श्री गणेशाय नम: । हे वसुदेव देवकीनंदना । बाळगोपाळ कृष्णा । तूच हरणार आमची तृष्णा ॥ १ ॥ सोळा सहस्त्र नारींना रमवणारा । त्यात तू न रमणारा । कर्तव्य कर्म जाणणारा । भक्तांच्या हाकेला धावणारा ॥ २ ॥ अर्जुनाची बाजू घेणारा । त्याच्यासाठी लढणारा । त्याला अजिंक्य करणारा । कौरव संहार करणारा ॥ ३ ॥ समय सूचकतेने वागणारा । सदा प्रेरणा देणारा । भक्तांचे रक्षण करणारा । सहाय्यभूत होतोस खरा ॥ ४ ॥ हे देवकीनंदना । सहाय्य असू दे ग्रंथलेखना । तुझ्या सहाय्याविणा । कैसे करू लेखना ? ॥ ५ ॥ शतशः वंदन तुजला । जोड असू दे सरस्वतीला । जी लिहविते ग्रंथाला । तेणे कार्य पूर्णत्वाला ॥ ६ ॥ अवलीया मज उपदेश करतो । विविध प्रसंगी तारतो । अर्जुनास तू सहाय्यभूत होतो । तैसा तो मज ठरतो ॥ ७ ॥ पडलेल्या अर्जुनास । तूच उभे केलेस । कर्म महत्व पटवलेस । कर्म प्रवृत्तीत रमवलेस ॥ ८ ॥ जैसा अर्जुन रणांगणात । तैसा प्रसंग क्षणभरात । नाना उपदेश होतात । मज प्रवृत्त करतात ॥ ९ ॥ कृष्णा ! तूच आता धावावे । ऐसे प्रवृत्त करावे । गुरू आज्ञा पालन व्हावे । जीवन सार्थक करावे ॥ १० ॥ आज्ञेचे महत्व पटते । आज्ञा पालनाते । बोजे हलके होते । परी आज्ञा न पालन होते ॥ ११ ॥ ज्याला तुझे सहाय्य लाभते । त्याचे कार्य पूर्ण होते । ह्याची मला खात्री पटते । जेणे विसंबणे होते ॥ १२ ॥ पुन्हा पुन्हा विनवणी । लिहू दे मला गुरू कहाणी । पडू दे शब्द कानी । जेणे चालेल लेखणी ॥ १३ ॥ तू सांगतो सर्वांस । नका आचरू वैरभावास । जैसे फळ कंसास । तैसेच वैर आचरणार्‍यास ॥ १४ ॥ देशमुखांचे ऐसे होते । वैरभावाशी नाते । पाटिलांचे उदो होण्याते । डोळ्यात सुख खुपते ॥ १५ ॥ गुरू कृपा पाटिलांवर । होती निर्विवाद थोर । पाटिलांच्या ओसरीवर । नांदू लागला पोर ॥ १६ ॥ बोलबाला पाटिलांचा । देशमुखा न पटे साचा । गाव शेगाव दुफळीचा । मार्ग वैमनस्याचा ॥ १७ ॥ दोन फड गावात । एक देशमुखात । दुसरा पाटिलात । जो तो कुरापती काढण्यात ॥ १८ ॥ शुद्ध अंतःकरण । नव्हते देशमुखाकारण । तैसीच कृतीची घडण । कुरापतीस कारण ॥ १९ ॥ शेगावात दोन पक्ष । एक पाटिल दुसरा देशमुख । कैसे असणार त्यांत सख्य ? । सदा त्यांच्यात वैमनस्य ॥ २० ॥ एकमेकांच्या उणीव पहाती । केव्हा सत्ता येते हाती । जेव्हा पाटिलांकडे सत्ता होती । देशमुख कुरापती काढती ॥ २१ ॥ हे नेते ऐसे असतात । प्रत्यक्ष घटनेत । कधी नाही भाग घेत । ते चतुर असतात ॥ २२ ॥ ते दूर पळून जातात । दुसर्‍यास चालना देतात । त्यास प्रवृत्त करतात । कुरापतीत रमवतात ॥ २३ ॥ कर्म जरी अप्रत्यक्ष होते । तरी भोगावेच लागते । नेते न सुटणार त्याते । कर्मफळ भोगावेच लागते ॥ २४ ॥ भोगावे लागते ज्याचे त्याला । कुणी न येई मदतीला । म्हणुनच आचरावे सत्कर्माला । जेणे पात्र ठराल आनंदाला ॥ २५ ॥ दुसर्‍यामुळे सत्ताधीश होतो । हेच सत्ताधीश विसरतो । तो सत्तेने उन्मत्त होतो । भलतेच धाडस करतो ॥ २६ ॥ पाटिल असता तळ्यावर । भेटे देशमुखाचा महार । महार पाटिलाचा ताबेदार । महारास ऐकावे लागणार ॥ २७ ॥ पाटिल हुकूम करतो त्यास । घेऊन सरकारी कागदास । जावे तू अकोल्यास । महार नकार देतो त्यास ॥ २८ ॥ बरीच होते बोलाचाली । त्यातही शिव्यागाळी । खंडूस भारी चीड आली । म्हणे महाराने अवज्ञा केली ॥ २९ ॥ महाराने दिला नकार । पाटिल खवळला फार । क्रोध झाला अनावर । सोटा मारला हातावर ॥ ३० ॥ महाराचा हात मोडला । देशमुखाने डाव साधला । संधीचा फायदा घेतला । फौजदारी दावा केला ॥ ३१ ॥ विरोधीपक्ष काय करणार ? । ऐसी सुवर्णसंधीच साधणार । दुसर्‍यास दिलासा देणार । आपले बळ वाढवणार ॥ ३२ ॥ कुकाजी निवर्तल्यावर । खंडू पाहे कारभार । देशमुखास ते सलणार । तो काटाच काढणार ॥ ३३ ॥ शिपायास केले आपले । प्रसंग फुलवून सांगितले । स्वरूप मोठे केले । पाटिलांस गुन्हेगार ठरवले ॥ ३४ ॥ एरव्ही शिपायास न महत्व । फौजदारी खटल्यात त्याचेच वर्चस्व । शिपायाची करता आर्जव । त्रासातून सुटतो जीव ॥ ३५ ॥ न्यायाधीश निकाल देई पावेतो । शिपाई गुन्हेगारास सतावतो । कर्तव्य चोख बजावतो । एरव्ही दुर्लक्ष करतो ॥ ३६ ॥ येथे असेच झाले । पाटिल गुन्हेगार झाले । पाटिल पुढचे सर्व समजले । तोंडचे पाणी पळाले ॥ ३७ ॥ परी गुरूकृपा असल्यावर । क्लेश कमी होणार । पाटिलांचा भार समर्थांवर । त्यांनी सोपवले समर्थांवर ॥ ३८ ॥ खंडू पाटिलावर वॉरंट निघाले । देशमुख आनंदित झाले । पुढचे दृष्य दिसू लागले । सत्तेचे मनोराज्य बघू लागले ॥ ३९ ॥ पाटिल मनोमनी घाबरले । काट्याचे नायटे झाले । काही सुचेनासे झाले । बंधू अकोल्यास गेले ॥ ४० ॥ महाराजांचे स्मरण केले । तेच आता उरले । पाटिल रात्रीच मंदिराकडे निघाले । समर्थ चरणी मस्तक ठेवले ॥ ४१ ॥ खंडू मुळचा द्वाड अती । त्यात सत्तेचा दोर हाती । क्रोधाच्या भरात कृती । मग पश्चाताप अती ॥ ४२ ॥ विघ्नहर्त्याला दया येते । तेणे संबोधिले जाते । महाराज विघ्नहर्ता होते । दयेचे पाझर फुटत होते ॥ ४३ ॥ महाराजांचे चरण धरले । महाराजांनी आशिष दिले । खंडूस समजाविले । दोन्ही हातांनी कवटाळले ॥ ४४ ॥ जा भिऊ नकोस रतीभर । बेडी न तुज पडणार । देशमुखाचे न चालणार । तू निर्दोष सुटणार ॥ ४५ ॥ विधात्याने महाराजांचे । निश्चित केले जगण्याचे । महत्व पूर्व संचिताचे । तैसेच होते जगण्याचे ॥ ४६ ॥ महत्वाचे प्रसंग निश्चित । त्यांना तोंड देण्यात । दुसरी कर्मे घडतात । पुढच्यास कारक होतात ॥ ४७ ॥ कोण थोपवणार विधात्याला ? । तसेच कर्म प्रवृत्तीला ? । समर्थही न सुटती त्याला । विविध कर्मे आचरणाला ॥ ४८ ॥ ऐन दुपारच्या वेळी । समर्थ निवांतपणे झोपले त्यावेळी । तेलंगी ब्राह्मण मंडळी । खंडूच्या घरी आली ॥ ४९ ॥ भिक्षा मागण्यास आली । मंत्रोच्चार करू लागली । इकडे तिकडे बघू लागली । मोठ्याने म्हणू लागली ॥ ५० ॥ ज्याच्या घरी समर्थ । त्याच्या घरचे स्वस्थ । कुणीही येता त्रयस्थ । न कधी भयग्रस्त ॥ ५१ ॥ समर्थांनी सारे ऐकले । मंत्रोच्चार सुधारले । निद्रिस्तांना जागे केले । तेलंगी थक्क झाले ॥ ५२ ॥ समर्थे त्यांना सावध केले । लुटू नका बजावले । फुलाची पाकळी देवविते झाले । पुढे जाण्यास सांगितले ॥ ५३ ॥ ब्राह्मणांनी भिक्षा घेतली । त्यांच्या झोळीत कोंबली । पुढच्या घरची वाट धरली । हीच पथ्यावर पडली ॥ ५४ ॥ चुका दुरुस्त करायचे । सन्मार्गाला लावायचे । हेच झाले नित्याचे । नाव नव्हते स्वस्थतेचे ॥ ५५ ॥ योग्यास घर एकाचे । रात्रंदिवस न चाले साचे । कधी स्थिर नसायचे । नवे घर शोधायचे ॥ ५६ ॥ सारखा मुक्काम बदलायचे । वैभवात न रमायचे । असेच असते योग्याचे । जे होते समर्थांचे ॥ ५७ ॥ खंडू कडून निघाली स्वारी । आली कृष्णाजीच्या मळ्यावरी । आनंद झाला भारी । हास्य खिळले गालावरी ॥ ५८ ॥ जेथे महाराज जाणार । तेथे ऐसेच होणार । हा नव्हता पाहुणचार । त्यांना हवा होता आधार ॥ ५९ ॥ जो दुसर्‍यावर अवलंबतो । त्याचीच मनधरणी करतो । त्याच्याकडून काम साधतो । जीवन सार्थक करतो ॥ ६० ॥ सेवा करून मेवा खाऊन । हीच बालपणी शिकवण । सेवा करावी मनोमन । जेणे रहाल मेवा खाऊन ॥ ६१ ॥ मेव्यासाठी का होईना । सत्कर्म घडते त्या क्षणा । नुसते कधी पटेना । आमिष दावल्याविणा ॥ ६२ ॥ समर्थे कृष्णाजीस । आज्ञा केली त्यास । झोपडीच दे आम्हास । नको कुणाच्या घरास ॥ ६३ ॥ शंकराच्या देवळाजवळी । झोपडीची सोय केली । काही दिवस रहाण्या आली । गुरूमूर्ती तेथे वसली ॥ ६४ ॥ महाराजांस वाटले । उपाधीस टाळले । प्रारब्धात लिहिलेले । न कधी टळले ॥ ६५ ॥ गावात वृत्त समजले । मळ्यावर सारे धावले । हेतू साध्य करू लागले । कृपाशिष घेऊ लागले ॥ ६६ ॥ समर्थांनी वास केले । मळ्याचे क्षेत्र झाले । स्थान महात्म्य वाढले । फुलहार नवस झाले ॥ ६७ ॥ समर्थांबरोबर । पाटिल भास्कर । तुकाराम कोकाटे बरोबर । सेवा करण्यात निरंतर ॥ ६८ ॥ समर्थांच्या लीला । दूरवर पसरल्या । भावुक भक्त होती गोळा । कृष्णाजीचा फुलला मळा ॥ ६९ ॥ दूरच्या गोसाव्यांनी । फायदा उठवावा या हेतूनी । यावे शेगावी त्यांनी । यात्रेचे नाव काढुनी ॥ ७० ॥ दहा-वीस गोसाव्यात । ब्रह्मगिरी मुख्य त्यात । ढोंगी अंतरंगात । फिरतो साधू वेषात ॥ ७१ ॥ गोसावी म्हणती पाटिलासी । आम्ही निघालो यात्रेसी । जातो रामेश्वरासी । घेउनी येतो भागिरथीसी ॥ ७२ ॥ धर्म प्रचारास्तव । फिरतो गावोगाव । हृदयात भोळा भाव । जेणे धार्मिकतेला वाव ॥ ७३ ॥ गोसावी म्हणे कृष्णाजीस । मुक्काम तीन दिवस । तू घरचा श्रीमंत दिसतोस । खाऊ घाल शिरा पुरीस ॥ ७४ ॥ तू नंग्यास पोसतोस । वेडा पिसा बाळगतोस । आम्ही आलो प्रवचनास । धर्म जागृती करण्यास ॥ ७५ ॥ मुक्काम करावा मळ्यावर । आज्ञा आम्हा झाल्यावर । आलो येथवर । आसरा द्यावा सत्वर ॥ ७६ ॥ कृष्णाजी म्हणे त्यावर । आज सायंकाळास । ऐकीन प्रवचनास । मग पंचपक्वान्नास । घालीन भोजनास ॥ ७७ ॥ गांजास येथे कमी नाही । तैनातीस उणीव नाही । जो आपले म्हणुन राही । त्याचीच सोय होई ॥ ७८ ॥ सायंकाळी प्रवचनास । गीता श्र्लोक निरूपणास । ब्रह्मगीरीने समजावण्यास । घेतले आधारास ॥ ७९ ॥ प्रवचन रंगले नाही । गावकरी रमले नाही । कुजबुज करत राही । साधूस न लवलेशही ॥ ८० ॥ निराश एक एक झाल्यावर । परतू लागला झोपडीवर । महाराज होते पलंगावर । जवळ होता भास्कर ॥ ८१ ॥ तो होता चिलिम भरत । महाराज आपल्या तंद्रीत । गावकरी सारे वृत्त पहात । समजले त्यांच्या मनात ॥ ८२ ॥ गोसाव्याच्या गर्दीला । उतार पडू लागला । गोसाव्यास राग आला । त्याचा अपमान झाला ॥ ८३ ॥ ज्याच्या जवळ नाही तप । तो काय देणार श्राप ? । खरा न ठरे श्राप । कुणाचा न थरकाप ॥ ८४ ॥ शब्द ज्याचे धारदार । त्यालाच घाबरणार । मिळमिळत्या शब्दावर । न थरकाप होणार ॥ ८५ ॥ इकडे समर्थांपाशी । भास्कर होता सेवेशी । देत होता चिलिमीसी । वरचेवर त्यांसी ॥ ८६ ॥ त्या चिलिमीच्या विस्तवाची । ठिणगी पडली त्याची । नेमकी पलंगावर पडण्याची । परी दृष्टी न गेली कुणाची ॥ ८७ ॥ काही काळ लोटल्यावर । निघू लागला धूर । हळू हळू चौफेर । ज्वाळा निघाल्या साचार ॥ ८८ ॥ भास्कर जवळ होता । तो म्हणे सद्गुरूनाथा । बसू नका येथे आता । धरू लागला त्यांच्या हाता ॥ ८९ ॥ क्षणात पलंग पेटला । सर्वत्र हाहाकार माजला । कृष्णाजीही घाबरला । जणू स्वतःचाच पलंग पेटला ॥ ९० ॥ भास्करे उठवले महाराजांना ।महाराज मुळचे हालेना । विनवण्या जरी नाना । समर्थांना पटेना ॥ ९१ ॥ अग्नी पंचमहाभुतांतला । देहही पंचमहाभुतांतला । जरी अग्नीने धर्म आचरला । मी न घाबरणार त्याला ॥ ९२ ॥ मी येथेच बसणार । पलंग पेटला सत्वर । ज्वाळा निघाल्या वरचेवर । जणू समर्था करण्या स्वाहाकार ॥ ९३ ॥ समर्थ वदले भास्करास । आण ब्रह्मगीरीस । जळत्या पलंगावर बसण्यास । गीता तत्व पचवण्यास ॥ ९४ ॥ गुरू आज्ञा प्रमाण झाली । ब्रह्मगिरीची बखोट धरली । समर्थांपुढे स्वारी आणली । ब्रह्मगीरीची मुंडी खाली ॥ ९५ ॥ ब्रह्मगिरी पक्का दांभिक जाण । गेला मनात घाबरून । वाटे जावे पळुन तेथून । घाम सुटला दरदरून ॥ ९६ ॥ समर्थांस शरण आला । माफी मागू लागला । उपदेशीले ब्रह्मगिरीला । मिरवू नको पांडित्याला ॥ ९७ ॥ भलते जगा सांगू नये । आधी करावे नि सांगावे । कृतीनेच पटवावे । वायफळ बडबडू नये ॥ ९८ ॥ ब्रह्मगिरी वदे समर्थांप्रत । मी पोटभर्‍या संत । नुसत्या पांडित्यात । अनुभवले न काही त्यात ॥ ९९ ॥ उगाच पिसा म्हणालो । अपशब्द बोललो । पंचपक्वान्नात रमलो । उगाच व्यर्थ हिंडलो ॥ १०० ॥ पुन्हा एकदा जनांनी । समर्थां केली विनवणी । भक्तांची विनवणी ऐकुनी । समर्थ उतरले त्या क्षणी ॥ १०१ ॥ खाली उतरता गजानन । पलंग गेला कोसळून । जो शेषभाग त्या लागून । लोकांनी टाकला विझवून ॥ १०२ ॥ मध्यरात्रीच्या समयाला । बोलले ब्रह्मगिरीला । ज्याने राख फासली अंगाला । त्याने आचरू नये ढोंगाला ॥ १०३ ॥ समर्थ स्वामी रामदास । ज्ञानेश्वर तुकारामास । गोरक्ष मच्छिन्द्रनाथास । जाणावे तत्वास ॥ १०४ ॥ उगाच पांडित्यावरी । फिरू नकोस भूमीवरी । अहंकार नको उरी । निंदा थट्टा मस्करी ॥ १०५ ॥ त्याची कान उघाडणी । केली समर्थांनी । पटले त्यास मनोमनी । पश्चाताप झाला मनी ॥ १०६ ॥ राहू नकोस ह्या स्थळास । रहाता फजितीच्या प्रसंगास । नाही ओळखले मालकास । तो बडवेल तुम्हांस ॥ १०७ ॥ ब्रह्मगिरीस पटले । त्याचे डोळे उघडले । तेथून निघणे नक्की केले । पुढच्या वाटेस अनुसरले ॥ १०८ ॥ ॥ शुभं भवतु ॥ ॥ श्री गणपती सरस्वतीर्पणमस्तु ॥ ॥ इति श्रीगुरूगजाननलीला ग्रंथस्य अष्टोऽध्यायः संपूर्णः ॥

Aliquam sed mauris

Sed lorem ipsum dolor sit amet et nullam consequat feugiat consequat magna adipiscing tempus etiam dolore veroeros. eget dapibus mauris. Cras aliquet, nisl ut viverra sollicitudin, ligula erat egestas velit, vitae tincidunt odio.

Contact

Address
B2/201 Ashvamegh 3, Akota Munj Mahuda Rd. • Vadodara, GJ 390 020 • INDIA
Email
info@ganamaharaj.org