श्री गणेशाय नम: । हे गणेशा गजमुखा । तुच हरतो दुःखा । ठेवतो भक्तांस सुखा ॥ १ ॥ तू गणांचा ईश । देवदेवतांचा ईश । तुझे लाभता कृपाशिष । लाभे सर्व देव देवतांचे आशिष ॥ २ ॥ तू पुढारी सर्वांचा असणार । कोण तुला विसरणार ? । जो तुला विसरणार । त्याची दाणादाण होणार ॥ ३ ॥ जो तुला जवळ करणार । त्याचे तू विघ्न हरणार । त्याच्यावर कृपादृष्टी करणार । सर्वतोपरी सहाय्य करणार ॥ ४ ॥ उगीच का म्हटले विघ्नहर्ता ! । सुखकर्ता ! कृपावंता ! । पावतोस आपल्या भक्ता । विनम्र भावे भक्ती करता ॥ ५ ॥ नुसत्या कृपादृष्टीने फायदा । होतो भक्तांस कित्येकदा । तुझ्या सहवासात किती फायदा ! । घडू दे सहवास सदा ॥ ६ ॥ तुझे गणित सोडवणार कोण ? । तू तर विद्येचा जनक । तुझे मुळातच अगाध ज्ञान । तुझ्याशी पैज लावणार कोण ? ॥ ७ ॥ तुला कमी नाही झाल्यात यातना । जी तुझ्या मुखावरून येते कल्पना । जरी तू भोगणार यातना । तरी सुखी ठेवतोस सर्वांना ॥ ८ ॥ उगाच का म्हटले तुज सुखदायका । हे अष्ट विनायका ! । हे सिद्धिविनायका ! । गणामहाराजाची प्रार्थना ऐका ॥ ९ ॥ भक्तांसाठी सहाय्य करावे । कृपाशिष लाभावे । ग्रंथ लेखन निर्विघ्न व्हावे । भक्तां सदा तोषावे ॥ १० ॥ जैसा गणपती पुढारी देवांत । तैसा खंडू पाटिल शेगावात । गावचा कारभार सांभाळण्यात । होता निपुण त्यात ॥ ११ ॥ पाटिल मुळचे धार्मिक संस्कारी । मारूतीचा उत्सव साजरा करी । त्यात गोमाजीची कृपा भारी । ह्या पाटिल घराण्यावरी ॥ १२ ॥ गोमाजींची कर्मभूमी नागझरी । जेथे निर्माण गंगा गोदा लहरी । धन्य ती नागझरी । संत जेथे वास करी ॥ १३ ॥ ज्या घरावर संतकृपा असणार । तो प्रपंच आनंदी होणार । संतच भक्तीत रमवणार । भक्तीमुळेच आनंद मिळणार ॥ १४ ॥ पाटिल घराण्याचा मूळपुरुष महादजी । जो कधी न करे कुणाची जी जी । तो करे एकाचीच जी जी । जेणे सदैव त्याची मर्जी ॥ १५ ॥ तो जी जी करे गुरूंची । ठेवे जाणीव त्यांच्या कृपेची । जेणे सोबत भक्तीमार्गाची । जेणे सोबत सत्संगतीची ॥ १६ ॥ ऐसे घडवले संस्कार पिढ्यांवर । पिढ्या नि पिढ्या जपण्यात तत्पर । संस्कारांस महत्व फार । पाटिलांनी दाखवले वारंवार ॥ १७ ॥ अपत्यांवर ऐसे संस्कार घडवावे । जेणे दुसर्‍यांस आनंद लाभावे । चित्तास शांती समाधान लाभावे । देहाचे सार्थक करावे ॥ १८ ॥ जीव कुठेतरी रमवावा लागतो । अन्यथा कंटाळा येतो । चांगल्या ठिकाणी रमल्यास उत्साह येतो । जीवास आनंद लाभतो ॥ १९ ॥ चांगले वाईट नाही शिकवावे लागत । आपणास कळते नकळत । आत्म्याच्या आवाजाकडे दुर्लक्ष करण्यात । यातना भोगाव्या लागतात ॥ २० ॥ नको यातना जीवास । नको नको पीडा त्यास । जाणावे अंतर्मनास । आणावे आचरणास ॥ २१ ॥ जे अगदी सोपे असते । ते दुर्लक्ष करण्याते । अवघड होते । भलतीकडेच चित्त भुलते ॥ २२ ॥ भुलावे कुणाला ? । भुलावे ईश्वरी सत्तेला । नका भुलू मृगजळाला । तेणे घातच आपला ॥ २३ ॥ शक्तीचा दुरूपयोग करू नये । दुसर्‍यास पीडा देऊ नये । आत्म्यास क्लेश देऊ नये । दुसर्‍याचा आत्मा दुखवू नये ॥ २४ ॥ जीवनात आत्म्याला महत्व फार । हेच सांगते वेदांचे सार । नको नुसता देहावर भार । ठेवा सत्वृत्तींवर भार ॥ २५ ॥ पाटिल घराणे शक्तीचे प्रतीक । मल्ल होता त्यांच्यात एक एक । पाटिल घराणे भक्तीचे प्रतीक । धार्मिक भाव जागृत एक एक ॥ २६ ॥ कुकाजी कडताजी बंधु दोघे । त्यांच्या हाकेकडे गाव बघे । गावाचे हीत बघती दोघे । केवळ स्वतःचेच न बघे ॥ २७ ॥ भाग्य प्रत्येकाचे वेगळे । कुकाजीस नव्हती पोरे बाळे । कडताजीस सहा मुले । सारा प्रपंच आनंदात चाले ॥ २८ ॥ खंडू पाटिलास मुख्य म्हणती । पाच बंधू त्याच्या सोबती । नारायण, हरी, गणपती । कृष्णाजी नि मारूती ॥ २९ ॥ धन्य त्या पाटिल वंशाची । कृपादृष्टी लाभली गुरूंची । सारी किमया पूर्व पुण्याईची । आणि त्यात नव्या भरीची ॥ ३० ॥ गुरूविणा काही नाही । सांडण्यात क्लेश राही । जेथे गुरूकृपा राही । आनंद साम्राज्य राही ॥ ३१ ॥ समर्थ मुक्काम मंदिरात । मारूतीरायाच्या सान्निध्यात । शिष्य भास्कर होता सेवेत । महाराजांच्या कृपाछत्रात ॥ ३२ ॥ जेथे मारूती असणार । तेथे रामराया असणार । जो स्वतःस विसरणार । तोच दुसर्‍यास देणार ॥ ३३ ॥ एकाच्या स्थापनेत । दुसर्‍याची स्थापना । भक्तीनेच साकार कल्पना । मनाच्या जाती वल्गना ॥ ३४ ॥ कृतीनेच सर्व मिळते । हे सत्य अनुभवास येते । जीवास कर्म करावे लागते । कर्मावाचून न जगणे होते ॥ ३५ ॥ जे सत्य असणार । ते असत्य कैसे होणार ? । जे जगास उद्धरणार । त्यांचे उत्सव होणार ॥ ३६ ॥ उत्सव करण्याचे प्रयोजन । एकोपा आनंदास स्थान । वैर भावास न मिळे स्थान । परी मनःशांती समाधान ॥ ३७ ॥ पाटिल आडदांड मुळचे । न जाणले मन समर्थांचे । अपशब्द त्यांस बोलायचे । नाना पीडा द्यावयाचे ॥ ३८ ॥ नाना पीडा समर्थांस । पहावेना भास्करास । तो वदला समर्थांस । जाऊ आपण दुसर्‍या स्थानास । ३९ ॥ महाराज वदले भास्करास । पीडा होते ह्या देहास । त्याची जाणीव न आम्हास । जेणे क्लेश न आम्हास ॥ ४० ॥ जो “मी” विसरणार । त्यास पीडा काय होणार ? । सुखदुःख सारखेच वाटणार । प्रारब्ध आनंदे भोगणार ॥ ४१ ॥ भास्करा! जाण तत्व जरा । हा सारा परमेश्वराचा पसारा । व्याधी उपाधीसही मिळे थारा । कुणी न सुटणार बिचारा ॥ ४२ ॥ जैसा ज्याचा संबंध साठा । तैसा परमार्थी वाटा । पाटिल गुरूसेवेत सर्वथा । जेणे हाती गावची सत्ता ॥ ४३ ॥ लक्ष गावातल्या लोकांवरती । साधू भोंदू नजर न टाके स्त्रियांवरी । कानी येता तक्रारी । शिक्षा त्यास भारी होई ॥ ४४ ॥ पाटिल गावचे पुढारी । गावावर दरारा भारी । शुद्ध हेतू त्यांच्या अंतरी । स्त्रियांची अब्रू जतन करी ॥ ४५ ॥ हे जाणले समर्थांनी । दडलेला हेतू पाटिलांच्या मनी । अंधश्रद्धा नव्हती मनी । सदा पहाती पडताळुनी ॥ ४६ ॥ महाराज वदती अरे भास्कर ! । उताविळ नको दम धर । ठेव विश्वास माझ्यावर । पाटिलच चालवेल कारभार ॥ ४७ ॥ हे ओळखले समर्थांनी । कारभार केला पाटिलांनी । पिढ्या नि पिढ्या खपुनी । जीव रमवला सेवेतुनी ॥ ४८ ॥ सत्य जाणण्यास । योग्य प्रतीचा लागे माणुस । शुद्ध अंतःकरण ज्यास । सत्य कळते त्यास ॥ ४९ ॥ खंडू पाटिल हुशार भला । चापती नजर ठेवू लागला । समर्थांच्या हालचाली टिपू लागला । परिक्षा घेण्यास न थकला ॥ ५० ॥ पाटिल परिक्षा घेणार । समर्थ परिक्षा देणार । प्रारब्ध भोग कुणास न टळणार । जग रहाटी अशीच चालणार ॥ ५१ ॥ जग शहाणे प्रसंगातून । सारे योगायोगातून । एक एक प्रसंगातून शिकवण । हेच समर्थांचे समर्थपण ॥ ५२ ॥ मुद्दाम न कधी सुयोगाचे । सारे सहजपणाचे । परिक्षार्थी नि परिक्षक असावे योग्यतेचे । तेणे महत्व टिकते परिक्षेचे ॥ ५३ ॥ हरी पाटिल पहेलवान । खंडू पाटिलाचा बंधू जाण । मुळातच आडदांडपण । त्यात बरोबर पाटिलपण ॥ ५४ ॥ एके दिवशी पाटिल हरी । महाराजांस चिथवू लागला भारी । महाराज दुर्लक्ष करी । सहनशीलता अंगी भारी ॥ ५५ ॥ हरीने त्यांस केले प्रवृत्त । कुस्तीत करावे मला चीत । कर तू मला पराजीत । नाही तर होशील फजीत ॥ ५६ ॥ समर्थ वदले हरीप्रत । नको पडू भानगडीत । तुम्ही पेहेलवान सशक्त । परी नाही योगबळात ॥ ५७ ॥ पैज लावू नकोस माझ्याशी । पैज लाव पेहेलवानाशी । तोडीचा असावा लागतो त्यासी । अन्यथा अनर्थ प्रसंगासी ॥ ५८ ॥ हरीने न जाणले योग्यतेला । समर्थांस कमी लेखू लागला । अहंकार कारणीभूत झाला । मनोमनी संतोषला ॥ ५९ ॥ जगात नाही टिकत अहंकार । अहंकारच घात करणार । कुणी न त्यात तरणार । हेच अनुभवास येणार ॥ ६० ॥ हरीने हट्ट सोडला नाही । अहंकारास जाणले नाही । समर्थांस जाणले नाही । कुस्ती वाचून राहिला नाही ॥ ६१ ॥ कुस्तीची तयारी झाली । तालिमीत जमली प्रेक्षक मंडळी । आजची कुस्ती रंगली । कधी न ऐसी झालेली ॥ ६२ ॥ कुस्ती ऐन रंगात आली । हरीची काया घामाघूम झाली । समर्थ न हलले मुळी । हरीची शक्ती कमी पडली ॥ ६३ ॥ खाली बसले गजानन । म्हणे उठव आता मजलागून । जरी असशील पहेलवान । मी न हलणार येथून ॥ ६४ ॥ हरीने नाना प्रयत्न केले । समर्थ न मुळीच हलले । सर्व डाव करून पाहिले । सर्व प्रयत्न व्यर्थ ठरले ॥ ६५ ॥ हरी म्हणे मनात । कैसे करावे यास चीत ? । तशीच चर्चा प्रेक्षकात । ऐसा पहेलवान न दृष्टीप्रत ॥ ६६ ॥ हा नाही पहेलवान । अंगी योगसामर्थ्य जाण । हरीने न जाणता साधन । फजीतीस होईल कारण ॥ ६७ ॥ प्रेक्षकात लागते पैज । कोण जिंकतो आज । जो तो उत्सुक आज । रंगला डाव आज ॥ ६८ ॥ हरी हरला पैज । समर्थे जिंकली पैज । हरीस कळले आज । तोडीचा मिळाला आज ॥ ६९ ॥ प्रेक्षक सारे स्तब्ध झाले । योगबळ सार्‍यांस पटले । हरीचे तोंड पडले । समर्थ काही न बोलले ॥ ७० ॥ हरीने जाणले समर्थांस । शरण गेला त्यांस । शिकवावे तुम्ही आम्हांस । जे जे येते आपणांस ॥ ७१ ॥ हरीने सामर्थ्य जाणले । प्रत्यक्ष अनुभवले । त्रास देणे सोडले । मनोमन नक्की केले ॥ ७२ ॥ हरीने सांगितले बंधुंस । जाऊ नका त्यांच्या वाटेस । व्हाल कारण फजितीस । मी जाणले योगबळास ॥ ७३ ॥ परी बंधू कैसे ऐकणार ? । अनुभवाने शहाणे होणार । हाच ज्यांचा मनोधर्म असणार । ते अनुभवावीण न स्वस्थ बसणार ॥ ७४ ॥ एक अनुभव घेणार । दुसर्‍यास पीडा होणार । नियतीचे चक्र चालणार । ते कोण थांबवणार ? ॥ ७५ ॥ योगी माणसाची लक्षणं । पहावी सोशिकपणावरून । परिक्षा घेतात सामान्य जन । वारंवार पीडा देऊन ॥ ७६ ॥ समर्थ न कधी सांगे कुणास । योगलीला अवगत आपणास । वाचेने प्रदर्शन करण्यास । माहित नव्हते त्यांस ॥ ७७ ॥ समर्थ न सांगितला जातो । समर्थ ओळखला जातो । तो कृतीनेच समर्थ ठरतो । योगाचे महत्व पटवून देतो ॥ ७८ ॥ जैशी पत्नी पतीची काळजी घेणार । तैसा भगवंत भक्ताची काळजी घेणार । ज्याच्यावर जीव जडणार । तेथे ऐसेच होणार ॥ ७९ ॥ एकाने मर्जी संपादायची दुसर्‍याची । दुसरा काळजी वाहातो त्याची । भक्ताने विचारपूस करायची गुरूंची । गुरू काळजी दूर करतात भक्ताची ॥ ८० ॥ सारे एकमेकावर अवलंबून असते । जगात एकट्याचे काहीच नसते । हे मनास अनुभवाने पटते । कुणीतरी कुणासाठीतरी जगायचे असते ॥ ८१ ॥ पाटिलांचेही तसेच होते । गावासाठी झटत होते । सारे गाव त्यांच्यावर अवलंबून होते । इशार्‍यावर सारे चालत होते ॥ ८२ ॥ हरी पाटिल कुस्तीत हरला । समर्थ चरणी लीन झाला । त्याचे बंधू बोलले त्याला । कां रे घाबरतो पिशाला ? ॥ ८३ ॥ आपण पाटिल कुमार । आपले शरीर पिळदार । गावची जमेदारी बरोबर । का रे झुकवतो शीर ? ॥ ८४ ॥ हा पिसा आडदांड । फुकटचे खाऊन झाला द्वाड । माजले त्याचे थोतांड । पक्का भोंदू द्वाड ॥ ८५ ॥ लोकांना सावध करावे । पीशाचे थोतांड बंद करावे । त्यास झोडपून काढावे । जेणे गाव सोडावे ॥ ८६ ॥ साधूचा वेष घेऊन । बायाबापड्या भुलवून । आपल्या नादी लावून । जाईल त्यांना घेऊन ॥ ८७ ॥ परिक्षा घेतल्याविणा । कैसे कळणार आपणा ? । त्यास झोडपल्याविणा । खरे खोटे कळेना ॥ ८८ ॥ आपण पाटिल गावचे । हातात दोर सत्तेचे । गावचे रक्षण करायचे । हेच कर्तव्य समजायचे ॥ ८९ ॥ पाटिल बंधू सशक्त फार । सदा क्रोधास वश होणार । दुसर्‍यांवर वर्चस्व करणार । पाटिलकी गाजवणार ॥ ९० ॥ बंधू म्हणाले हरीला । ऊसाच्या मोळ्यांनी झोडपू त्याला । चला जाऊ मंदिराला । हाकलवून देऊ नंग्याला ॥ ९१ ॥ बंधू आले मंदिराला । बरोबर ऊसाच्या मोळ्या । पुसू लागले नंग्याला । अरे नंग्या ! खातोस का ऊसाला ? ॥ ९२ ॥ आम्ही करू उसाचा प्रहार । एकही वळ तुझ्या पाठीवर । न दिसता ऊस देणार । अन्यथा झोडपणार ॥ ९३ ॥ हरीला हे काही पटेना । हरी काही बोलेना । परी न पटले बंधुंना । क्रोध त्यांस आवरेना ॥ ९४ ॥ म्हणती राहू नकोस ह्या स्थानाला । दाखव तुझ्या योग लीला । क्रोध अनावर झाला । वाणी मुष्टीचा उपयोग झाला ॥ ९५ ॥ ऊसाच्या घेतल्या मोळ्या । करू लागले मोकळ्या । एक एक ऊस काढला । पाठीवर झोडपू लागला ॥ ९६ ॥ कुणास हे न बघवले । पाटिलांनी ऊसाने बडवले । महाराज सहन करू लागले । जशास तसे न वागावे घडले ॥ ९७ ॥ पहाणारा घाबरून पळू लागला । सोशिकपणाचा कळस झाला । पाठीवर एकही वळ न उठला । जो तो आश्चर्यचकित झाला ॥ ९८ ॥ पाटिल बंधू थकले । समर्थांस शरण आले । पश्चाताप व्यक्त केले । समर्थ कळस शिखर बनले ॥ ९९ ॥ जैसे होते शिखर । तैसीच होती पायात भर । जे अंतरंगात असणार । तेच प्रकट होणार ॥ १०० ॥ पाटिलांचा मनोधर्म । महाराजांचा मनोधर्म । दोघांचे होते भिन्न कर्म । सर्वांस कळले त्याचे मर्म ॥ १०१ ॥ समर्थ न काही बोलले । हातातले ऊस घेतले । भराभर पिळून पाटिलांस दिले । योग सामर्थ्य दावले ॥ १०२ ॥ समर्थांवर प्रसंग येत होते । नित्य नविन घडत होते । स्वानुभवे समर्थांचे होत होते । त्यातले काही प्रसंग येतात येथे ॥ १०३ ॥ कुकाजी खंडूचा काका । प्रसंग पडता बाका । ईश्वरास मारे हाका । एके दिवशी विचार केला बोलका ॥ १०४ ॥ काका म्हणाला खंडूस । याचना करावी समर्थांस । लाभावे पुत्र रत्नास । कुलदीपक ठरावा वंशास ॥ १०५ ॥ खंडूचे विचार सुरू झाले । काहीतरी कमी जाणवले । मन व्यथित झाले । पत्नीस मन मोकळे केले ॥ १०६ ॥ पत्नीची संमती घेतली । समर्थ दर्शनाची वाट धरली । नाना विचारांची कडबोळी । अंतरंगात दडलेली ॥ १०७ ॥ खंडू पाटिल हुशार फार । ऐसा शब्द टाकणार । शब्द खाली न पडणार । काम निश्चित होणार ॥ १०८ ॥ समोरचा खुशीत असणार । तेव्हाच तो ऐकणार । ऐसे मनावर ठसवणार । काम पूर्ण होणार ॥ १०९ ॥ प्रसंग ओळखावा लागतो । माणुस सूज्ञ लागतो । योग्य वेळेस शब्द जेथे । उपयोग होतो तेथे ॥ ११० ॥ समर्थ शिष्यांसमवेत । आले असता रंगात । विचार खंडूच्या मनात । शब्द टाकावा समर्थांप्रत ॥ १११ ॥ खंडू समर्थांस खुलवू लागला । नाना विषय काढू लागला । समर्थे जाणले खंडूला । काही तरी विचार भला ॥ ११२ ॥ बोलता बोलता म्हणाला । श्री गुरू ! एक विचार मनाला ॥ भारी सतावे मजला । कैसे सांगू तुम्हाला ? ॥ ११३ ॥ तुम्ही सर्व जाणणार । काय यातना असणार । मनोवांच्छा जी असणार । ती पूर्ण कधी होणार ? ॥ ११४ ॥ माझ्यावर कृपा करा । पाटिल वंशवृद्धी करा । ह्याच विचाराची येरझारा । सतावते माझ्या मना ॥ ११५ ॥ महाराज वदले । तू एवढा मोठा । शेती वाडी गायी गोठा । नाही आनंदा तोटा । याचना का संतती करता ? ॥ ११६ ॥ जो वैभव देणार । तोच संतती देणार । मी नंगा गावात फिरणार । मी काय देणार ? ॥ ११७ ॥ खंडूस काही सुचेना । महाराजां सोडवेना । पुन्हा पुन्हा करी याचना । नाही तुमच्या कृपेविणा ॥ ११८ ॥ विचार मनात आला । आपण समर्थांचा हात धरला । तेच देती वैभवाला । उगाच का विनवावे दुसर्‍याला ? ॥ ११९ ॥ गुरूमुळेच या वैभवाला । हा विचार मनोमन पटला । पुन्हा पुन्हा विनवू लागला । चरणावर माथा ठेवला ॥ १२० ॥ त्याच्या मनाच्या तळमळीला । आज अंत आला । तो गदगदला । समर्थांस बिलगला ॥ १२१ ॥ त्याने आळवले समर्थांना । दयाळू अंतःकरणी समर्थांना । कृपा केल्याविणा रहावेना । फळास आल्या त्याच्या विनवण्या ॥ १२२ ॥ समर्थ वदले खंडूस । भीक मागतो सच्चिदानंदास । तोच मनोरथास । पूर्ण करेल हमखास ॥ १२३ ॥ याचना म्हणजे भीक । तू मागितले बालक । म्हणे ठरो कुलदीपक । हीच विनवणी एक ॥ १२४ ॥ भिक्या नाव ठेवशील ? । आमरसाचे भोजन घालशील ? । तुज पुत्र संतती होईल । मनोरथ पूर्ण होईल ॥ १२५ ॥ तू वैभव संपन्न । प्राप्त होता पुत्ररत्न । घालावे ब्राह्मण भोजन । संतोषावे दक्षिणा देऊन ॥ १२६ ॥ खंडूस जवळ करून । दिले आशिर्वचन । आले त्यास गहिवरून । शब्द न ये मुखातून ॥ १२७ ॥ एकदा वंदन करून । गुरूंची आज्ञा घेऊन । घराकडे निघाला तेथून । हर्षभरीत मनी होऊन ॥ १२८ ॥ वडील मंडळीस सांगितले । पत्नीसही सांगितले । जे जे समर्थ वदले । सर्व आनंदित झाले ॥ १२९ ॥ काही दिवस लोटता । गंगाबाई कांता । हर्षभरीत झाली चित्ता । आशिर्वाद फळास येता ॥ १३० ॥ काही दिवस लोटल्यावर । कांता झाली गरोदर । आनंदास न पारावार । हर्षभरीत झाले घर ॥ १३१ ॥ पूर्ण होता नवसास । पुत्ररत्न कांतेस । याचना आली फळास । आनंद झाला पाटिलास ॥ १३२ ॥ खंडूस दिसले समर्थ । म्हणे पूर्ण केले मनोरथ । तूच खरा कृपावंत । जेणे पुत्र संतती प्राप्त ॥ १३३ ॥ समर्थांचे बोल आठवले । नवस फेडणे नक्की केले । भिकाजी नाव ठेवले । थाटात बारसे केले ॥ १३४ ॥ कुकाजीच्या हर्षाला न पारावार । धर्म केला अपार । संतोषले गरीब थोर । धन धान्य वाटले अपार ॥ १३५ ॥ आमरसाचे भोजन । गावकर्‍यांना बोलावून । संतोषले ब्राह्मण । भरपूर दक्षिणा देऊन ॥ १३६ ॥ समर्थांचे आशिर्वाद आले फळास । खंडूचे भाग्य आले उदयास । पारावार न राहिला आनंदास । पालवी फुटली वंशवेलास ॥ १३७ ॥ समर्थांनी आशिर्वाद द्यावे । पुत्र रत्न जन्मास यावे । ऐसे गुरू लाभावे । जीवन सार्थक व्हावे ॥ १३८ ॥ धन्य ते माता पिता । गुरूस मनोभावे आळवता । प्रसन्न झाले सद्गुरूनाथा । पूर्ण केले मनोरथा ॥ १३९ ॥ ॥ शुभं भवतु ॥ ॥ श्री गणपती सरस्वतीर्पणमस्तु ॥ ॥ इति श्रीगुरूगजाननलीला ग्रंथस्य सप्तमोऽध्यायः संपूर्णः ॥

Aliquam sed mauris

Sed lorem ipsum dolor sit amet et nullam consequat feugiat consequat magna adipiscing tempus etiam dolore veroeros. eget dapibus mauris. Cras aliquet, nisl ut viverra sollicitudin, ligula erat egestas velit, vitae tincidunt odio.

Contact

Address
B2/201 Ashvamegh 3, Akota Munj Mahuda Rd. • Vadodara, GJ 390 020 • INDIA
Email
info@ganamaharaj.org