श्री गणेशाय नम: । श्री नृसिंह अवतार श्रेष्ठ ठरला । भक्त प्रल्हाद कारण ठरला । भक्ताच्या तळमळीला । भगवंत साकार झाला ॥ १ ॥ भगवंत विविध रूपात । दिसतो साकारात । विविध प्रसंगात । तत्पर धर्म रक्षणात ॥ २ ॥ असुरांचा होतो भार । धरणी होता बेजार । तू घेतोस अवतार । करतोस असुर संहार ॥ ३ ॥ हे नृसिंहा, भगवंता । असुरी वृत्ती संहारकर्ता । तार गणामहाराजास आता । नको नाव निशाण आता ॥ ४ ॥ शरणागतीत सारे मिळते । उद्धटपणात सारे जाते । विनय विनम्र भावे जगण्याते । ईश्वरीतत्व जागृत होते ॥ ५ ॥ अनुभवाच्या बळावर । भक्त येतो भानावर । जैसा पाटिल भास्कर । कळले जीवनातले सार ॥ ६ ॥ महाराजांचे भक्त अनेक । परी जवळचे मोजकेच । बंकट त्यातला एक । विनयी विनम्र सेवक ॥ ७ ॥ समर्थ बंकटाच्या घरी असता । पदोपदी झाला जपता । त्यांच्या मनाजोगे होता । आनंद वाटे बंकटा ॥ ८ ॥ मोठा धार्मिक वृत्तीचा । आधी समर्थांस द्यावयाचा । मगच स्वतः घ्यायचा । हाच नित्यक्रम त्याचा ॥ ९ ॥ वाटे समर्थच प्रपंच चालवतात । तेच सर्व सोय करतात । ते जे जे मला देतात । त्यातलेच ठेवतो नैवेद्यात ॥ १० ॥ आधी नैवेद्य महाराजांना । मग प्रसाद सर्वांना । कैसे विसरणार त्यांना ? । विसरण्यात विपरित प्रसंग नाना ॥ ११ ॥ नाना तर्‍हेचे भक्त नाना । बिकट प्रसंग महाराजांना । समर्थांची ईच्छा नसताना । करावे लागतसे नाना ॥ १२ ॥ बंकटे आग्रह केला । शेतावर नेण्याचा हट्ट केला । समर्थांस नेले शेताला । मक्याची कणसे खावयाला ॥ १३ ॥ ऐसे वाटले बंकटास । समर्थ चरण लागावे शेतास । भूमी पावन करण्यास । कृपा प्रसाद परिवारास ॥ १४ ॥ बंकट मुळचा पवित्र । संस्कारी मातापित्याचे छत्र । त्यात गुरूकृपा छत्र । सत्संग परिवार मित्र ॥ १५ ॥ महाराज गेले शेताला । संतोष झाला बंकटाला । समवेत मित्र परिवाराला । बोलवता झाला शेताला ॥ १६ ॥ शेतात मक्याची कणसे । जिकडे तिकडे दिसतसे । भरघोस पीक निघतसे । शेतात आनंदे डोलतसे ॥ १७ ॥ भली मोठी विहीर । तुडुंब भरलेली साचार । सभोवताली चिंचेची झाडे डेरेदार । उभी राहिली ऐटदार ॥ १८ ॥ चिंचेच्या झाडाखाली जमले । कणसे भाजणे नक्की केले । एक‌एक आगटी पेटवू लागले । दहा बारा पेटवते झाले ॥ १९ ॥ आगट्या पेटू लागल्या । निघू लागल्या ज्वाळा । धूरही निघू लागला । वर वर चौफेर पसरला ॥ २० ॥ चिंचेवर मधाचे पोळे । कुणी न त्यास पाहिले । आगट्या पेटवू लागले । तेच प्रसंगाचे कारण झाले ॥ २१ ॥ खालुन विस्तव पेटला । माशांना असह्य झाला । स्वतःचा जीव वाचवण्याला । सैरावैरा पळू लागल्या ॥ २२ ॥ त्यांनी घेरले सर्वांना । चावू लागल्या त्यांना । कुणासच तेथे बसवेना । क्षणभर उभे रहावेना ॥ २३ ॥ जो तो पळू लागला । आपला जीव जपू लागला । एरव्ही जीवास कंटाळलेला । येथे जीव वाचवू लागला ॥ २४ ॥ कुणी कुणासाठी न थांबला । जो तो धावू लागला । कणसे खाण्याला मुकला । विपरित प्रसंग आला ॥ २५ ॥ माशांनी सर्वांस केले त्रस्त । कुठचा जीव रमेल उपाधीत ? । सर्वांस वाटे रहावे उपाधी रहित । जो तो ऐशा प्रवृत्तीत ॥ २६ ॥ सर्वजण पळुन गेले । घाबरलेले पळाले । महाराज नव्हते घाबरलेले । जेणे ते तेथेच राहिले ॥ २७ ॥ महाराज बैसले निजानंदात । भितीचा लवलेश न चित्तात । परी माशा त्यांना सोडेनात । घेरले त्यांनी क्षणभरात ॥ २८ ॥ दुसर्‍यांस डसणे स्वभाव माशांचा । आसरा घेतला त्याचा । स्वबचाव करण्याचा । हाच हेतू माशांचा ॥ २९ ॥ दोष नाही माशांचा । दोष आहे दुष्कर्माचा । येतो प्रसंग जीव घेण्याचा । आसरा घेतला त्याचा ॥ ३० ॥ जीवनात कर्माला महत्व फार । जीवनात कर्मावर भार । सामान्य वेगळे आचरणार । असामान्य वेगळे आचरणार ॥ ३१ ॥ माशा पाठीवर बसल्या । सर्वांगावर बसल्या । माशांची पासोडीच अंगाला । जणू दिली पांघरायला ॥ ३२ ॥ क्षणाची न फुरसत त्यांना । डसू लागल्या समर्थांना । कोण अडवणार त्यांना ? । सर्वच घाबरले त्यांना ॥ ३३ ॥ महाराजांची सहनशीलता । कमालीची शांतता । कधी न अनुभवली तत्वता ??? । भिती न उरे माशांस आता ॥ ३४ ॥ महाराज वदती माशांस । तुम्ही डसावे आम्हांस । आम्हां न होणार त्रास । आम्ही जाणतो एका तत्वास ॥ ३५ ॥ जीव वेगळा नसे तुमचा आमचा । दुसर्‍यांस डसणे धर्म तुमचा । आचरा मनोधर्म तुमचा । रक्षण करणे धर्म आमचा ॥ ३६ ॥ सामान्य वागतो जशास तसे । असामान्य विरुद्ध वागतसे । स्वतःचे तत्व सोडत नसे । कुणाचे वाईट करत नसे ॥ ३७ ॥ समर्थ जगावेगळे वागतात । वृत्तीनेच ते समर्थ ठरतात । शत्रुचेही न अशुभ चिंततात । सर्वांचेच कल्याण करतात ॥ ३८ ॥ ते महत्व नाही देत स्वतःला । ते रमवतात दुसर्‍याला । महत्व नाही देत संकटाला । तेणे न दुःख वाट्याला ॥ ३९ ॥ शेवटी माशा कंटाळल्या । त्या तेथुन निघुन गेल्या । दूर दूर पळुन गेल्या । खोडी काढणे पार विसरल्या ॥ ४० ॥ बंकटास कळला वृत्तांत । भयभीत झाला चित्तात । गोंधळला क्षणार्धात । नाना तर्‍हेचे विचार मनात ॥ ४१ ॥ मित्र मंडळी त्याच्या बरोबर । गेली त्याच्या शेतावर । डॉक्टरही होते बरोबर । करण्या ईलाज औषधोपचार ॥ ४२ ॥ बंकट समोर भरभर गेला । समर्थांची माफी मागू लागला । हृदय बोलके करू लागला । नयनातील अश्रू सारू लागला ॥ ४३ ॥ महाराजांच्या पाठीत काटे रुतलेले । बंकटाने स्वतः पाहिले । मन दुःखी कष्टी झाले । उगाच समर्थ येथे आणले ॥ ४४ ॥ डॉक्टरांनी तपासले । काटे काढणे प्रयोजन केले । चिमटा पाठीस लावू लागले । एक एक काटा काढू लागले ॥ ४५ ॥ समर्थ बंकटास वदले । पाठीत काटे जे रुतलेले । आम्हांस त्यांनी न सतावले । नुसतेच जाऊन बसले ॥ ४६ ॥ योगबळावर काढू काटे । नको आम्हां तुमचे चिमटे । योगबळ एकवटले समर्थे । त्यासरशी निघाले रुतलेले काटे ॥ ४७ ॥ बंकटास गहिवरून आले । अंगावर रोमांच आले । समर्थांचे चरण धरले । नको ऐसे धाडस सांगितले ॥ ४८ ॥ खात्री देणे गुरूंना । जमत नाही सर्वांना । आपलेपणाचा भाव ज्याच्या मना । जागृत उत्कट भावना ॥ ४९ ॥ जो ऐसे आचरतो । तोच जीवनी धन्य ठरतो । वरवरपणा वरवर ठरतो । आतला उमाळा प्रभावी ठरतो ॥ ५० ॥ महाराजांचा स्वभाव लहरी । जे जे मनी ते ते आचरी । धावत असे वायुवेगापरी । न टिके कुणाच्या घरी ॥ ५१ ॥ असेच एकदा मनात आले । नजर सार्‍यांची चुकवते झाले । क्षणभरात शेगाव सोडले । वायुवेगे पळाले ॥ ५२ ॥ ते गेले अकोटास । भेटण्या नरसिंगास । सारखाच भेटे सारख्यास । ह्याचे महत्व न दुसर्‍यास ॥ ५३ ॥ नरसींग कोतशा अल्लींचा भक्त । तो होता विठ्ठलाचा भक्त । जो रमला विठ्ठलात । तो वरवर दिसे प्रपंचात ॥ ५४ ॥ तो खरा भक्तीतच रमणार । भक्तीवीण उदास वाटणार । जीव न उदासीनतेत रमणार । तो प्रसन्नताच मागणार ॥ ५५ ॥ भक्त कधी न उदासीनतेत । भक्त सदैव प्रसन्नतेत । मंगलमय वातावरणात । पवित्र वातावरणात ॥ ५६ ॥ प्रपंची भक्तीस घाबरतात । प्रपंचात गुरफटतात । विचारांचे धागे विणतात । त्याच जाळ्यात अडकतात ॥ ५७ ॥ समज गैरसमज ठरतो । दुसर्‍यांचे अनुकरण करतो । चारचौघांसारखे वागतो । स्वयेच स्वतःचा घात करतो ॥ ५८ ॥ दुसर्‍यांचे अनुकरण करावे उक्ती । हीच शिकवण खोटी । जी उपाधी करते मोठी । तेणे संकटे वरच्यावरती ॥ ५९ ॥ प्रत्येकाचा जीव वेगळा । प्रत्येकाचा पिंड वेगळा । पूर्वसंचित साठा वेगळा । हेच येते अनुभवाला ॥ ६० ॥ पूर्वसंचित जसे असेल । तसे फळ भोगावे लागेल । प्रत्येकाचे वेगळे असेल । त्यात नव्या कर्माची भर पडेल ॥ ६१ ॥ हे सारे सामान्य जीवन । नरसिंगाचे वेगळे जीवन । सर्व साधले प्रपंची राहुन । तो न गेला प्रपंच सोडुन ॥ ६२ ॥ कर्म भक्ती योग मार्गावर । गप्पा झाल्या रात्रभर । नव्हता परनिंदेवर भर । आत्मस्तुती अहंभावावर ॥ ६३ ॥ परनिंदा न कुणा तारी । परस्त्रीच्या जाऊ नये आहारी । ऐशी कर्मे ठरती विषारी । कधी न उपयुक्त संसारी ॥ ६४ ॥ विष ठरते नाशास कारण । नको नको दुराचरण । तेणे काळास आमंत्रण । तेणे भयभीत जीवन ॥ ६५ ॥ समर्थ नरसिंगास वदतात । तू बरा प्रपंचात । आम्ही रमलो योगमार्गात । कैसे रममाण प्रपंचात ? ॥ ६६ ॥ मी न राहणार स्थिर । तू प्रपंचात आहे स्थिर । तू कर्ममार्गात स्थिर । मी योगमार्गात स्थिर ॥ ६७ ॥ जरी आपले भिन्न क्षेत्र । एकाच देहाची दोन नेत्र । एकाचे कर्मक्षेत्र । दुसर्‍याचे योग क्षेत्र ॥ ६८ ॥ तू मी वेगळा कायेने । परी आहोत एकाच विचाराने । आपले कार्य विधात्याने । नेमून दिले पूर्वसंचिताने ॥ ६९ ॥ दोघांच्या भेटीचे वृत्त कळले । गावकरी आनंदीत झाले । आशिर्वादास उत्सुकलेले । दोघांस भेटणे नक्की केले ॥ ७० ॥ समर्थे अंतर्ज्ञानाने जाणले । ते नरसिंगास वदले । नको उपाधी जाळे । भेटण्याचे टाळले ॥ ७१ ॥ महाराज पहाटेसच निघाले । अकोट गावातुन अदृष्य झाले । गावकरी भेटण्यास आले । परी सारे हताश झाले ॥ ७२ ॥ दोन संतांची भेट । नव्हती प्रारब्धात । प्रारब्ध ठरले श्रेष्ठ । प्रयत्न ठरले व्यर्थ ॥ ७३ ॥ गावकरी निरुत्साही झाले । हातातले फुलहार तसेच राहिले । जे नव्हते भाग्यात लिहिलेले । तेच येथे अनुभवास आले ॥ ७४ ॥ वस्तुंचे सुद्धा भाग्य असावे लागते । हेच म्हणणे उचित ठरते । सगळीच फुले नाही उमलत । जी भगवंत चरणी लोळत ॥ ७५ ॥ कर्माच्या गती असतात गहन । हे न जाणणार मूढ जन । कर्मासच मिळते प्राधान्य । कर्म फळावाचून न सुटणार जन ॥ ७६ ॥ समर्थांच्या ऐशा चमत्कृती । काय न वर्णणार सरस्वती ? । संत नामाची महती । नाम सर्वांच्या मुखावरती ॥ ७७ ॥ नाममहिमा सरस्वती वर्णणार । जी आनंदित होणार । जी आनंद अनुभवणार । तीच दुसर्‍यांस देणार ॥ ७८ ॥ भाग्य नुसते नाही येत उदयास । प्रयत्न करावे लागती त्यास । नाही प्रयत्नांवाचून यश । हेच येते अनुभवास ॥ ७९ ॥ दुसर्‍याचे सुख हिरावण्यात । काही नाही मिळत । ते कधी नाही टिकत । ते सर्व व्यर्थ ठरत ॥ ८० ॥ ऐसे आपण मिळवावे । जेणे सच्चिदानंदे तोषावे । हरामाचे कधी खाऊ नये । त्याने देह पोसू नये ॥ ८१ ॥ कोण वागतो ऐसे ? । ज्याचे चित्त शुद्ध असे । त्याच्या मनी शुद्ध विचार वसे । तेणेच सुकर्मे होतसे ॥ ८२ ॥ नुसती उपासना न कामास । महत्व असते मनोवृत्तीस । महत्व असते शुद्ध चित्तास । तेणेच वाव सत्कर्मास ॥ ८३ ॥ शुद्ध हेतू लागतो चित्तात । तेणे तैसे वर्तनात । शुद्ध हेतू ज्याच्या मनात । कलह कपटे नसतात ॥ ८४ ॥ जेथे असते शुद्धता । कैसी टिकणार मलीनता ? । जेथे नसते मलीनता । तेथे असते प्रसन्नता ॥ ८५ ॥ जेथे मलीनतेचे निर्मूलन । तेथे मंगलमय वातावरण । तेथे प्रसन्न वातावरण । जेणे सच्चिदानंद आगमन ॥ ८६ ॥ जीवन ऐसे जगावे । दुसर्‍यास उपदेशात्मक असावे । कोरडे उपदेश नसावे । कृतीनेच सार्थक करावे ॥ ८७ ॥ ऐशी आपली वृत्ती असावी । जनांच्या हृदयी चिरकाल टिकावी । परोपकारी वृत्ती असावी । हीच ईश्वर सेवा मानावी ॥ ८८ ॥ नुसते शिकुन नाही होत । यावे लागते आचरणात । यावे लागते सहजगतेत । सहजगता असावी मुळात ॥ ८९ ॥ जे जन सहजभाव जाणतात । तेच खर्‍या अर्थाने जगतात । पुण्याई ज्यांच्या पदरात । तेणे सहजगता जीवनात ॥ ९० ॥ महाराज सहज वावरत । मनात येई तेथे हिंडत । एकदा शिष्यांसह दर्यापुरात । शिवरगाव सान्निध्यात ॥ ९१ ॥ व्रजभूषण तेथे पंडित । कीर्ती विद्वत्ता पदरात । चार भाषा अवगत । होता वेद पारंगत ॥ ९२ ॥ येथे समर्थ आले असता । व्रजभूषण झाला त्यांना पहाता । म्हणे योगी पुरुष हा तत्वता । चरणी ठेवावा माथा ॥ ९३ ॥ जो रोज सूर्यास अर्घ्ये देणारा । नित्यनेम करणारा । तपश्वर्येचे महत्व जाणणारा । भक्ती भावे जगणारा ॥ ९४ ॥ त्याने समर्थांस ओळखले । म्हणे सूर्यनारायणच प्रकटले । आज भाग्य उदयास आले । महाराजांस अर्घ्य दिले ॥ ९५ ॥ महत्व आहे हृदयातल्या भावाला । तैशी कृती आचरण्याला । जैसा भाव हृदयातला । तैसा वाव कृतीला ॥ ९६ ॥ अडवणार तिला कोण ? । समर्थांना मानले सूर्यनारायण । खर्‍या अर्थी जाणले तत्वज्ञान । तैसेच केले आचरण ॥ ९७ ॥ व्रजभूषणे घातले द्वादश नमस्कार । हृदयातला भाव झाला साकार । जो भाव असतो निराकार । तोच कृतीने होतो साकार ॥ ९८ ॥ मूळचाच तो वेदपारायण संपन्न । त्यात लाभले गजानन । लाभता कृपाशिष चरण । धन्य धन्य झाला व्रजभूषण ॥ ९९ ॥ माता जशी लेकराला । जवळ घेते त्याला । तैसेच व्रजभूषणाला । समर्थांनी धरले त्याला ॥ १०० ॥ आशिर्वाद दिला थोर । बाळा तुझा जयजयकार । जाशील कीर्ती शिखरावर । होशील अजरामर ॥ १०१ ॥ कर्मयोग सोडू नको । विधी निरर्थक मानू नको । लिप्त त्यात होऊ नको । संकटास घाबरू नको ॥ १०२ ॥ जावे आता तुझ्या सदनी । माझे बोल ठेव कानी । कर्ममार्ग आचरुनी । धन्य होशील जीवनी ॥ १०३ ॥ श्रीफळ दिले त्यास । आनंद झाला व्रजभूषणास । तपश्चर्या आली फळास । भाग्य आले उदयास ॥ १०४ ॥ जैसे व्रजभूषणाचे भाग्य उदयास । तैसेच येवो आपणास । गणामहाराज प्रार्थितो देवदेवतांस । कृपाशिष लाभो सर्वांस ॥ १०५ ॥ ज्यांच्या कृपे केले वर्णन । त्या सर्वांस शतशः वंदन । वाटे संतुष्ट करावे भक्तगण । हीच प्रार्थना मनोमन ॥ १०६ ॥ ॥ शुभं भवतु ॥ ॥ श्री गणपती सरस्वतीर्पणमस्तु ॥ ॥ इति श्रीगुरूगजाननलीला ग्रंथस्य षष्ठोऽध्यायः संपूर्णः ॥

Aliquam sed mauris

Sed lorem ipsum dolor sit amet et nullam consequat feugiat consequat magna adipiscing tempus etiam dolore veroeros. eget dapibus mauris. Cras aliquet, nisl ut viverra sollicitudin, ligula erat egestas velit, vitae tincidunt odio.

Contact

Address
B2/201 Ashvamegh 3, Akota Munj Mahuda Rd. • Vadodara, GJ 390 020 • INDIA
Email
info@ganamaharaj.org