । एका वेगळ्या तंद्रीत । एका वेगळ्या आनंदात । आपणांस न मिळे वाचनात । ४२ ॥ खरा आनंद स्वानुभवात । नच नुसत्या वर्णनात । नच नुसत्या वाचण्यात । नच नुसत्या ऐकण्यात ॥ ४३ ॥ जीवनात स्वानुभवाला महत्व फार । जो निसर्गाचा नियम असणार । तो समर्थ कैसा मोडणार ? । समर्थांना देखिल कर्मे करावी लागणार ॥ ४४ ॥ समर्थांच्या कर्मात । नि आपल्या कर्मात । फरक आहे मोठा त्यात । एक निःस्वार्थात दुसरा स्वार्थात ॥ ४५ ॥ स्वार्थात होते अधोगती । निःस्वार्थात मिळते सद्‌गती । स्वार्थात न कुणी तरती । स्वार्थात न परमार्थ भेटी ॥ ४६ ॥ जैसी ज्याला संगत । तैसी कर्मे घडतात । तेणे रहावे सत्संगतीत । जेणे रहाल सत्वृत्तीत ॥ ४७ ॥ सायंकाळच्या समयास । गुराखी येत होते घरास । वाटेत डोकावले शिव मंदीरास । बघते झाले समर्थांस ॥ ४८ ॥ पिंपळगावची पोरे जमली । योग्यास जागे करू लागली । समर्थांची ऐशी तंद्री लागली । पोरे न भंग करू शकली ॥ ४९ ॥ पोरांनी फूलहार आणला । महाराजांच्या गळ्यात घातला । भोजनास भाकरीचा तुकडा ठेवला । जो तो बघण्यास उत्सुकलेला ॥ ५० ॥ वाटले पोरांस हा जीव उपाशी । खाईल तो भाकरीशी । पाणी दिले प्यावयासी । करू लागले जे जे मनासी ॥ ५१ ॥ बराच काळ लोटला । सूर्य ही अस्तास गेला । अंधःकार झाला । पोरांचा जीव घराकडे लागला ॥ ५२ ॥ वडील मंडळींना पोरे घाबरलेली । घरची ओढ लागलेली । घरची वाट धरली । विचारचक्रे सुरू झाली ॥ ५३ ॥ पाऊले पडत होती घराकडे । चित्त गुंतले समर्थांकडे । पाऊले पडत होती पुढे । परी विचार मागिलकडे ॥ ५४ ॥ पोरे घरी परतली । देहभान हरपलेली । भूक तहान विसरलेली । प्रत्येकाची हीच तर्‍हा झाली ॥ ५५ ॥ वाट बघती वडील मंडळी । पोरे घरात परतली । शुभंकरोती म्हणती झाली । भोजनाची वेळ झाली ॥ ५६ ॥ काय जेवणार चवीने ? । घास घेत होती हाताने । जेवत होती मुखाने । परी वेगळ्याच विचाराने ॥ ५७ ॥ जेवणात लक्ष लागेना । जाणवले सकळांना । रात्री झोप येईना । चैन न पडे त्यांच्या मना ॥ ५८ ॥ सर्वांचा स्वभाव नसतो सारखा । हाताच्या पाच बोटांसारखा । स्वभाव ज्याचा होता जैसा । आचरला मनोधर्म तैसा ॥ ५९ ॥ काहिंनी घरी सांगितले । काहिंनी लपवले । सवयी प्रमाणे केले । मूळस्वभावास आचरले ॥ ६० ॥ काहिंना संस्कार ऐसे । ते घरात बोलणार कैसे ? । घरात सर्वच बोलायचे नसते । हेच मनावर ठसलेले असते ॥ ६१ ॥ पोरे रात्री झोपी गेली । दृष्ये पुढे येऊ लागली । समर्थ स्वारी दिसू लागली । निद्रा न त्यांस आली ॥ ६२ ॥ रात्र सरली दिनकर आला । दिनचर्येचा आरंभ झाला । ज्यांस वृत्तांत समजला । तो दुसर्‍यांस बोलता झाला ॥ ६३ ॥ जो तो उत्सुक दर्शनाला । पोरांसवे निघाला । आले शिवमंदिराला । समर्थांना पहाण्याला ॥ ६४ ॥ महाराज बसलेले त्याच जागेवर । गळ्यात होता फूलहार । भाकर तुकडा चतकोर । पाणीही तैसेच खापरभर ॥ ६५ ॥ जैसा काल पाहिलेला । तैसाच आज बैसलेला । भाकरीस न स्पर्श केला । भूक तहानही विसरलेला ॥ ६६ ॥ समाधी उतरल्यावर । हा बोलेल साधुवर । कुणी म्हणती पालखी आणा सत्वर । मिरवू त्यास गांवभर ॥ ६७ ॥ एक पालखी आणली । फूल हाराने सजवलेली । त्यात ठेवली गुरूमाऊली । समाधी न भंग पावली ॥ ६८ ॥ गावातील नरनारी । भजनाचा गजर करी । वाजंत्र्याच्या तालावरी । नाचू लागले नरनारी ॥ ६९ ॥ गावात पालखी निघाली । बाल गोपाल सभोवताली । आश्चर्ये वदू लागली । “ऐसी मूर्ती न पाहिली” ॥ ७० ॥ मिरवणूक आली गावात । मारूतीच्या मंदीरात । आणले सद्गुरूनाथ । बसवले थाटात ॥ ७१ ॥ तो ही दिवस तैसाच गेला । लोकांनी विचार केला । केव्हा उतरेल समाधीला ? । लोकांनी नामगजर केला ॥ ७२ ॥ काही समय जाता । देहभानात आले सद्गुरूनाथा । आनंद झाला समस्तां । चरणी ठेवता माथा ॥ ७३ ॥ त्यांची समाधी उतरली । स्वारी नामजपात रंगलेली । दृष्टी सभोवताली गेली । बघती झाली भक्त मंडळी ॥ ७४ ॥ नैवेद्याची पाने आली । समर्थांस अर्पण झाली । वार्ता सभोवताली पसरली । गर्दी पहाता पहाता झाली ॥ ७५ ॥ ज्याने टाळले गर्दीला । पुन्हा बघितले गर्दीला ।टाळू न शकले उपाधीला । विधात्याच्या लीलेला ॥ ७६ ॥ ईश्वरी सत्तेपुढे न काही चाले । हे येथे खरे ठरले । समर्थ न गर्दी टाळू शकले । जरी त्यांनी शेगाव सोडले ॥ ७७ ॥ पिंपळगावचे रहिवासी । मंगळवारच्या दिवशी । गेले शेगांवासी । आठवड्याच्या बाजारासी ॥ ७८ ॥ जाते झाले बाजारास । वदते झाले गावकर्‍यांस । कुणी नंगा बाबा गावास । आला पिंपळगावास ॥ ७९ ॥ कपड्याचा ठिकाणा नाही । आपल्याच तंद्रीत राही । नावागावाचा पत्ता नाही । स्वतःच्या तंद्रीत पडून राही ॥ ८० ॥ वेड्यापिस्यास्तव राही । स्वतःच्याच धुंदीत राही । खरे काहीच कळत नाही । ते कुणाला सांगत नाही ॥ ८१ ॥ वेड्यासारखा वागत नाही । तोंडाने पुटपुटत राही । किंचाळणे माहित नाही । पोरांना मारत नाही ॥ ८२ ॥ कळला वृत्तांत शेगावात । चर्चेचा विषय गावात । कोण असावा साधुसंत । कुतुहल सार्‍यांच्या मनात ॥ ८३ ॥ जेव्हा बंकट जाणता झाला । तो न स्वस्थ बैसला । महाराजांच्या भेटीला । बंकट अधीर झाला ॥ ८४ ॥ क्षणभरात विचार आला । गजाननाचीच लीला । म्हणे जाऊ पिंपळगावाला । पाहू गजाननाला ॥ ८५ ॥ तो पिंपळगावात गेला । योगी पुरुषास बघू लागला । आश्चर्याचा धक्का बसला । महाराजांस ओळखू शकला ॥ ८६ ॥ समर्थांसमोर उभा राहिला । समर्थ चरणी माथा ठेवला । नाना तर्‍हे विनवू लागला । चला स्वामी शेगावाला ॥ ८७ ॥ बंकटास उत्तम संस्कार । तेणे धार्मिक सदाचार । महाराजांचा धरला कर । हाच जीवनी आधार ॥ ८८ ॥ महाराज म्हणाले त्यास । “घाबरतो आदरातिथ्यास । घाबरतो तुझ्या वैभवास । नको कुणाचे घर आम्हास ॥ ८९ ॥ डावे उजवे न खपे आम्हास । मेजवानी न प्रिय आम्हास । शुद्ध भाव प्रिय आम्हास । नको थारा लौकिकास ॥ ९० ॥ नको विनवू मला । पिंपळगावात राहू दे मला । नको शेगांव मला । भितो तेथल्या गर्दीला ॥ ९१ ॥ नको टाकू बंधनात । आम्ही मुळचेच बंधनमुक्त । नको पडू भानगडीत । तू रमावे व्यापारात ॥ ९२ ॥ रहावे तुझ्या पत्नी समवेत । तू रहावे संसारात । तुम्ही शोभता प्रपंचात । आम्ही असतो योगक्रियेत” ॥ ९३ ॥ महाराजांस परत नेण्यास । गाडी आणली पिंपळगावास । बंकटे विनविले गावकर्‍यांस । येऊद्या समर्थ शेगांवास ॥ ९४ ॥ महाराज हवे होते सर्वांना । पिंपळगावकर्‍यांना । तैसेच शेगांवकरांना । कुणीही त्यांना सोडेना ॥ ९५ ॥ बंकट गावकर्‍यांस वदला । महाराज राहतील माझ्या घराला । पूर्वीही होते माझ्याच घराला । जरी आज पिंपळगावाला ॥ ९६ ॥ हे घर न माझे राहिले । माझे माझे काही न उरले । माझे घर न परके राहिले । सारे महाराजांचेच झाले ॥ ९७ ॥ आपण वरचेवर यावे । महाराजांना भेटावे । परी आता मला जाऊ द्यावे । मला न आपण अडवावे ॥ ९८ ॥ सारे गाव खोळंबले । त्याने न कोणाचे ऐकले । समर्थांस गाडीत बसवले । शेगांवात आणले ॥ ९९ ॥ शेगांवकर महाराजांना । काही केल्या सोडेनात त्यांना । नाना तर्‍हेच्या विनवण्या । गावकरी करती त्यांना ॥ १०० ॥ महाराजांची कर्मभूमी । शेगाव हीच त्यांची भूमी । जरी बदलते झाले भूमी । परी शेगावकर नव्हते कमी ॥ १०१ ॥ विधाता जे निश्चित करणार । ते महाराज कैसे बदलणार ? । प्राक्तनात लिहिलेलेच खरे ठरणार । काही वेळेस अपवाद ठरणार ॥ १०२ ॥ गुरूमूर्ती शेगावात आली । पहाता पहाता वार्ता पसरली । पुन्हा गर्दी जमू लागली । भक्त मंडळी आनंदित झाली ॥ १०३ ॥ बंकटास सारी म्हणू लागली । “वा बंकट! कमाल केली । शेगावभुमी पावन केली । तुझ्यामुळेच गुरूमूर्ती लाभली ॥ १०४ ॥ धन्य धन्य तू बंकट । महाराज तुझे ऐकतात । पूर्वपुण्याईच पदरात । जेणे सद्गुरू लाभतात” ॥ १०५ ॥ सारे त्यांना जपत होते । सर्व जण तैनातीत होते । प्रत्येकास महाराज हवे होते । म्हणुनच तसे वागत होते ॥ १०६ ॥ दुसर्‍यांस हवे हवेसे वाटावे । ऐसे जीवन जगावे । सर्वांचे आपण व्हावे । परी अलीप्तेपणे वागावे ॥ १०७ ॥ असा जो वागतो । तोच सर्वांना आवडतो । त्याचाच शब्द झेलला जातो । त्याचाच शब्द आधार ठरतो ॥ १०८ ॥ रोज नित्यनवे भक्तगण । रोज नित्य नवे प्रश्र्न । गुरू कृपाशिष घेऊन । प्रसंगी जात होते तरून ॥ १०९ ॥ महाराज शेगावकर झाले । शेगावकर महाराजमय झाले । आपपर भाव लुप्त झाले । सर्व जण “मी” स विसरले ॥ ११० ॥ महाराजांची सोबत लाभली । तेणे सर्वांच्या गाली खळी खुलली । जीवनाचा आधार मानू लागली । श्रद्धेने शब्द झेलू लागली ॥ १११ ॥ जेथे महाराज मुक्कामाला । तेथे आनंद वस्तीला । जो तो अनुभवु लागला । दुसर्‍यांस सांगू लागला ॥ ११२ ॥ जो तो आनंदाचा भुकेला । जेणे येत होता दर्शनाला । एरव्ही सवड कुणाला ? । चेहेर्‍यावरचे भाव बोलके करू लागला ॥ ११३ ॥ सारे व्यवस्थित चालले होते । शेगावकर मनोमन खुष होते । आनंदाचे साम्राज्य होते । महाराजांवर अवलंबून होते ॥ ११४ ॥ महाराजांनी पुनः एकदा चुकवले । प्रातःकाळी अडगावास निघाले । वायुवेगे पळाले । कुणी न त्यांस थोपवू शकले ॥ ११५ ॥ महाराज फक्त शेगावचे नव्हते । तर ते सर्वांचे होते । ते मुळचेच धुनी होते । वेळोवेळी पटवत होते ॥ ११६ ॥ ते वायुवेगे पळायचे । पहाता पहाता अदृष्य व्हायचे । पहाता पहाता पुन्हा दिसायचे । सारे बळ योग सामर्थ्याचे ॥ ११७ ॥ योग लीलेने त्यांनी कुठेही जावे । कुठेही पडून रहावे । कधी ध्यानस्थ दिसावे । कधी सहज बसलेले दिसावे ॥ ११८ ॥ एके ठिकाणी राहू नये । ऐसे ज्यास वाटावे । बंकटाचे घर कैसे पत्करावे ? । हेच समर्थ कृतीतून पटवे ॥ ११९ ॥ योगी जगू शकतो अन्न पाण्या वाचून । परी नच ईश्वरी सत्तेवाचून । शेगाव जाते झाले सोडून । गेले अडगावी निघून ॥ १२० ॥ वैशाख महिन्याचे दिवस होते । ऊन रखरखत होते । योग्यास चटके बसत नव्हते । वायुवेगे जात होते ॥ १२१ ॥ आजुबाजूस झाडेवेली सुकलेली । पाण्याला सदा मुकलेली । तहानेने तडफडू लागली । काही गळून पडलेली ॥ १२२ ॥ हिरवळीचे नाव नाही । सावलीची सोबत नाही । निसर्गाची कृपा नाही । पर्जन्याचे नाव नाही ॥ १२३ ॥ सारे शुष्क वातावरण । प्रसन्नतेचे न नावनिशाण । प्रत्यक्ष सूर्य नारायण । आग ओकत होता मुखातुन ॥ १२४ ॥ सार्‍यांनाच काढले होरपळून । धरती न सुटली त्यातून । धरतीसही न झाले सहन । होरपळत होता रवीकिरण ॥ १२५ ॥ धरती तप्त झालेली । लाही लाही झालेली । शांततेची परिसीमा गाठली । सहनशक्तीची मर्यादा संपली ॥ १२६ ॥ एका योग्याला कीव आली । त्या साठीच त्याने धाव घेतली । परमेश्वरास विननणी केली । धरती साठी आर्जव केली ॥ १२७ ॥ महाराजांना तहान लागली । चहुकडे दृष्टी फिरविली । पाण्याने त्यांना पाठ दाखवली । तशीच पुढची वाट धरली ॥ १२८ ॥ देहातल्या पाण्याशिवाय । न दिसे कुठे पाण्याची सोय । तहानेने व्याकूळ होता जीव । कोण करणार पाण्याची सोय ? ॥ १२९ ॥ गरज शोधाची जननी । नुसतेच म्हणता पाणी पाणी । हाती न लागणार पाणी । न मिळणार प्रयत्नांवाचुनी ॥ १३० ॥ समर्थे इकडे तिकडे बघितले । पाणी न कुठे दिसले । आळवल्यावाचून न मिळे । हे योग्यासच कळे ॥ १३१ ॥ आळवावे लागते योग्य वेळेला । धावून यावे लागते ईश्वराला । भक्ताच्या रक्षणाला । जैसी माता तान्हुल्याच्या रडण्याला ॥ १३२ ॥ तेवढ्यात दृष्टी गेली शेतावर । समर्थ मुळचेच हुशार फार । शेतात पाणी असणार । त्यावाचून न शेती होणार ॥ १३३ ॥ प्रसंग पडता बाका । ईश्वरास मारा हाका । धावून येतो मारता हांका । रक्षितो प्रसंग बांका ॥ १३४ ॥ समर्थे शेताकडे पाहिले । ईश्वराचे स्मरण केले । येथेच आपणास पाणी मिळे । ऐसे त्यांस वाटले ॥ १३५ ॥ महाराज गेले शेतावर । मालक पाटिल भास्कर । राबत होता शेतावर । भरत होता उदर ॥ १३६ ॥ तो अकोली गावचा । वृत्तांत सांगितला पाण्याचा । गावात दुष्काळ पाण्याचा । जो तो शोधात पाण्याच्या ॥ १३७ ॥ जैसे नेत्याचे नुसते भाषण । जनांस ठेवतो ठणठण । तैसे भास्कराचे भाषण । पाण्याचे न नाव निशाण ॥ १३८ ॥ जो प्राप्त वैभव माझेच म्हणतो । अप्पलपोटी असतो । तेथे मायेचा ओलावा नसतो । तो निर्दयपणे वागतो ॥ १३९ ॥ जो सारे ईश्वराचेच मानतो । तोच दुसर्‍यास देतो । देण्याने न साठा संपतो । परी तो वृद्धिंगत होतो ॥ १४० ॥ ज्ञान दिल्याने वाढते । प्रेम दिल्याने वाढते । भक्ती परोपकारात वाढते । अप्पलपोटीपणात हानी होते ॥ १४१ ॥ जो हे नियम आचरतो । तोच जीवन जगू शकतो । तो जीवनी धन्य ठरतो । जो जीवनी आदर्श ठरतो ॥ १४२ ॥ निसर्गास ओळखावे । ईश्वरी तत्व जाणावे । सारे बांधव मानावे । माझे माझे म्हणू नये ॥ १४३ ॥ अज्ञानी भास्करास काय कळणार ? । तो गाड्याला बैल जुंपणार । शेतीवाडी करणार । स्वतःचीच तुंबडी भरणार ॥ १४४ ॥ जो सृष्टीचा क्रम न जाणणार । हे तत्व कैसे पटणार ? । अनुभवाने जे पटणार । तेच मनावर ठसणार ॥ १४५ ॥ भास्करही होता तसाच । तो वदला समर्थांस । “पुसू नको तू पाण्यास । पाणी नाही आमच्या गावास” ॥ १४६ ॥ महाराज वदले भास्करास । “काय सांगतो आम्हास ! । पिण्या इतुके देण्यास । नको नकारू पाण्यास ॥ १४७ ॥ तहानेने व्याकुळ । नको बडबडू वायफळ । पाण्यानेच तहान शमेल । नच भाषणाने शमेल” ॥ १४८ ॥ भास्करास काय धडे कळणार ? । सारे स्वानुभवातच कळणार । जो तीव्रता अनुभवणार । तोच समंजस होणार ॥ १४९ ॥ चटका सोसल्याने चटका जाणवतो । बाकीचा कोरडा उपदेश ठरतो । जो प्रसंगात होरपळतो । तो दुसर्‍याचे दुःख जाणतो ॥ १५० ॥ भास्कर म्हणे समर्थांस । “नंगा वेडा पिसा दिसतोस । जाऊ नको तिकडच्या विहीरीस । मुळीच पाणी नाही विहीरीस ॥ १५१ ॥ जेथे पाणी नाही थेंबभर । काय तुझी तृष्णा भागणार ? । नावालाच आहे विहीर । कोरडी ठणठणीत साचार” ॥ १५२ ॥ महाराज गेले विहीरीवर । पाणी नव्हते थेंबभर । उभे राहिले क्षणभर । दृष्टिक्षेप केला विहीरीवर ॥ १५३ ॥ टक लावून तेथे बघितले । विहीरीचे चित्त आकर्षिले । विहीरीतच पाणी दडलेले । क्षणात तिने मोकळे केले ॥ १५४ ॥ समर्थांच्या अंगी सामर्थ्य । योगबळाच्या सामर्थ्यात । विहीर भरली क्षणात । देवाण घेवाण आली अस्तित्वात ॥ १५५ ॥ सारे देण्याघेण्यावर चालते । पेरलेलेच उगवते । काही न वाया जाते । हे म्हणणे सार्थक ठरते ॥ १५६ ॥ ह्या जन्मी ऐसे पेरावे । पुढिल जन्मीही उपयुक्त ठरावे । बीज कशाचे पेरावे ? । प्रेम जिव्हाळा परोपकाराचे पेरावे ॥ १५७ ॥ भास्करास सार कळला । अनुभवाने तो जागा झाला । महाराजांस शरण आला । समर्थ चरणी माथा ठेवला ॥ १५८ ॥ तो विसरला बायको पोरे । उदर निर्वाहाचे साधन सारे । गूढ कळले सारे । मूढत्व गेले सारे ॥ १५९ ॥ भास्कर झाला भास्कर । पळुन गेला अज्ञान तस्कर । उदयास येता भास्कर । काही न करे त्यास तिमिर ॥ १६० ॥ ऐसे गुरूवर लाभले । भास्कराचे जीणे धन्य झाले । खर्‍या अर्थाने चरण धरले । समर्थे अंतर्ज्ञानाने जाणले ॥ १६१ ॥ समर्थ वदले भास्करास । भरपूर पाणी विहीरीस । भरपूर पिकव शेतचार्‍यास । भरपूर पाणी गुर ढोरांस ॥ १६२ ॥ तुझे भाग्य आले उदयाला । कुणी न आटवणार विहीरीला । हेच साधन उदरनिर्वाहाला । भरपूर पिकव शेतचार्‍याला ॥ १६३ ॥ मी केवळ निमित्त । जेणे विहीर भरली क्षणात । जे जे तुझे पूर्वसंचित । तेच एकवटून आले क्षणात ॥ १६४ ॥ भास्कर वदला त्यावर । फुकटचा राबलो शेतावर । काही न पदरात आजवर । नुसत्या देहाने केला संसार ॥ १६५ ॥ जेणे प्रपंचाचा वाटतो भार । सदा चिंतेचा आजार । तेणे होतो बेजार । कुणास सारे सांगणार ? ॥ १६६ ॥ सारेच भरकटलेले । सारेच हताश झालेले । सारेच त्रस्त झालेले । अंगातले त्राण गेलेले ॥ १६७ ॥ कोण विव्हळणे ऐकणार ? । कोण आसरा देणार ? । जो तो माघार घेणार । कुणी न पदरचे देणार ॥ १६८ ॥ आम्ही सारेच ऐसे वागतो । प्रपंचातच गुरफटतो । गुरू तूच आम्हास जागृत करतो । जेणे आम्ही भानावर येतो ॥ १६९ ॥ सार्‍यांनी मला लाथाडले । कर्मफळ भोगले । तुम्हीच जवळ केले । भाग्य उदयास आले ॥ १७० ॥ ठेवतो गुरूचरणी माथा । तुम्हीच माझे माता पिता । तुम्हीच आता त्राता । वाटे तुमच्यासवे यावे आता ॥ १७१ ॥ समर्थे योगबळे उत्पन्न केले जलास । बोध झाला भास्करास । ऐसाच होवो सकळांस । तेथेच पांचवा अध्याय पूर्णत्वास ॥ १७२ ॥ गणामहाराज सांगतो येथे । सत्संगतीने जे मिळते । तेच जीवनात टिकते । तेणे जीवन सुसंगत होते ॥ १७३ ॥ त्यास लागते नामाची सोबत । तेणे प्रपंच परमार्थयुक्त । प्रारब्ध भोग न जाणवत । सारे वातावरण आनंदयुक्त ॥ १७४ ॥ ॥ शुभं भवतु ॥ ॥ श्री गणपती सरस्वतीर्पणमस्तु ॥ ॥ इति श्रीगुरूगजाननलीला ग्रंथस्य पंचमोऽध्यायः संपूर्णः ॥

Aliquam sed mauris

Sed lorem ipsum dolor sit amet et nullam consequat feugiat consequat magna adipiscing tempus etiam dolore veroeros. eget dapibus mauris. Cras aliquet, nisl ut viverra sollicitudin, ligula erat egestas velit, vitae tincidunt odio.

Contact

Address
B2/201 Ashvamegh 3, Akota Munj Mahuda Rd. • Vadodara, GJ 390 020 • INDIA
Email
info@ganamaharaj.org